मागील काही दिवसापासून एक नाव प्रकर्षाने चर्चेत आहे, सोशल मीडियावर सुद्धा त्याच व्यक्तीच्या नावाने विविध memes, पोस्ट viral होत आहेत. एवढेच नाही तर गुगल ला सर्वात जास्त शोधल्या गेलेल्या व्यक्तींमध्ये तेच नाव आहे. एवढ सगळ कशामुळे तो व्यक्ती खरंच चुकीचा वागला का ? तर त्याचे उत्तर आहे हो तो 100% चुकीच वागला. स्वतःची पत्नी असताना स्वतःच एक अस्तित्व असताना हिंदू संस्कृतीनुसार एक पत्नित्व हे आदर्शवाद असताना तो इतर महिलांशी असे असभ्य कृत्य करतो म्हणून तो गुन्हेगारच आहे. पण हा गुन्हा करण्यास त्याला सुरुवातीपासून पाठबळ देणारे किंवा त्याला अप्रत्यक्षरित्या मोठ करणारेही तितकेच गुन्हेगार आहेत त्याचं काय ?
तो खरात जेव्हा सुरुवातीला हे भोंदूगिरीच दुकान मांडला तेव्हा त्याला समर्थन देऊन त्याच्याकडे आपल्या ओळखीतले लोक पाठवणारे गुन्हेगार नव्हेत का ? संविधान विज्ञानाची कास धरा हे सांगत असताना अशा भोंदूगिरीच्या मागे लागून अनर्थ होतो हे समजत नसेल तर त्या खरात ला दोषी ठरवून काय साध्य होणार आहे ? पुरोगामी महाराष्ट्र म्हणून शिव,फुले,शाहू,आंबेडकरांचे नाव रोज घेत असताना या चारही महापुरुषांनी कधी अशा गोष्टींना थारा दिला का ? शिवराय युद्धासाठी कोणती वेळ चांगली आहे हे बघण्यासाठी कधी कोणत्या ज्योतिषाकडे गेले काय ? स्वतःला मूल होत नाही म्हणून महात्मा फुले कधी कोणत्या बाबा बुवाकडे गेले काय ? देशावर इंग्रजांच आक्रमण असताना ते देशासाठी घातक आहे त्यांना देशाच्या बाहेर हाकलून द्यायचे असेल तर राज्यातील ज्योतिषांना बोलवून शाहू राजांनी कधी मुहूर्त पाहिला काय ? राज्यातील जनतेच्या सन्मानाच्या वागणुकीसाठी प्रयत्न करत असताना पारंपरिक रीतीरीवाज मोडून सामाजिक समतेसाठी प्रयत्न करत असताना कधी मुहूर्त पाहिला का ? किंवा कोणत्या बाबा बुवाकडे गेले का ? बाबासाहेबांनी तर उभ्या आयुष्यात कधीच अशा गोष्टींना थारा दिलाच नाही त्याच्याहीपुढे एक पाऊल जाऊन सांगायचे म्हणजे बाबासाहेबांनी देव ही संकल्पनाच नाकारून सर्व देवच नाकारले.देवाच अस्तित्वच जर बाबासाहेबांनी नाकारलं असेल तर मग तुमच्या भीतीच भांडवल करून देवाच्या नावाने दुकान मांडून बसणाऱ्यांची दुकानदारी कायमची बंदच होईल ना ? ती दुकानदारी कायमची बंद व्हायलाच हवी होती अद्याप पर्यंत पण तसे न घडता असे खरात घडत आहेत. आधी आसाराम झाला त्यानंतर रामरहिम झाला आता हा खरात असे एक नाही हजारो भोंदू या देशात आनंदाने जगत आहेत. कारण ते तुमच्या भीतीच भांडवल करत आहेत. तुमच्या मनातून एखाद्या बाह्य शक्तीने आपलं वाईट होतेय ही भावना नाहीशी होईल तेव्हाच हे असले धंदे बंद होतील अन्यथा एक जाईल तर दुसरा तयार होईल.
खरात च्या निमित्ताने जो मुद्दा पुढ आला आहे तो अतिशय महत्वाचा आहे की, महिलांच्या मनातील अंधश्रद्धेची आत्मियता कधी कमी होईल ? ज्या बाबाकडे तुम्ही जाता तो तुमचं शारीरिक शोषण करत असताना ते झालेलं शोषण स्वतःच्या पतीला सुद्धा सांगत नाही. ते गप्प गुमान सहन करता आणि काही कालावधीनंतर जेव्हा तुम्हाला सहन होण्याच्या पलीकडे जाईल त्यावेळी त्याबद्दल तक्रार करता. एवढा संयम बाळगायची गरजच का ? घरात एखादेवेळी सासू सासऱ्यांनी काही बोलले तर त्यांच्या तोंडावर लगेच त्यांचा अवमान करता. नवऱ्याला त्यांच्यापासून दूर करून स्वतः वेगळ राहण्याचा निर्णय घेता मग इतक्या असंवेदनशील वेळी मात्र गप्प का ? ते शांत राहणे म्हणजे तो गुन्हा करायला दिलेली तुमची मूक संमती तर नव्हे ना ?
महिलांनी स्वतःचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करू नये म्हणून प्रबोधन सुरू असलेल्या या काळात तुम्ही स्वतःच पूर्ण शरीर त्या भोंदूच्या स्वाधीन करत असाल तर इथे दोष नेमका द्यावा कोणाला महिलांना? मानसिकतेला ? का संस्कृतीचा गवगवा करणाऱ्या विशिष्ट विचारसरणीच्या प्रवृत्तीला ?
डोक्यातून भीतीचे भूत जोपर्यंत उतरणार नाही, महिलेला मूल नाही झालं तर तिला देण्यात येणाऱ्या वागणुकीत जोपर्यंत बदल होणार नाही, तोपर्यंत असे अनगिनत भोंदू तयार होतील आणि समाजात सन्मानाने वावरतील गोष्टी उघडकीस नाहीच आल्या तर त्याच सन्मानाने ते मातीमोल सुद्धा होतील. त्यामुळं परंपरेनुसार चालत येणारी विचारसरणी बदलून जोपर्यंत प्रगल्भ विज्ञानवादी विचारसरणीच्या महिला तयार होणार नाहीत तोपर्यंत हा विध्वंस होतच राहणार यात निसर्ग नियमानुसार माफी नाहीच. वाईट कर्म कराल तर त्याचे भोग भोगावे लागतील असा गैरसमज बाळगण्याची आता तसूभरही गरज नाही. कारण खरात सारख्याच देव काहीच करू शकला नाही त्याला संविधानिक बलाने त्याला त्याची शिक्षा देण्याची प्रक्रिया सुरू आहे. जर देवाच्या भरोशावर सोडून दिलं असतं तर आज आसाराम आणि राम रहीम जेल मध्ये दिसले नसते. ते मुक्तपणे कैक महिलांचा आस्वाद घेत राहिले असते. त्यामुळं देव वाईट कर्माचे फळ देतो देवच आपल्या आयुष्याच चांगलं वाईट ठरवतो हा विचार डोक्यातून काढून टाकून जर एखादा भविष्य सांगणारा आलाच तुमच्या मनात भीतीची मानसिकता तयार करत असेलच तर त्याला आधी त्याची जागा दाखवा आणि असे भोंदू लोकांची मानसिकता जागेवरच ठेचून काढा.
© जी.संदीप (गोणार,नांदेड)

No comments:
Post a Comment