Wednesday, January 24, 2024

मतदार राजा




     भारतात कोठेही असलास, कोणत्याही जाती धर्मातील असलास, कितीही गरीब अथवा श्रीमंत असलास तरी तुझी किंमत कमी होणार नाही. वरील कोणत्याही गोष्टीवरून किंमत कमी जास्त होणार नाही. किंवा एखाद्याला जास्त किंमत मिळणार नाही. हा सन्मान तुला लोकशाहीने दिला आहे. सरपंच ते लोकसभा सदस्य निवडणूक कोणतीही असो, उमेदवार तुझ्या दाराला येतो, तू गरीब आहेस किंवा खालच्या जातीतला आहेस म्हणून तो तुझा सन्मान करणार नाही असं नाही. गावातील गडगंज संपत्ती असलेला व्यक्ती असो अथवा प्रचलित स्वघोषित उच्च कुलीन जातीतील व्यक्ती असो अथवा फुटपाथवर आपल आयुष्य जगणारा सामान्य भिकारी असो, या सर्वांना समान स्थरावर आणणारी ताकद म्हणजे मताधिकार होय. 

       लोकशाहीत मताचा अधिकार तुमचं भविष्य ठरवत असते. तुमचं भविष्य हे नशीब किंवा तळहातावरील रेषा ठरवण्याचा काळ 1956 सालीच नाहीसा झाला. एक नविन बळ तुमच्या एका बोटात संविधानाने दिलं तो अधिकार सन्मानाने बजावा. तुमचं भविष्य उज्वल घडवण्यासाठी हा मताधिकार आहे.

        भावकीतील उमेदवार आहे, एक कोंबडी आणि दारूची बॉटल आठ दिवस तुला भेटते म्हणून, धर्मासाठी ते मोठ मोठाले मंदिर बांधतील, धर्माच्या नावावर अन्नछत्र सुरू करतील, तुला फुकटच खायला देतील, तुला तुझ्या कुटुंबाला सबसिडी च्या नावावर पैसे देतील. हे असल सगळ तुला स्वतः कमवता येते, धर्माची श्रद्धास्थान निर्माण करणं हे धर्माचे अनुयायी म्हणून आपली जबाबदारी आहे. ते उभारण्यासाठी आपण सक्षम होऊ एवढं कवण्याच सामर्थ्य आणि साधने उपल्ब्ध करून देणं हे त्यांची जबाबदारी असते हे तू ओळख आणि असे धर्म, मटण दारू, फुकटचे पैसे देणाऱ्या उमेदवाराला तू तुझ मत कधीचं देऊ नकोस.

       आज तू मला वर्षाला 12000, मोफत राशन मिळत आहे, मझ्या धर्मातील देवांचे मंदिरे बांधली जात आहेत, याची जाणीव ठेवून तू मतदान करशील तर तुझ्या येणाऱ्या पिढीसाठी काय आदर्श ठेवशील.

         आयुष्यात जन्म घ्यायचं सत्ताधारी जे फुकट देतील त्यावर जस जमेल तस आयुष्य जगायचं. स्वतः कष्ट करण्याच्या संधी ची मागणीच करायची नाही का ? देशात तरुण वर्ग म्हणून मिरवत असताना तो तरुण सोशल मीडियावर आपल नको ते मत व्यक्त करून वाद घडवून आणत असेल आणि त्यातच तो गुंग राहत असेल तर मग त्याच्या आयुष्यच काय होणार ? आज आई वडील म्हणून तुम्ही त्याची जबाबदारी शेवटच्या श्वासापर्यंत उचलाल पण त्यानंतर त्याच आणि त्याच्या कुटुंबाच काय होणार ? नशिबावर सोडून देणार का ?

        तुमच्या येणाऱ्या पिढ्या दुबळ्या होऊ द्यायचा नसतील, सन्मानच जीवन जगायचं असेल तर त्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणा. खाजगी शिक्षण नाही तर शासकीय शिक्षणाचे मार्ग खुले झाले पाहिजेत याकडे लक्ष द्या. शासनाने नागरिकांना फुकट काही देण्यापेक्षा त्यांच्यात  कमवण्याच बळ आलं पाहिजे. उत्तम शिक्षण मिळाले पाहिजे, शिक्षणानुसार रोजगार मिळाला पाहिजे, रोजगाराच्या संधी निर्माण करण हे सर्व शासनच काम आहे. तुमच्या नशीबाचा यात काहीच दोष नाही. नशिबावर दोष देऊन तुम्हाला गुलाम ठेवण्याचं काम व्यवस्थेने केले आहे.

        या सगळ्या गोष्टी ज्ञात करून घेऊन व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवला म्हणून तुम्हाला शिक्षनापासून दूर ठेवलं जातं. शिक्षणात तुमच्या बुद्धीचा विकास होणार शिक्षण दिलं जातं नाही ? तुम्ही कारकुनी कर्मचारी व्हाल हीच व्यवस्था निर्माण केली जाते ? त्या व्यवस्थेत तुम्ही नशिबाला दोष देऊन मोकळे होता.

        असं होऊ द्यायचं नसेल तुम्हाला तुमचं सन्मानाच आयुष्य जगायचं असेल तर आज संकल्प करूया, मी माझ मत कोणत्याही परिस्थिती विकणार नाही, मी माझं मत धर्माच्या नावावर कधीच देणार नाही, मी माझं मत त्याच उमेदवाराला देईल जो इथल्या नागरिकाच्या आयुष्याचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करेल, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासोबत त्याच्या साठी शिक्षणाच्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण करेल, कोणत्याही पद्धतीचं कोणतीही गोष्ट फुकट देणार नाही, वस्तूची किंमत चार रुपये ठेवून सबसिडी च्या नावावर एक रुपया देऊन आम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करणार नाही. बाजारातील कोणतीही वस्तू योग्य त्याच दरात मिळेल, त्या वस्तूच्या कच्च्या मालाची निर्मिती करणाऱ्याला योग्य दर दिल्या जाईल. देशातील कोणताही कामगार असो वर्ग एक ते वर्ग चार किंवा संघटित असंघटित कामगार असो या सर्वांना समान सन्मान देण्याची व्यवस्था जे शासन करेल त्यांनाच या मताधिकाराद्वारे निवडून देईल. अन्यथा त्या शासनाला मी सत्तेत संधी देणार नाही.

        असा विचार कराल तरच संविधानाने तुम्हाला दिलेल्या मताच्या अधिकाराचा सन्मान होईल आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला सन्मान मिळेल.  लोकशाहीची योग्य वाटचाल सुरु राहील. पर्यायाने समृद्ध भारत घडेल भारतातील प्रत्येक नागरिक सन्मानाने जगेल. भारतातील प्रत्येक नागरिक जर सन्मानाने जगाला तर देशाचा जि.डी.पी. उचावेल सोबतच दरडोई उत्पन्न सुद्धा वाढेल मग देश सुजलाम सुफलाम होण्यापासून कोण रोखेल ?

      हे सर्व घडण्यासाठी तुम्ही एक मतदार राजा आहात म्हणून तुम्ही तुमची योग्य जबाबदारी पार पाडा.

©जी.संदीप (गोणार,नांदेड)

9552803980

Wednesday, January 17, 2024

स्वतःचा मेंदू वापरा

 




मित्रांनो,

जरा डोळस व्हा रे !

देव ही दुय्यम गरज आहे

जरा प्राथमिक गरज ओळखा रे.


अश्मयुगात समूहाने राहताना पोटाच्या भुकेनंतर

शारीरिक भुकेकडे लक्ष दिलं जायचं

अविकसित काळातील लोकांना समजलं

मग तुमच्या डोक्यात कधी यायचं ?


बुद्धिवान प्राणी म्हणून

विविध शोध लावत गेलो

कधी स्वतः वेडे ठरलो तर

कधी दुसऱ्यांना वेड्यात काढण्यास धन्य मानलो.


विविध शोध लागत असता

मनोरंजनावर येऊन ठेपलो

मानवी मनातील भीतीचा आधार घेत

देवाचा शोध लावून ठेवलो.


तो जर आहे तर,

जन्मावेळीच आपल्या मनात विचार टाकेल

त्याची आराधना करण्यासाठी

सगळे मार्ग आधीच सांगून टाकेल


मानवाने निर्मिलेल यंत्र सुद्धा

कमांड दिली तसेच काम करते

तशाच कमांड देवानेही आपल्यात दिल्या असत्या

हे तुम्हास का नाही उपजते ?


देव आहे हे मान्य करायचं

बिनधास्त करा ना रे !

त्या देवासाठी तुम्ही आप आपसात भांडता

हे तुमच्या देवाला तरी मान्य होईल का रे ?


देवाच्या नावावर तुम्हाला ईथ

एक मेकांत लढवल जात

ती लढाई चालू असताना

संविधानिक हक्क अधिकारापासून दूर ठेवलं जातं


हक्क अधिकारच मोल

तुम्हा कधीच समजू दिलं जात नाही

कारण, एखादी गोष्ट मिळत नसेल

तर रुजवलं जात की, "ते तुमच्या नशिबातच नाही."


त्या नशिबाचा निर्मिक(बनवणारा) देव असेल

तर तो देव चुकीचा आहे का ?

एखाद्याकडे गडगंज संपत्ती द्यावी आणि

दुसऱ्यास एकवेळच्या जेवणासाठी मोताज ठेवावं का ?


गडगंज संपत्तीवाला निडरपणे शेकडो चुका करतो

तरी त्याला त्याच्यावर देव कोपण्याची भीती नसते

पण सामान्य गरीब माणूस रस्त्यावरून चालताना

मुंगीवर पाय पडत असताना हजार वेळा विचार करतो.


शुद्ध निर्मळ अशा गरीब मनावर

देव तुमचा कोपतो का रे ?

गरिबांना तासो-न-तास रांगेत उभा करतो

आणि श्रीमंतांना सेकंदात दर्शन देतो असे का रे ?


अशा तुमच्या एका देवाच

भल मोठ मंदिर उभारल्या जातंय

ते मंदिर पूर्ण होण्याआधीच तिथं

म्हणे त्यांची प्राणप्रतिष्ठापना केली जातेय


तिथे त्या देवाचा मोठेपणा करायचाय

का ? राजकारण्यांना मते मागायचीत ?

कारण ! प्राणप्रतिष्ठापना झाल्यावर सुद्धा

कामाच्या कारणास्तव देव दर्शन बंद राहील

राजकारण्यांचाच जर असेल हा डाव

तर तुमच्या भावनेशी खेळणाऱ्यांना करून टाका पायचित


किती म्हणून त्या राजकारण्यांची बाजू घेत

तुमच्या विकासाचे मार्ग बंद करून घेणार

धर्माच्या नावावर तुमचा वापर करून घेऊन

ते तुमच्या पिढ्यांच वाटोळ करून टाकणार.


हेच बघा ना, तुम्ही आरक्षणासाठी लढत असताना

कंत्राटी भरतीचा शासन निर्णय काढून ते मोकळे झाले.

आरक्षण जरी तुम्हा दिले तर हे लक्षात घ्या

त्याच्या अंमलबजावणीचे सगळे रस्ते बंद केले.


त्यामुळं धर्माच्या नावावर होत असलेलं तांडव

थांबवण्यासाठी त्यांना विरोध करा रे

अन्यथा पुन्हा परकियांची

गुलामी स्विकाराया तयार व्हा रे.


त्यावेळी तुम्ही पुजलेला

कोणताही देव धावून येणार नाही

हे इतिहासावरून सिद्ध होतंय

मी मनाच काहीही सांगत नाही


इतिहासावर नजर टाकाल तर

मानवी क्रांत्याच निदर्शनास येतील

कोणत्याही देवाने तुमची सुटका केली नाही

याची पावलोपावली दाखले दिसतील


देव मानायचा का न मानायचा

हे तुमचं स्वातंत्र्य अवडीने जपा

देवाच्या नावावरील गोष्टीत स्वतःला किती गुंतवायच

हे ठरवण्यासाठी मात्र सदैव स्वतःचा मेंदू वापरा.

©जी.संदीप (गोणार,नांदेड.)

           9552803980

Friday, January 12, 2024

हे तरुणा भवितव्य तुझ...

 




सत्याचा आव आणि संघर्षाचा घाव आहे तरुणाई, 

अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारा आवाज आहे तरुणाई, 

देशाचा स्वाभिमान व कणा आहे तरुणाई 

जर भेटली तरुणाईला योग्य वेळी योग्य साधने तर,

 देशाचा भविष्यकाळ सुवर्णाक्षरात लिहून टाकेल ही तरुणाई.


जगभरात मिरवतो आम्ही अभिमानाने

सर्वात तरुण देश आहोत म्हणून,

पण तरुणाई इथली भरकटली आहे

योग्य व अचूक दिशा नाही म्हणून.


धर्म-जात यांत गुरफटवल्या जातेय

इथल्या बहुतांश तरुणांना

मग मिशन 20-20 अधुरे राहिल्याचे

का दुःख होणार नाही कलामांना ?


तरुणाई भरकटण्यास राज्यव्यवस्था जबाबदार आहे

माँ साहेबांसारखा मार्ग दाखवण्याऐवजी

जात-धर्मा सोबत सोशल मीडियाची अफू

तरुणांना इथल्या पाजवल्या जात आहे.


त्यातूनच ही तरुणाई ठरत आहे अक्कलशुन्य व बिनडोक

सम्यक विचार गेले हे विसरून

सोशल मीडियाद्वारे मोबाईल डाटा वापरत 

पारंपरिक विषयात बसलेत आपले नाक खुपसून


अशा तरुणाईला कसे समजावे आदर्श ?

देशाचा स्वाभिमान व कणा ?

याची जाणीव तुज होईल का रे ? 

आयुष्यात कधी तरी तरुणा ?


तुला अस घडवण्यात जी व्यवस्था जबाबदार आहे

तिला प्रतिप्रश्न करायला शिकशील का ?

आजच्या युवा दिनी तरुण असण्याच भान ठेवून

व्यवस्थेला वाकवण्याची ताकद स्वतः मध्ये निर्माण करून घेशील का ?

२*२ च्या जागेत दिवस रात्र उद्याच्या उज्वल भविष्याचे

स्वप्न घेऊन पुस्तकांसोबतच जगणारा तू

त्याच भविष्याची राखरांगोळी करणाऱ्या शासनाला 

का डोक्यावर घेऊन मिरवतोस तू .


अरे वेड्या !  धर्मप्रेमी असलेला तू,

तुला अजून कस नाही कळत ?

ते धर्मासाठी नाही स्वतः ला हव्या असलेल्या खुर्चीसाठी,

तूला गर्व असलेल्या धर्माचा वापर करतात.


त्या शासनाला जाब विचारण्यासाठी 

स्वतःला सक्षम बनवत रहा.

धर्माला लावून आग माणूस म्हणून जगण्यासाठी 

व्यवस्थेला धारेवर धरत रहा.


हे तरुणा,

धर्म तुला सन्मान देऊ शकत नाही रे !

त्यासाठी तुलाच उत्तम कर्तव्य करावे लागेल.

त्या उत्तम कर्तव्यासाठी 

संधी निर्माण करणे शासनाचे आहे कर्तव्य

ही बाब ओळखून व्यवस्थेला बोटावर नाचवण्याच

बळ तूला अंगीकाराव लागेल.


व्यवस्था निर्माण करण्याच सोडून देऊन 

तू व्यवस्थेत सामील होऊ नकोस रे !

व्यवस्थेचा गुलाम होऊन वागण्यापेक्षा

व्यवस्थेला झुकवायला शिक रे !


आयुष्यात कर्तव्य सगळ ठरवत असते,

नशिबाच काहीच नसत आपल्या आयुष्यात देण-घेण रे !

आवश्यक त्या संधी आणि आपले प्रयत्नच  

आपला विकास करतात हेच आपल नशीब रे !


:-  जी.संदीप(गोणार, नांदेड.)

९५५२८०३९८०

"भोंदूंचं साम्राज्य: तुमच्या भीतीवर उभा असलेला खेळ”

      मागील काही दिवसापासून एक नाव प्रकर्षाने चर्चेत आहे, सोशल मीडियावर सुद्धा त्याच व्यक्तीच्या नावाने विविध memes, पोस्ट viral होत आहेत. ए...