Monday, November 6, 2023


 पुजारी व्हायचं असेल तर तुम्ही ----- धर्माची दीक्षा घेतलेले असेलच पाहिजे. तरच तुम्हाला पुजारी होता येईल. हे अघोषित आरक्षण नव्हे का ? मुळात आरक्षणाची सुरुवात इथूनच तर झाली आहे ना. मग हे पिढ्यानपिढ्या स्वतःकडे ठेवलेलं आरक्षण दिसत नाही का ? 

        पुजारी व्हायचं असेल तर विशिष्ठ पद्धतीची पूजा करता आलीच पाहिजे, तरच पुजारी होता येईल. अन्यथा नाही, तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाईल त्यानंतर तुमची नियुक्ती केली जाईल. पण तुम्ही विशिष्ठ धर्मातील विशिष्ठ जातीचे असणे खूप गरजेचे आहे. तुम्ही त्या विशिष्ठ जातीतील असाल त्यासाठी आवश्यक काही पात्रता नसेल तरी ती तुमच्यात विकसित केली जाईल. पण त्यासाठी तुम्हाला त्या विशिष्ठ जातीत असल्याचे सिद्ध करावे लागेल.

        हे जे अघोषित आरक्षण आहे ते कशाच्या आधारावर आहे ? या भेदाचे कारणीभूत कोण आहेत ? एखाद्याला पूजा करता येत नाही पण त्याची इच्छा आहे ते काम करण्याची मग त्याला संधी मिळेल का ? तो धर्माने हिंदू आहे पण जात वेगळी आहे. त्याला संधी मिळेल का ? नाही मिळणार ना ? का नाही मिळणार ? या प्रश्नांचे उत्तर जर तुम्ही शोधाल तर तुम्हाला आरक्षणाचे मूळ कुठे आहे ते कळेल. 

          आरक्षणामुळे काही समजातील विद्यार्थी विशिष्ठ नोकरीसाठी प्रशिक्षित नसताना त्यांना नोकरीवर घेतले जाते. त्यानंतर त्यांना प्रशिक्षित केलं जातं. कारण त्या समाजाला सुद्धा अभिमानच जगणं बहाल करायचं असतं, भारतातील प्रत्येक नागरिक हा समान पातळीवर यावा त्यांना संधी मिळावी. ज्यांना संधी दिली जात नाही  त्यांना संधी देण्यासाठी म्हणून आरक्षणाची वहिवाट निर्माण केली गेली आहे.

         तसेच आरक्षण या पुजाऱ्यांच्या बाबतीत सुद्धा असते पण त्याला जात आडवी येते. तुम्ही जर त्या विशिष्ट जातीतील नसाल तर तुम्हाला पुजारी होण्याचा काही एक अधिकार उरत नाही. तुमची कितीही इच्छा असली तरी तुम्हाला ती संधी मिळणारच नाही. त्याच धर्मातील व्यक्तीकडे पात्रता नसेल, तरी सुद्धा त्याला ती संधी दिलीच जाते. पण इतर धर्मियांना ती संधी देणे शक्यच नाही. मग हे आरक्षण कोणासाठी आणि कशासाठी आहे ?

         या सर्व बाबींवर जर विचार केला तर सरळ एक मुद्दा लक्षात येतो की, आरक्षण हे आजचे किंवा संविधानातील नाही तर हे आरक्षण तुमच्या पारंपरिक संस्कृतीत रुजलेले आहे. संविधानाने दिलेल आरक्षण संपवायचे असेल तर आधी हे अघोषित आरक्षण संपवावे लागेल. मग कुठे या आरक्षणाच्या विरोधात बोलण्याचा अधिकार तुम्हाला  प्राप्त होईल. अन्यथा तुमच्या आरक्षण बंदीच्या गाजराच्या पुंग्या मोडून खाल्याविना कोणीच राहणार नाही हे लक्षात असू द्या.

शेवटी बोलायला भाग पाडलच तुम्ही !




काही मुद्दे, काही जणांची मानसिकता विचारात न घेता गप्प राहिलो होतो. आरक्षण म्हणाजे काही जणांना फक्त बौद्ध समाजचं दिसतो. पण हा चष्मा उतरवून टाका मित्रांनो. बौद्ध समाजाचा विकास होण्यास जेवढं आरक्षण कारणीभूत आहे त्यापेक्षा जास्त बाबासाहेबांनी दिलेला मानवतावादी विचारसरणीचा बुद्धांचा धम्म आणि  सन्मानाने जगण्याचा बाबासाहेबांनी दिलेला संदेश(आदेश). बुद्धांची विचारसरणी आणि बाबासाहेबांचा संदेश सोडला तर आरक्षण एससी संवर्गातील 59 जातींना आरक्षण आहे. 58 जातींना सुद्धा बौद्धाएवढेच आरक्षण आहे. पण त्यांचा विकास झाला नाही. मग आरक्षण ही एकच गोष्ट विकासात कारणीभूत आहे असे तुम्हाला वाटते का ? त्याबद्दल नक्कीच विचार व्हावा.

          *घोड्याच्या शर्यतीत गाढवे सुद्धा जिंकायला लागलीत, 2 रुपये किलो गहू आणि 2 रुपयाच्या तांदळासाठी नाही मागत आरक्षण.* आरक्षणाचा आणि राशन दुकानावर भेटणाऱ्या मालाचा काय संबंध हेच कळत नाही. या वाक्यावरून कीव येते तुमच्या त्या विद्वत्तेची 😅 

    पण त्या वाक्यातील द्वेषमूलक शब्द आहेत ना, त्यातून निदर्शनास येणाऱ्या तुमच्या मानसिकतेसाठी आरक्षणाची गरज आहे. संविधानात मिळालेलं आरक्षण हे सुद्धा 2 रुपये गहू आणि तांदळासाठी दिलं नव्हत एवढं सुद्धा तुम्हाला कळू नये. यावरून तुम्ही किती बे अक्कल अहात हे यातून सिद्ध करताय.

आणि तोंड वर वरून गुणवत्तेच्या थापा मारताय ? 

        गुणवत्ता काय असते हे आम्हाला विचारताय तुम्ही ? अरे घरच्याच शाळेत परीक्षा केंद्र असताना, शाळा सुद्धा घरचीच असताना एकही दिवस शाळेत न जाता, एवढंच काय परीक्षा केंद्रावर सुद्धा तुम्ही उपस्थित न राहता 90% मार्क्स घेणारे तुम्ही.  आम्हाला गुणवत्तेच्या गप्पा मारतात, सीईटी द्वारे मेडिकल ला प्रवेश नाही लागला. तर पैसे भरून शिक्षण घेणारे तुम्ही, कॉलेज उपस्थित नाही रहावं वाटल तर वडिलांच्या दबावाने पास होणारे तुम्ही, डी.एड साठी शासकीय फेरीतून घरा जवळच कॉलेज नाही भेटल तर हजारो रुपये डोनेशन भरून घराजवळच कॉलेज घेऊन कॉलेजला न जाणारे तुम्ही. शिक्षक म्हणून नोकरीवर जॉईन होऊन सुद्धा नोकरीला जाण्याची गरज पडणार नाही म्हणून घरच्याच संस्थेत घरी बसून पगार उचलणारे तुम्ही, मुलाखतीच्या नावाखाली भरतीत लाखो रुपये देऊन गुणवंत विद्यार्थ्यांना डावलनारे तुम्ही ? आम्हाला गुणवत्तेची भाषा शिकवता काय ? 

       मान्य करूया की तुम्ही अक्कलवान आहात, मग इतके वर्ष तुम्हाला आरक्षण का मिळू शकलं नाही, याचं उत्तर तुम्ही मिळवू शकले नाही ? मित्रांनो आरक्षण हे 2 रुपये गहू आणि 2 रुपये तांदळासाठी आहे अस तुम्हाला वाटते यावरून कळते की तुम्ही किती अक्कलवान आहात.

         मित्रांनो कीव येते रे तुमची, तुमच्याकडे भरमसाट असताना सुद्धा जेव्हा दुसऱ्याच्या ताटात असलेलं  बघून तुमचा जीव तळमळ करतो. आज तुमच्यावर आरक्षण मागण्याची वेळ का आली ? शैक्षणिक संस्था या जास्तीतजास्त तुमच्याच आहेत ना ? मग त्या शैक्षणिक संस्थेत शिकण्यासाठी किती फिस आकारावी याबद्दल काहीच नियमावली नाही ? जो गब्बर येऊन पैसे देईल त्यालाच एडमिशन दिलं जाईल. ही स्थिती कोणी निर्माण केली रे मित्रा ? तुमच्यात काही गरीब आहेत, मान्य आहे. पण त्या गरीबांना वर आणण्यासाठी सोबतच्या समाजाने मदत करायला हवी ना ? सर्व सुविधा उपलब्ध असताना, आपल्या पाल्याला गुणवंत बनवून इतर ठिकाणी जॉब साठी पाठवून, त्याच ठिकाणी समाजातील अन्य गरीब आणि गुणवंत विद्यार्थ्यांना व्यवसायाची संधी देऊ शकले असते ना ? पण तशी संधी दिली का ? तसे न करता आपला मुलगा कसाही वागला तरी त्याला त्याच स्वातंत्र्य देऊन स्वैराचाराला मार्ग मोकळा करून दिला. कुठे दुसऱ्या ठिकाणी नोकरी करण्याची काय गरज आपल्याच शैक्षणिक संस्थेत कामाला लावलं. त्या पाल्याच्या गुणवत्तेतून कितीही पिढ्या बरबाद झाल्या तरी काही संबंध नाही. यातून सर्व काही मलाच मिळालं पाहिजे ही मानसिकता दिसून येते. जर ही मानसिकता असेल तर समाज म्हणून सोबत राहण्याला अर्थ तरी काय उरतो ?

 मित्रांनो तुमच्याकडे चार पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती होती ना ? मग त्या संपत्तीचं योग्य नियोजन का करता आल नाही तुम्हाला ( आमच्या हातात ते काही नव्हतच आम्ही काय करणार?) अस म्हणून स्वतः ला त्या मानसिकतेतून दूर नेण्यात काही अर्थ नाही. कारण तिचं मानसिकता मित्रानो तुमच्यात सुद्धा रुजलेली आहे. त्यापेक्षा कैकपट जास्त स्वार्थी ही पिढी होत आहे. 

     मिञांनो जो समाज एकवेळच्या जेवणाला मोताज होता, तो समाज आज पंचपक्वान खातोय. सोबतच समाजासाठी आपला वेळ आणि पैसा सुद्धा खर्च करतोय, सोबतच येणाऱ्या पिढीसाठी शक्य तेवढी तजवीज करतोय.हा सर्व बदल कशामूळे झाला आहे अस तुम्हाला वाटत ?  फक्त आरक्षणामुळे ? नाही मिञांनो आरक्षणासोबतच त्यांचा आदर्श बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार हा सुद्धा तितकाच कारणीभूत आहे. मिञांनो ज्या सामजाच आरक्षण पाहून तुमच्या डोळ्यात खुपते ना त्या समजाकडे जेवढं काही होत, त्यापेक्षा कैकपट संपत्ती तुमच्याकडे होती. पण तुमचे नाद तुम्हाला गप्प राहू देतील तरच ना ? त्या नादातच तर आहे नाही ती संपत्ती गमवून बसलात. यासाठी खूप काह दाखले उपलब्ध आहेतच.

   काही जण म्हणतील की, कुटुंबाची विभागणी झाली म्हणून आम्ही गरीब झालोत, आमच्याकडे असलेल्या संपत्तीचं विभाजन झाल आणि आज आम्हाला शिक्षण घेण्यासाठी जास्त फिस द्यावी लागते आणि ती फिस देण्याची आमची ऐपत नाही. म्हणून आम्हाला आरक्षणाची गरज आहे असे जे ओरडताय ना ? ही भरमसाट फिस भरण्याची वेळ कोणी आणली रे ? मागासवर्गाने ही जास्त फिस(डोनेशन) ची प्रथा सुरू केली का ? मित्रांनो लाखो रुपये डोनेशन देऊन शिक्षण घ्यायला सुरुवात कोणी केली रे मित्रांनो ? मग मित्रानो ज्यांनी डोनेशन ची प्रथा सुरू केली त्यांच्या विरोधात तुमचा आवाज शांत का ? त्यांच्याविरोधात बोला ना.  त्यांना आरक्षण आहे तर आम्हालाही आरक्षण मिळाले पाहिजे, ते कमी पैशात शिक्षण घेतात मग आम्हाला पण कमी पैशात शिक्षण मिळालं पाहिजे हा असा द्वेष का ? आपल्याकडे जे नाही ते शासनाकडून प्राप्त कसे करून घेता येईल हे बघा ना. कारण ते शासन तिथे तुमच्या आमच्या विकासासाठी बसले आहे ना. मग तुमच्या विकासात येत असलेले अडथळे नाहीसे करण्यासाठी शासन काम करत नसेल तर त्या शासनाला जाब विचारायचा अधिकार आपणास आहेच ना ? हे शासन जर उत्तर देतच नसेल तर मग त्या शासनाला पुन्हा संधी न देण्याचा अधिकार सुद्धा तुमच्या हातात आहेच ना ? मग तुमच्या त्या ताकदीचा कधी वापर करणार आहात का नाही ? का फक्त समाजात तेढ वाढेल याचाच विचार करणार आहात ?

        मिञांनो महाराष्ट्रात एकूण  510 जाती आरक्षण घेतात. त्यापैकी फक्त एकच जात तुम्हाला दिसते का ? ज्या जातीबद्दल तुमच्या मनात आकस आहे ना त्या जतीसोबत  अन्य 58 जाती सुद्धा आरक्षण घेतात तरी त्यांच्याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही.  असा भेदभाव का बर मिञांनो ? त्यांनी तुमचं काही वैयक्तिक नुकसान केलं आहे का ? तुम्हाला कोणती हानी पोहचवली आहे का ? तुम्हाला किंवा तुमच्या पिढ्यांना काही शारीरिक, मानसिक त्रास दिला आहे का ? मग हा एव्हढा द्वेष का आणि कशासाठी ?

         त्या एकाच जातीतील लोक पुढं आले आणि स्वतः ला विकसित करून घेतले. कारण त्यांना त्यांच्या मार्गदात्याने सांगितलं होत की, बाबाहो तुम्ही शिका, तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची पुस्तके घ्या आणि एक रुपयाचा अन्य उपयोगी खर्च करा. त्या समाजाला माहीत होत की, आपला विकास करून घ्यायचा असेल तर दुसरा कोणीच येणार नाही. कोणताच देव येऊन त्यांचा विकास करणार नाही. या जाणिवेतून त्या समाजाने स्वतः ला झोकून देऊन आपल्याला हव्या त्या गोष्टीची पूर्तता करून घेतली. परिस्थिती नव्हती, पोटाला पीळ देऊन आई वडिलांनी त्यांच्या शिक्षणासाठी आपल्या रक्ताच पाणी केलं. परिस्थिती प्रतिकूल असताना स्वतः ला सावरत प्रत्येक गोष्टीवर मात करत तो समाज आज इथपर्यंत पोहचला.  तोच विकास अन्य 58 जातींना का प्राप्त करून घेता आलं नाही ? त्यांचा विकास झाला म्हणजे त्यांनी कोणाच्या ताटातील हिसकावून घेतले नाही, किंवा त्यांना आहे तर मला का नाही म्हणून आकांडतांडव केलं नाही. याचा नक्कीच विचार करावा.

       मिञांनो तुमच्याकडे असलेल्या संपत्तीचा वापर कुठे केला ? याचा विचार केला तर तुमच्या लेखी शिक्षणाला महत्वच नव्हत ना. ज्या काळी हा उपेक्षित समाज शिक्षणाच्या प्रवाहात आला तेव्हा तुम्ही तुमच्या संपत्तीची उधळण करत होतात. आम्ही शिक्षण घेऊन दुसऱ्याची गुलामी करावी काय ?  या आविर्भावात तुम्ही वावरत होतात.  आज  त्याच मानसिकतेने तुम्हाला रस्त्यावर आणल आहे. अशीच मानसिकता ठेवाल इतरांबद्दल द्वेष मनात राहील तर ती मानसिकता उद्या कुठे नेऊन ठेवलं याचा विचार व्हावा.

         उद्या आरक्षण भेटल्यावर सुद्धा आरक्षणाबत आणि विशिष्ठ समाजाबद्दल तुमच्यात तीच मानसिकता टिकून राहिली तर येणारा काळ खूप घातक ठरेल. स्वतः ला आणि समजाला समोर न्यायचं असेल तर, धर्माची कट्टरता बाजूला ठेवावीच लागेल. जातीला बाजूला ठेवून जर तुम्ही पुढं याल आणि सर्व समाज हातात हात घालून सोबत पुढे गेला तर राज्याचा, राज्यातील प्रत्येक नागरिकांचा सर्वांगीण विकास होईल. 

        अशी कोणत्याही प्रकारची भीक शासनाकडे मागण्याची वेळ येणार नाही.  शासन आपल्याला हव्या त्या सुविधा नक्कीच निर्माण करेल. पण त्या सर्वांत आधी आप - आपसात जी धर्मांधतेची कट्टरता टिकून आहे ती नष्ट व्हावी लागेल तरच हे शक्य आहे. अन्यथा धर्म आणि जातीच्या नावावर राजकारणी आपली पोळी भाजून घेतली तुम्ही भीक मागत रस्त्यावर उतरत रहा. एवढीच आपली लायकी उरेल अन्य काहीही भेटणार नाही एवढं मात्र नक्की.

© जी.संदीप (गोणार,नांदेड.)

              9552803980

"भोंदूंचं साम्राज्य: तुमच्या भीतीवर उभा असलेला खेळ”

      मागील काही दिवसापासून एक नाव प्रकर्षाने चर्चेत आहे, सोशल मीडियावर सुद्धा त्याच व्यक्तीच्या नावाने विविध memes, पोस्ट viral होत आहेत. ए...