Tuesday, September 29, 2020

व्यथा खैरलांजीची...



खैरलांजीचा तो प्रसंग आठवता

येतात आजही अंगावर शहारे

प्राण्यासारखे तो प्रसंग प्रत्यक्ष

पाहण्यास तुम्हा लाज कशी वाटली नाही रे ?


पाहत होता शेकडोंचा समुदाय

हैवाण प्राण्यासारखा निर्बुद्धपणे

करत होते अत्याचार आणि हत्या

मानव असून सैतानाप्रमाणे


क्रूरपणे हत्या होत असतानाही

शेकडोंचा समुदाय षंढपणे पाहत राहतो

न्याय मिळण्याच सोडा इथे

जगण्याचा हक्कच हिरावून घेतल्या जातो.


अजून किती वर्षे जातीच्या

नावाखाली बळी घेत राहणार

पूर्ण कुटुंब संपले न्यायाच्या प्रतिक्षेतच

मग सांगा गुन्हेगारांना सजा कधी देणार.


त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी

वैगरे आम्हाला न्याय हवा नाही.

पुन्हा गुन्हेगार घडू नयेत यासाठी

कठोर शिक्षेशिवाय पर्याय नाही.


देहदंडाच्या शिक्षने न्याय इथे

त्यांना व आम्हा मिळणार नाही

ते जिवंत राहून जेव्हा भोगतील सजा

त्याविना अशी मानसिकता बदलणार नाही.


रास्ता रोको, निषेध, कॅडलं, अशा लढल्याने

तात्कालिक समाधान आम्हा मिळेल न्याय नाही.

न्यायाच्या प्रतिक्षेतच 14 वर्षच काय

कित्येक पिढ्या गेल्याविना राहणार नाही.


असेल माणुसकी जिवंत तर एकदा

प्रत्येकाने चढवला पाहिजे आवाज सजेसाठी

मग आम्हाला कशाला राहील गरज

प्रत्यक्ष उतरण्याची रस्त्यावर न्यायासाठी


©जी.संदीप (गोणार,नांदेड)

9552803980

Monday, September 28, 2020

.......तर खुशाल आरक्षण रद्द करूयात




          गेली कित्येक वर्षे आरक्षणाच्या नावावरून समाजात तेढ निर्माण केली जात आहे. आरक्षणामुळं गुणवत्ताधारकांना संधी मिळत नाही. असं एकमेव कारण देऊन खुल्याप्रवर्गातील काही नागरिक आरक्षणाचा विरोध करतात. पण ते रद्द करण्यासोबतच आर्थिक निकषावर आरक्षणाची मागणी सुद्धा काही जण करत आहेत. काल परवा तर एका खासदाराने स्टेटमेंट दिले की, “आम्हाला आरक्षण देऊ शकत नसाल, तर सर्वच आरक्षण रद्द करा.”

           या सर्व बाबींचा आढावा घेत असताना आरक्षणाचे समर्थक आरक्षण रद्द करण्याचा मागणीवर नेहमी एक युक्तिवाद करत आलेत. तो युक्तिवाद म्हणजे, आरक्षण रद्द करायचे असेल तर नक्की करा, पण देशात जी स्थावर मालमत्ता आहे त्या मालमत्तेच समान वाटप करा. समान नागरी कायदा लागू करा. असा मुद्दा आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या वर्गांपैकी एक वर्ग म्हणतो. बाकी सर्वजण शांत राहतात. खरे पाहता या दोन्ही बाबी होतील असे कधी वाटत नाही. 

         मुळात आरक्षण देत असताना ज्या अटींचा विचार करण्यात आला. त्यात पारंपारिक व्यवस्थेने मानवा मध्ये भेद करायला सुरुवात केली. तो भेद करत असताना जात हा घटक पुढं आणल्या गेला. मग जातीनुरूप काम करण्याची बंधने लादली. कोणत्या जातीच्या व्यक्तीने कोणती कामे करायची याची कठोर नियमावली व्यवस्थेने लादून दिली. या नियमावलीचा परिणाम म्हणून कौशल्य असतील तरी सुद्धा आपणास आपल्या जातीबाहेरील कामे करता येत नाहीत. जातीअंतर्गत ठरवून दिलेलं काम शिकणे व तेच काम करत राहणे अशी सक्ती करण्यात आली. संपत्ती साठवण्याचा अधिकार सुद्धा विशिष्ट जातीलाच होता. सेवेच्या बदल्यात धान्य देणे म्हणजे एकप्रकारे सेवाकऱ्यांना संपत्ती बाळगण्यापासून दूर ठेवणेच न्हवे का ? यासोबतच लादून दिलेल्या बंधनासंदर्भात कोणत्याही प्रकारचा विरोध करण्याचा अधिकार सुद्धा कोणालाही न्हवता. त्यामुळं झालं असं की आहे ती स्थिती मागील जन्माचे कर्म म्हणून स्वीकारण्याची मानसिकता उपेक्षित वर्गात तयार झाली. धर्माचे ठेकेदार जे सांगतील ते खरेच आहे. असे मानण्याची वृत्ती तयार झाली. धर्माच्या ठेकेदारांना या गुलामांनी आदर्श मानले होते. धर्माचे ठेकेदार हे देवाचे दूत आहेत असे मानायचे त्यामुळं गुलामांमध्ये विरोध करण्याची मानसिकता निर्माण झाली नाही. याचा परिणाम असा झाला की, ठेकेदार जे सांगतील ते खरं आहे असं समजून त्याप्रमाणे ते वागत असत.

        त्यातून ते दररोजच्या कामाचा जो मोबदला मिळत त्यावर गुजराण करत. अडी-अडचणीला ते सवर्ण आपणास सहकार्य करतील अशी भावना त्यांच्या मनात रहायची. उपकार केल्यासारखी मदत हे सधन व ठेकेदार लोक करत असत. खरं तर श्रम करणाऱ्यांचा तो अधिकार असताना सुद्धा त्यांच्यावर उपकार केल्याप्रमाणे गरजेएवढी नाहीतर तुटपुंजी मदत देत असत. त्यातून काम करणारा गुलाम वर्ग त्यातच धन्य मानून समाधानी राहू लागला. व सवर्णांनी खूप उपकार केल्यासारखी भावना मनात ठेवून ते त्यांच्याशी अदबीने वागु लागला. त्यांच्या कोणत्याही बाबीला विरोध करणे नाही, हक्क मागणे नाही, तुम्हीच का श्रेष्ठ ? असा सवाल सुद्धा नाही. फक्त गुलाम बनून सहन करणे हा एकमेव उपाय व्यवस्थेने त्यांच्यावर लादला होता. हे व्यवस्थेचे गुलाम बनून त्याप्रमाणे ते वागत होते.

         कालांतराने परकीयांच्या सत्ता भारतावर आक्रमण करून राज्य करू लागल्या. त्यामुळं गुलामांना आपल्या हक्काची जाणीव होऊ लागली. माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक बाबींची जाणीव होऊ लागली. जाती बाहेरील ईतर बाबी करण्याच्या संधी मिळू लागल्या. पण त्या फक्त आणि फक्त परकीय आक्रमकांमुळं. माणूस म्हणून जगण्यासाठी स्वाभिमान हा गरजेचा असतो. याबद्दल जाणीव तयार होऊ लागली. आपल्या या गुलामीच्या जगण्यास मागील जन्माचे कर्म किंवा कोणतीही दैवीशक्ती कारणीभूत नाही. अशी मानसिकता तयार होऊ लागली. त्यातून जातीतील बंधने मोडून शिक्षण घेण्यासाठी पुढं येऊ लागले. मग घेतलेल्या शिक्षणाचा वापर करत पारंपारिक व्यवस्थेला खिंडार पाडण्याचं काम नवशिक्षित वर्ग करू लागला. (याचे उदाहरण म्हणून विविध समाजसुधारकांची नवे घेता येतील.)यामुळं पारंपरिक व्यवस्थेचे धाबे दणाणले. त्यांच्यात चल-बिचल सुरु झाली. त्यांच्या स्वामीत्वावर गदा येणार होती. तसे होऊ नये म्हणून हे धडपडत होते. पण तरीही त्यांना नको तेच घडत होते.

       न्याय हक्काची मागणी ही परकीय आक्रमकांकडे केल्या जाऊ लागली. देशातील व्यवस्थेच्या प्रमुखापैकी कोणत्याही प्रमुखाने स्वाभिमान, स्वातंत्र्य, समता, न्याय, हक्क, अधिकार सर्वात महत्वाचे म्हणजे माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देण्याची भाषा केली नाही.

        आज जे आरक्षणाचा विरोध करत आहेत. त्यांचेच वंशज या बाबीस कारणीभूत आहेत. या पारंपरिक व्यवस्थेमुळं विकासापासून दूर लोटल्या गेलेल्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांना विशेष सुविधा देणं गरजेचं होतं. ही बाब लक्षात घेऊनच या आरक्षणाची सुरुवात झाली. परकीय आक्रमकांनी उपेक्षितांना त्यांची स्थिती सुधारण्यासाठी संधी देऊ केल्या. पण त्या संधीचा लाभ इथल्या पारंपरिक व्यवस्थेने घेऊ दिलाच नाही. याच उदाहरण म्हणजे, सार्वजनिक पाणवठ्यावर सर्व समाजाला पाणी पिण्याचा हक्क आहे. अस्पृश्य सुद्धा सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी पिऊ शकतात. असा ठराव झालेला असताना सुद्धा चवदार तळ्याच्या सत्यगृहावेळी काय घडले हे आपना सर्वाना ज्ञात आहेच. मग अशा स्थितीत अस्पृश्य समजल्या गेलेल्या नांगरिकांना समान दर्जा प्राप्त करून द्यायचा असेल तर आपण काय केलं असत ? तुम्ही माणसे आहात तुमच्यासोबत राहणारे इतर सुद्धा मानवच आहेत. मग असे असताना सोबत राहणाऱ्या जातीतील माणसांना व इतर जातीतील माणसांना वेगळी वागणूक का ? ही माणुसकी आहे का ? आमचा धर्म आम्हाला अशी दुय्यम  वागणूक द्यायला शिकवतो का ? असा प्रश्न तुमच्या डोक्यात कधी तरी आला का ? नसेल आला तर मग तुम्हाला आरक्षणावर बोलण्याचा काय अधिकार आहे ?

         आरक्षण हे यासाठी आहे की, पारंपरिक व्यवस्थेने ज्या लोकांवर अन्याय केला आहे. ज्यांना न्याय हक्कापासून दूर ठेवलं आहे. माणूस असून सुद्धा काही जातीतील माणसांना दुय्यम वागणूक दिल्या जाऊ लागली. तशा नागरिकांना प्रवाहात आणण्यासाठी विशेष सवलत देणे हा एकमेव मार्ग आहे. आरक्षण देण्यासंदर्भात शाहू राजांनी दिलेलं उदाहरण आपणास माहित नसेल तर ते माहित करून घ्यावे. परंपरावादी लोकांची मानसिकता, जातीने कनिष्ठ ठरवल्या गेलेल्या नागरिकांना प्रवाहात आणण्याची न्हवती. म्हणून हा आरक्षणाचा मार्ग अवलंबवण्यात आला. 

          आरक्षण मिळाल्यानंतर सुद्धा आजमितीस ती मानसिकता संपुष्टात आलीच नाही. याचे काही दिवसांपूर्वी घेतलेलं उदाहरण मी तुमच्याशी शेयर करतो. वन व टू बीएचके किरायाने देणे असल्याची जाहिरात वर्तमान पत्रात आली होती. शाकाहारी व सवर्ण व्यक्तींनाच देण्यात येईल अशी अट टाकण्यात आली. जाहिरात मला एका मित्राने पाठवली होती. जाहिरात बघून मी त्यातील नं वर कॉल केला. साधारणपणे बोलणं झालं. रूम पाहण्यासाठी प्रत्यक्ष भेटण्याचं ठरलं. वेळ वैगरे फिक्स झाली. मग मी शेवटी त्यांनी जाहिरातीत उल्लेख केलेल्या सवर्ण आणि शाकाहारी या शब्दाबद्दल विचारलं तर त्यांनी सांगितलं की, हिंदू संस्कृतीनुसार जे सवर्ण आहेत त्यांनाच फक्त द्यायची आहे. तुमचं आडनाव काय ? मी सांगितलं मग त्या म्हणाल्या काही हरकत नाही या तुम्ही. ठरलेल्या वेळेवर. नंतर त्यांना प्रश्न केला. त्यावर काही जातींची नवे घेतली. त्यांना देणार नाही असं त्या व्यक्तीने म्हटलं.

        त्यासोबतच उत्तम उदाहरण म्हणजे शैक्षणिक क्षेत्रातील ज्या काही संस्था आहेत त्यात प्राथमिक, माध्यमिक शाळा,  बारावीचे कॉलेजेस, पदवी-पदविकेची कॉलेजस, विविध कारखाने. शैक्षणिक क्षेत्र वगळता कारखादारी मध्ये आरक्षण नसल्यामुळं मर्जीनुसार नोकरदारांची भरती केली जाते. शैक्षणिक क्षेत्रातील भरतीमध्ये आरक्षित जागा वगळता किती अनारक्षित जागेवर मागासवर्गीयांना संधी दिली आहे ? याचे उत्तर शोधाल का ? जर तुमची मानसिकता आजसुद्धा परंपरावादी असेल तर मग तुमच्याकडून न्याय्य वागणुकीची अपेक्षा कशी करायची ? 

         आज आपण खुशाल आरक्षण रद्द करण्याची मागणी करताय ? त्या मागणीच आम्ही समर्थन सुद्धा केलं असत. पण तुम्ही करत असलेल्या मागणीच आम्ही समर्थन करावं याच एखादं ठोस कारण द्याल का ? आरक्षणामुळं गुणवत्ताधारकांवर अन्याय होतोय. असं तुमचं म्हणणं आहे. जरा सांगाल का ? की कोणत्या गुंवत्ताधारकांवर अन्याय झाला आहे ? शैक्षणिक संस्थेत पैसे नाहीत म्हणून नोकरी वर ज्याला तुम्ही रुजू करून घेतलं नाहीत तो गुंवत्ताधारकांवर केलेला अन्याय नव्हे का ? सरकारी नोकरी लागायची असेल तर अनेक ठिकाणी पैसा भरावा लागायचा गुणवत्ता असून सुद्धा पैसे भरण्याची कुवत नव्हती म्हणून नोकरीला मुकावे लागलं. तो गुंवत्ताधारकांवर केलेला अन्याय नव्हे का ?

         गुणवत्ताधारक व कौशल्य असताना सुद्धा कमी दर्जाची कामे करावी लागणे हा गुणवत्ताधारकांवर अन्याय नव्हे का ? शैक्षणिक संस्थेत शिक्षक म्हणून रुजू असताना संस्थाचालकांच्या मर्जीने सेवकाची कामे करावी लागणे, संस्थाचालकांच्या घरची कामे करावी लागणे हा  गुणवत्ताधारकांवर अन्याय नव्हे का ? असे किती अन्याय सांगायचे जे आरक्षण लागू झाल्यानंतर शासकीय व खाजगी क्षेत्रात सुरु झालेत. मग या गुणवत्ताधारकांवर होणाऱ्या  अन्यायाबद्दल तुमची जीभ गप्पा का ?

       एका खासदाराने आरक्षणाबद्दल असे बेजबाबदार वक्तव्य करणे म्हणजे स्वतःच्या कुवतीवर नागरिकांना प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास संधी उपलब्ध करून देणे होय. अशी अपेक्षा जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या एका घटकडून घडणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. तुमच्यासाठी देशातील प्रत्येक नागरिक समान आहे. मग प्रत्येक नागरिकांच्या न्याय हक्कासाठी लढणे हे तुमचं कर्तव्य आहे. हे कर्तव्य पार न पाडत असताना मतभेद निर्माण करत असाल तर तुमच्या कार्यप्रणाली बद्दल कोणताही सामान्य नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित नक्कीच करेल. एका समाजाच्या हितासाठी दुसऱ्या समाजावर अन्याय करण्याचा अधिकार इथे कोणालाही नाही.

          त्यामुळं देशातील प्रत्येक नागरिकांना समान न्याय, हक्क आणि वागणूक मिळेल यासाठी प्रत्येक खासदाराने काम करणे गरजेचे आहे. पण इथे जात धर्म पाहून राजकारण आणि विकासाच्या गोष्टी केल्या जातात. म्हणजे तुम्हाला जिथे स्वतंत्र्य आहे तिथे मागास घटकांना डावलण्याच काम करत आहात. शहरी भागात जर कधी फेरफटका मारला तर असे निदर्शनास येते की, मागासवर्गीयांच्या वस्तीत दुर्गंधी चे खच सापडतील कचरा भरणारी गाडी आठ दिवसातून एकदा येईल(भलेही ते काम करणारा मागासवर्गीय असला तरीसुद्धा) पण खुल्या प्रवर्गाच्या गल्लीतून फेरफटका मारत असताना स्वच्छताच स्वच्छता दिसून येईल. पाण्याच्या सोयींसंदर्भात सुद्धा तीच गत. अशा प्राथमिक सुविधांबाबत दुय्यम वागणूक देण्याची मानसिकता आपल्यात रुजलेली असताना, आपण आरक्षण जर हटवले तर समान वागणूक कशी देऊ शकाल ? जिथे आरक्षणाच्या जोरावर मागासवर्गीय नोकरी करतात तिथे  तुम्ही तुमच्या सोयीचे उमेदवार निवडण्यासाठी प्रयत्न करणार. मग पुन्हा मागासवर्गीय मागासवर्गीयच राहणार. त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीस तुम्ही जबाबदार ठरणार. मुळात मागासवर्गीयांवर ही स्थिती येण्यास तुम्ही नाही तर तुमचे पूर्वज जबाबदार आहेत. आरक्षण हटवण्याचा विचार डोक्यात ठेऊन तुम्ही येणाऱ्या पिढीच्या हलाखीच्या स्थितीस जबाबदार ठरू पाहत आहात. ती स्थिती तुम्ही तुमच्यावर ओढवून घेणार नाहीत ही अपेक्षा.

         आरक्षण रद्द करत असताना मागस्वर्गीयांच म्हणणं आहे की, “संपत्तीचे समान वाटप व्हावे.” जे कधीही शक्य नाही. ते तुम्हाला तुम्ही जेवढे कष्ठ केले तेवढा मोबदला दिला नाही. कामानुसार मोबदला जर दिला असता तर आज आरक्षणाची गरज सुद्धा राहिली नसती. पण त्याच्याने हे शक्य नाही. त्यामुळं हे आरक्षण सर्व मागासवर्गीयांचा हक्क आहे. तो टिकवून ठेवावाच लागेल. नवीन आरक्षणासाठी जो समाज धडपडत आहे. त्यास त्यांच्या गरजेनुसार संविधानिक प्रकारे आरक्षण देण्यासाठी राजकारण्यांनी प्रयत्न करावेत. अशी बडबड करून समाजात तेढ निर्माण करू नये.

      समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात समान वागणुकीची भावना जेव्हा येईल/रुजेल तेव्हा खुशाल आरक्षण रद्द करण्यात यावे. तेव्हा आम्हाला कोणताही आक्षेप राहणार नाही. आम्ही सुद्धा खुशाल रीतीने आरक्षणाला नाकारू. अन्यथा तुमच्या विरोधिवृत्तीस योग्य तसा लढा नक्कीच देऊ. हे सुद्धा लक्षात असू द्यावे.

 ©जी.संदीप(गोणार,नांदेड)

       9552803980

Tuesday, September 22, 2020

जात आरक्षण आणि लोकशाही......




 बरेच दिवसापासून जात, आरक्षण या संदर्भाने चर्चा चालू आहे. काही जणांनी या संदर्भात काहीतर बोल अशी विनंती केली. पण हा विषय विचार करून नाही तर भावनेने मांडला जातो किंवा भावनेमुळं पुढं येतो. म्हणून मी टाळत होतो. पण काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ आला यावरून खूप चर्चा सुद्धा झाली. त्या व्हिडिओतील शब्द कदाचित त्या एकट्याचेच असते तर काही वाटलं नसत. पण ते शब्द खूप जणांच्या तोंडी दबून आहेत. त्यामुळं म्हटलं लिहावं काही तरी म्हणून हे लिखाण करत आहे.

       हा विषय भावनेचा आहे. या संदर्भात लिहीत असताना मी भावनिक होऊन लिहिणार नाही. काही बाजू मांडणार आहे. त्या आपण समजून घ्या. निरपेक्ष भावनेनं वाचा आणि समजून घ्या. काही शंका किंवा मतभेद असतील तर संवाद साधुयात.




           “जात” ही संकल्पना कधी सुरु झाली याबद्दल अद्यापर्यंत कोणत्याही जात संशोधकांबद्दल एकमत होऊ शकलं नाही. पण काही संशोधकांच्या आढाव्यावरून ई.स.पूर्वी झाली एवढं ग्राह्य धरूया. मग ही जात आहे काय ? हे जाणून घेण्यासाठी काही अभ्यासकांची मते पाहुयात.

      “जात ही अनुवंशिकतेच्या दृढ बंधनाची तत्वतः बांधलेली एक घनिष्ठ संस्था होय.- सेनार्ट(फ्रेंच तज्ञ)

       वर्ण व्यवस्थेची मूळ समाजात खोलवर रुजत गेली. त्यातून व्यक्तीचा वर्ण जन्मावरून ठरविला जाऊ लागला. चार वर्णाचे अनुलोम संकर व त्या संकराचे परत अनुलोम प्रतिलोम संकर यांच्यातून भारतात सुमारे 8064 जाती निर्माण झाल्या.” (डॉ. सुमंत यशवंत, डॉ.पुंडे दत्तात्रय [संपा.] महाराष्ट्रातील जातीसंस्थाविषयक विचार पान-117)

          वरील काही अभ्यासकांचे विचार आणि स्वतःच चिंतन यातून जात काय आहे, ती कधी अस्तित्वात आली. ती टिकून राहण्यास कोण आणि कसे जबाबदार आहेत. या प्रश्नांचे काही प्रमाणात उत्तरे मिळतात. जात टिकून राहण्यासाठी कोणत्याही प्रकारचे आरक्षण कधीही जबाबदार न्हवते व राहणार सुद्धा नाही. त्यामुळं जात टिकून राहण्यास आरक्षण जबाबदार आहे म्हणाऱ्यांनी तो समज आधी डोक्यातून काढून टाकावा. जात टिकून राहण्यास आडनाव संस्कृती आणि विवाह संस्कृती जबाबदार आहे.(मुळात ही संस्कृती ज्या कारणाने सुरु झाली होती, त्या सोबतच हे परिणाम सुद्धा रुजायला लागले. कालांतराने मग जात दृढ होत गेली. विवाह संस्कृतीमुळं आणि आडनावाच्या संस्कृतीमुळं जात टिकून आहे. व राहील सुद्धा. ती नष्ट करायची असेल तर तुमची आडनाव संस्कृती नष्ट करावी लागेल. सोबतच मनात रुजलेली व्यक्तीबद्दलची दुय्यमता नष्ट व्हावी लागेल. तेव्हाच हे शक्य आहे. अन्यथा सर्व मलमपट्टी ठरेल यात तिळमात्र शंका नाही.

      

       ई.स.पूर्वी सुरु झालेली ही जात टिकून राहण्यासाठी पारंपरिक व्यवस्था जबाबदार आहे. या व्यवस्थेत जात ही जन्मनुसार प्राप्त होते. प्राप्त जातीनुसारच व्यवसाय करावा लागतो. जातीअंतर्गतच विवाह संस्कार व अन्य संस्कार करण्याचे बंधन लादलेले आहेत. ते बंधन तोडून कोणीही काम करू शकत नाही. जर जातीविरोधी काम केलं तर त्याला जातीतून बहिष्कृत केलं जात. त्याच्याशी कोणत्याही प्रकारचा मानवी व्यवहार टाळल्या जातो. आंतरजातीय विवाह केले तर खून घडल्याचे कित्येक प्रकरण आपण ऐकले असतील.(आंतरजातीय विवाह करणारे वडिलांची जात होणाऱ्या अपत्या पुढं वापरून ती जात संस्कृती पुढं चालवत असतात.) निस्सीम प्रेम करणारे सुद्धा काहीजण जातीच्या, धर्माच्या खोट्या प्रतिष्टेपायी आपल्या प्रेमाचा त्याग करतील. पण प्रेमाला स्वीकारणार नाहीत. अशी ही स्थिती आहे जाती संदर्भातील.

     जातीनुसार विविध प्रथा, सण, व्यवसाय, मान-अपमान या गोष्टी ठरलेल्या आहेत. एवढंच नाही तर जातीनुरूप  मृत्यू पश्चात क्रिया सुद्धा वेग-वेगळ्या आहेत.

      म्हणजेच जात निर्माण होण्यास व ती टिकून राहण्यास सुद्धा पारंपरिक व्यवस्था जबाबदार आहे. या व्यवस्थेला तडा देण्याचा प्रयत्न कोणीही करत नाहीत. जे प्रयत्न करतील त्यांना आपला जीव गमवावा लागतो.

        अशी भयंकर स्थिती या जातीबद्दल आहे. पण तरीही जात दृढ होण्यास आरक्षण ही संकल्पना कारणीभूत आहे अशी अर्धवट माहिती प्रसारित केल्या जाते. वरील काही माहितीचा विचार केल्यास आरक्षणाचा जातीशी काही संबंध आहे का ? हा प्रश्न स्वतःला विचारून पहा. त्याचे उत्तर काय येते हे पहा. मग ठरवा की, आरक्षणाचा जात दृढ होण्यास काही हस्तक्षेप आहे का ? तुम्हाला कळून येईल की, तुम्ही जे वाद वाढवत आहात ते पूर्णपणे निरर्थक आहे. असे निरर्थक वाद पसरवून तुम्ही तुमच्या आयुष्यातील महत्वाचा वेळ वाया घालवत आहात हे लक्षात घ्या.

      जात दृढ होण्यास आरक्षण कारणीभूत आहे म्हणणाऱ्यांसाठी काही मुद्दे, आरक्षणाचा विचार करत असताना आरक्षण हे का आणि कशासाठी आहे. हे आधी समजून घेऊया.

         राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानाचा कारभार हाती घेतल्यानंतर. समाजातील स्थितीचा आढावा आला. त्यातून त्यांनी समाजात प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीला समान अधिकार मिळावेत, जातीनुसार काम नाही तर कौशल्यानुसार,बुद्धिमत्तेनुसार काम मिळावं यासाठी जो पारंपरिक व्यवस्थेने दुर्लक्षित केलेला समाज होता त्या समाजाला प्रवाहात आणण्यासाठी म्हणून 26 जुलै 1902 रोजी आरक्षणाचा जाहीरनामा काढून संस्थानात 50% आरक्षण लागू केले.

         त्या आरक्षणाचा व तत्सबंधीत परिस्थिती व बाबींचा अभ्यास करून संविधानामध्ये आरक्षणाचा समावेश करण्यात आला. आता ज्या आरक्षणाचा काही विशिष्ट लोक विरोध करत आहेत. ते आरक्षण संविधानाने दिलेले आहे. त्या संदर्भात असलेली पार्श्वभूमील लक्षात घ्याल तर तुम्ही कदाचित हा विरोध करणे सोडून द्याल. पण  ज्या आरक्षणाचा समावेश संविधानात झाला आहे. ते आरक्षण फक्त एका जातीसंदर्भातच आहे का ? हा प्रश्न यासाठी आहे की “आरक्षणाचा विरोध हा फक्त एका जातीच्या विकासमूळ होतोय असं लक्षात येतंय” हे वाक्य मी कोणत्याही पूर्वग्रहातून बोलत नाही. मी जेव्हा अनेकांशी विविध विषयांवर संवाद साधतो त्यातून ही बाब समोर आली म्हणून हा मुद्दा सरळ सरळ तुमच्यासमोर मांडलेला आहे.

         संविधानामार्फत आरक्षण देत असताना फक्त एका समुदायाला नाही तर विविध प्रवर्गाला आरक्षण दिल आहे. त्यात ST-07%, SC-13%, OBC-19% SBC-2%, VJNT(A)-3%, VJNT(B)-2.5%, VJNT(C)-3.5%, VJNT(D)-2% या सर्व प्रवर्गाचा विचार करता आरक्षण हे फक्त एका घटकाला नाही आहे. हा या आरक्षणासोबत बाबासाहेबानी दिलेल्या विचारसरणीचा स्वीकार करून एक समाज पुढं आला आणि आपला विकास करून घेत आहे. पण विकास पाहून आरक्षणामुळं घोडा आणि गाढवाच्या शर्यतीचा विचार करत असाल, तर मात्र आपणास आरक्षण जरी भेटले तरी सुधारणा अशक्य आहे. विकास अशक्य आहे. कारण उदाहरण तुमच्यासमोर आहेत. आरक्षणाचा फायदा घेऊन SC प्रवर्गातील 59 जातींपैकी किती जाती सुधारल्या आहेत. याचा विचार स्वतः करा. त्यामुळं आरक्षण हे तुम्ही म्हणत असलेल्या गव्हा तांदळासाठी कालही न्हवते आणि उद्याही राहणार नाही. ही बाब समजून घ्या. 

       संविधानामुळं जे आरक्षण लाभलं आहे. त्यांच्या आरक्षणावर  जर तुमच्याकडे विचार करण्याची कुवत असेल तर एक शब्द सुद्धा तुम्ही बोलणार नाहीत. कारण ते आरक्षण का आणि कशासाठी दिल हे तुम्हाला समजून येईल. त्यातून तुम्ही हा मतभेद करणार नाहीत. त्यामुळं आरक्षणाची बाब समजून घ्या त्याबद्दल गैरसमज पसरवू नका. समाजात तेढ वाढवू नका. आपल्या सर्वांचे नाते प्रेमाचे आहे ते नाते टिकून राहण्यासाठी अशा दम देणाऱ्या घटनांना खत-पाणी घालू नका. कोणाच्या डोक्यात अशा कल्पना येत असतील तर त्या व्यक्तीला समजावून सांगा. अशा कल्पना त्यांच्याच डोक्यात येतात जे बिनडोक पणे वावरत असतात. कोणत्याही बाबीचा विचार करत नाहीत.

        हा विषय निघण्यासाठी जी स्थिती कारणीभूत आहे ती म्हणजे “मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती” या अरक्षणास अपील जे करण्यात आले. ते अपील कायदेशीर आहे म्हणून हा सर्व न्यायालयीन खेळ चालू आहे. आरक्षण देत असताना संविधानाच्या चौकटीसह अन्य बाबीचा विचार करून न दिल्यामुळं ही वेळ आलेली आहे. त्यामुळं न्यायालयीन कामकाजापेक्षा आपला रोष हा शासकीय प्रणालीबद्दल असायला हवा होता. निवडणुकीच्या पुढं हे आरक्षणाच गाजर मराठा समाजाला देऊन मते आपल्याकडे वळवण्याचं काम राजकारण्यांनी केलं. त्या स्थितीला आपण सर्वजण बळी सुद्धा ठरलात ही आपली खूप मोठी शोकांतिका आहे. आरक्षण हे कायद्यानुसारच आपणास हवं आहे. ते जर नसेल तर मग येणाऱ्या काळात कोणी जर अपील केलं असत. त्यानुसार मग हे आरक्षण रद्द झालं असत. तर त्याचे विपरीत परिणाम जे आरक्षणाचा फायदा घेऊन जॉब करत होते,त्यांच्या आयुष्यावर झाला असता. त्यांना कार्यमुक्त केल्यानंतर त्यांच्यावर जी स्थिती येत होती त्यास जबाबदार कोण राहील असत ? याचा विचार करणं गरजेचं आहे. हा जो न्यायालयीन लढा चालू आहे त्या लढ्याला यश आल्यानंतर आपणास जे आरक्षण भेटेल त्या आरक्षणाचा कोणत्याही व्यक्तीवर किंवा नागरिकांवर काहीही परिणाम होणार नाही. मग असे असताना या न्यायालयीन लढाईस विरोध करणे कितपत योग्य आहे याचा विचाहर करा.

        न्यायालयीन लढा म्हणजे ठोस आरक्षणासाठी दिलेला एकप्रकारचा तो लढाच आहे. तो लढा जर शासनाने जिंकला तर मग मिळत असलेल्या आरक्षणाबद्दल कधीही काहीही अडचण येणार नाही. याची जाणीव आपण करून घेणं गरजेचं आहे. आता दिल्या गेलेलं आरक्षण हे राजकीय स्वार्थापोटी दिलेलं आहे. ते संविधानाच्या चौकटीच्या बाहेर आहे. म्हणून ही न्यायालयीन लढाई सुरू झाली आहे. अन्यथा ही वेळ कधीही आली नसती.

        या सर्व बाबीचा विचार करा, संविधानात दिलेली नियमावली ही कोणत्याही एका समाजासाठी पोषक किंवा विरोधात नाही. संविधानाच्या प्रस्ताविकेतून जी मूल्य सामोरे येतात ते आपल्या जगण्याला आकार देतात. संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष ज्यांना संविधानाचे शिल्पकार संबोधनं गरजेचे आहे असे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील स्थितीचा अभ्यास करत प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी ही नियमावली तयार करून देशातील प्रत्येक नागरिकाला हितकारक अशीच आहे. अडचण आहे ती फक्त आणि फक्त अंमलबजावणीची. देशातील संविधानाची अंमलबजावणी करणारा घटक हा राजकीय नेते आहेत.

        या राजकीय नेत्यांना निवडण्याचा अधिकार आपल्या सर्वांना समान आहे. पण हा अधिकार एका दिवसासाठी दारू आणि मटनामूळ गहाण ठेवता आणि त्यांनतर पाच वर्षे ओरडत बसता. अशा या आपल्या दुटप्पी वागण्याचा फायदा घेऊन हे राजकारणी आपल्याला लुटतात. मग आपण यांना दोष देत बसतो. 

      खरी चूक आपली असताना सुद्धा असं करण्यामुळं लोकशाहीचा उपभोग आपणास मिळत नाही. त्यामुळं मतदानादिवशी सजग राहून योग्य पद्धधतीने तुम्ही तुमचा मताधिकार गाजवा. मग बघा तुमचे रस्त्यावरचे आंदोलन समता, शिक्षण, बेरोजगारी,गरिबी,छळ आदींसह सर्व समस्या नाहीशा होतील व देश जगात महासत्ता होण्यास वाटचाल करू शकेल.

©जी.संदीप (गोणार,नांदेड)

         9552803980

Thursday, September 10, 2020

दुःखाचा वियोग होऊन जाईल....





कोण म्हटलं जन्म एकदाच भेटतो

जन्म रोज होत असतो

पण मृत्यू मात्र आयुष्यात

एकदाच भेटत असतो


रोज भेटत असलेल्या

नव्या जन्माचा वापर करत रहा

एकदा मिळणाऱ्या मृत्यूला

कवटाळण्या पासून दूर रहा


मृत्यूला कवटाळने म्हणजे

जगणं सोडून देणे होय

आयुष्यात भेटणाऱ्या अनुभवाला

कायमचे दूर करणे होय


आयुष्यात दुःख आले तरी

अनुभव त्याचे घेत चला

आयुष्य हे अनुभवांनी समृद्ध बनवणे

हीच खरी जीवन जगण्याची कला


दुःख मिळाले म्हणजे

कसे वागायचे नाही हे कळते

चुका करतच राहिलो तर

नियमित दुःख मिळतच राहते


कधी इतरांच्या चुकांमुळं सुद्धा 

आयुष्यात दुःख मिळत असते

सोडून देऊन तो दिवस,विषय,काळ

आयुष्य पुन्हा नव्याने सुरु करायचे असते.


क्षणिक निर्णयाने तुम्ही

आयुष्य गमावू नका

तो क्षण कायमचा नव्हे आयुष्यातील

हे समजून घेऊन जगणं सोडू नका.


सोडाल जगणं तुम्ही तर

दुःखी होतील काही काळ आप्तेष्ट

पण तुमच्या जाण्याने 

तुमचे आयुष्य कायमचे होईल नष्ट


आयुष्य नष्ट झाले तर दुःख

त्रासातून व्हाल नक्कीच मुक्त

पण आयुष्य हे जगायचे असते काही कामांसाठी खास

नव्हे वैयक्तिक आयुष्यासाठी फक्त


स्वतःसोबत इतरांसाठी जगत असताना

जगण्याचा आनंद येत राहील

त्यातून दुःख व वाईट अनुभवांचा

वियोग होऊन जाईल.


© जी.संदीप(गोणार,नांदेड)

         ९५५२८०३९८०

Tuesday, September 1, 2020

विचार बदलावा लागेल.

 



धर्म मंदिरासाठी लढण्यात

आम्ही आमचा वेळ घालवला

तिकडे शासनाने मात्र शिक्षणाचा

खेळखंडोबा करून टाकला


आताही ते आम्हाला 

धर्माचा अफू पाजवत राहतात

आम्ही लढतो आप-आपसात

ते खुशाल स्वार्थ साधून घेतात


धर्म देव-देवता संदर्भातील वादाला

देऊन कायमची मूठमाती

विकास करण्या प्रत्येक व्यक्तिचा

शासनाला आणावे लागेल वठणीवरती


कोणताही देव-धर्म येणार नाही

करण्या विकास आमचा

शासन प्रशासन आहे जबाबदार

अविकासास आम्हा सर्वांच्या


विचारून त्यांना जाब राबवूया

करून घेण्या विकास आपुला

हे शक्य होईल तेव्हाच

जेव्हा विचार बदलू आपण आपला.

(मंदिर हि संकल्पना प्रार्थना स्थळांसाठी वापरली आहे)

© जी.संदीप (गोणार,नांदेड)

      मो: ९५५२८०३९८०

"भोंदूंचं साम्राज्य: तुमच्या भीतीवर उभा असलेला खेळ”

      मागील काही दिवसापासून एक नाव प्रकर्षाने चर्चेत आहे, सोशल मीडियावर सुद्धा त्याच व्यक्तीच्या नावाने विविध memes, पोस्ट viral होत आहेत. ए...