Sunday, October 8, 2023

आंदोलन यशस्वी पार पाडले म्हणजे हे यश नव्हे !



      मागील काही दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर आपण दिनांक 06 ऑक्टोबर रोजी चा मोर्चा यशस्वी केला. त्याबद्दल सर्व टीम चे खूप खूप अभिनंदन. या मोर्चासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष खूप साऱ्या व्यक्तींनी, विद्यार्थ्यांनी, संघटनांनी मोलाचा संघर्ष केला. या संघर्षातून हा मोर्चा यशस्वी झाला. या मोर्चासाठी कोणत्याही एका व्यक्तीचं योगदान नक्कीच नाही, हे प्रत्येकजण जाणतोच त्यामुळं आपण जो संघर्ष करून लढा दिला आहे त्या लढयाच फलित आपणास मिळाले आहे का ? याचा विचार होणे आता गरजेचे आहे. कोणतेही आंदोलन करत असताना ते तीन मार्गातून जात असते. त्यात पाहिले आंदोलन पूर्व तयारी दुसरा टप्पा प्रत्यक्ष आंदोलन आणि तिसरा टप्पा आंदोलनोत्तर साध्य.

         या काही दिवसातील आंदोलनांची स्थिती पाहता विद्यार्थी मित्रांकडून दोन आंदोलने झाली या आंदोलनात पाहिले दोन टप्पे यशस्वी रित्या पार पाडले गेले पण तिसऱ्या टप्प्याबदल आपण अनभिज्ञ आहोत. काहीजण तिसऱ्या टप्प्याबद्दल ज्ञात असतील सुद्धा पण त्यावर काय कार्यवाही करायची आणि कशी करायची हे विचार करण्यात ते मागेच राहून जाईल. असे जर घडले तर अशा छोट्या छोट्या आंदोलनातून नवीन विद्यार्थी नेते तयार होत जातील जे विद्यार्थी नेते पुढं येतील त्यांना एखाद्या राजकीय पक्षाकडून डिमांड दिली जाईल. ते विद्यार्थी नेते गरजेनुसार स्वतः च अस्तित्व निर्माण करण्यासाठी धडपड करतील जेव्हा स्वतः च अस्तिस्त्व निर्माण होण्यास वाव नाही असे दिसेल तेव्हा मात्र अशा छोट्या आंदोलनातून तयार झालेला विद्यार्थी नेता राजकीय पक्षाच्या गळाला अडकेल आणि तुमच्या हक्क अधिकारासाठी लढणे त्याचे कायमचे बंद होईल. राजकीय पक्ष जसा सांगेल त्याला त्या पद्धतीने वागावे लागेल. त्या पक्षाने घेतलेला निर्णय कसा योग्य आणि हितावह आहे हेच विद्यार्थ्यांना समजून सांगेल. असे होऊ द्यायचे नसेल तर तिसऱ्या टप्प्याकडे आपण सर्व विद्यार्थ्यांनी आणि आंदोलनात आपली बरीचशी वर्ष घालवलेल्या मित्रांनी लक्ष देणं खूप गरजेचं आहे.

         तिसऱ्या टप्प्याचा विचार करताना आपण जे आंदोलन करत आहोत ते आंदोलन न्याय्य आहे का ? ते आंदोलन कशासाठी करत आहोत ? आंदोलन करण्याचा मार्ग कोणता आहे ? आंदोलन गैरसंविधनिक तर नाही ना ?  या सर्व मुद्द्यांचा विचार करून आपल्याला आंदोलन करण्याचा मार्ग स्वीकारावा लागतो. अन्यथा आपले श्रम मातीमोल ठरतील यात काही शंका नाही. आंदोलनात आपण जो मार्ग वापरणार आहोत या मार्गावरूनच आंदोलनोत्तर टप्पा आपल्याला निश्चित करता येतो.

       आंदोलनाबाबत भूमिका समजून घेत असताना काही मत मतांतरे आहेत त्यात, आंदोलन करणे म्हणजे आम्ही जिवंत असल्यालाचा तो पुरावा आहे, शासनाच्या निर्णयाविरुद्ध आम्ही आंदोलन केलेच नाही तर मग शासन आमच्यावर हवे ते निर्णय लादत जाईल. असा विचार असलेला खूप मोठा वर्ग इथ आहे. असा विचार करणाऱ्या व्यक्तींमुळे आणि त्यांच्या विचारातून आंदोलने जन्म घेतात. अशा आंदोलनामुळे आवश्यक ते यश प्राप्त होत नाही. मग यातून आंदोलनात सहभागी होण्याचं प्रमाण कमी होत जात. मागील काही आंदोलने जी झाली त्या आंदोलनात सहभागी व्यक्तींचा विचार करता सर्व आंदोलक हे नवीन जोश आणि अपेक्षा घेऊन रस्त्यावर उतरले होते. 06 ऑक्टोबर चे आंदोलन होण्यापूर्वी सुद्धा खाजगीकरणाच्या विरुद्ध आंदोलन झाले होते. त्या आंदोलनात किती आंदोलक सहभागी होते हे यातील काही मित्रांना माहीतच असेल. मग असे जिवंत असल्याचा पुरावा देण्यासाठी फक्त आंदोलने होत असतील आणि उद्दिष्ट साध्य होण्यासाठी त्याचा काही संबंध नसेल, आम्ही पण काहीतरी करतो हे दाखवण्यासाठी च आंदोलन होत असतील तर त्या आंदोलनाचा सामान्य आंदोलकांना काय उपयोग ? सामान्य आंदोलक हा त्या आंदोलनातून ज्या मागण्या घेऊन पुढे येत असतो त्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत एवढी प्रामाणिक अपेक्षा घेऊन ते सहभागी होत असतात. पण त्या मागण्यांच काय होते हे त्या सामान्य अंदोलकाला समजतच नाही. तो आंदोलक आंदोलनात मी सहभागी होतो या आनंदात सोशल मीडियावर अपडेट देऊन मोकळा होतो. पण त्या मागण्यांचे काय झाले हा विचार सोडून देऊन त्या अन्यायी नियमाचा अंमल स्वतःवर करून घेऊन शासनाचा गुलाम होऊन वागायला लागतो. शासनाचा नियम स्वीकारायचं च आहे तर मग हे आंदोलनाचा मार्ग स्वीकारून स्वतः चा वेळ वाया घालवण्यात तरी काय अर्थ ? राज्यभर लागू होणारा कायदा तुमच्या एका छोट्याशा आंदोलनाने बदलायला सत्तेत बसलेले काय मूर्ख आहेत काय ?

        ही सर्व स्थिती पाहता मग आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यात नेमक असावं तरी काय ? असा प्रश्न जर तुमच्या मनाला पडला असेल तर खरच तुम्ही आंदोलन करण्यास आवश्यक ती मानसिकता घेऊन वावरत आहात हे यातून निष्पन्न होते. पण जर हा प्रश्न मनाला पडला नसेल तर मग मात्र तुम्ही कोणाच्या तरी सांगण्यावरून कोणाच्या तरी सोबत जाण्यासाठी म्हणून त्या आंदोलनात सहभागी होत असता. असं कोणाच्या तरी आवाहनावरून जर तुम्ही आंदोलनात जाल तर त्यातील तुमची उपस्थिती म्हणजे फक्त एक डोकं वाढल एवढीच राहील बाकी काहीच नाही.

       आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यात काय असावे याचा विचार करत असताना, आंदोलनाचा उद्देश काय आहे ? आणि आंदोलनाचा मार्ग कोणता आहे यावरून तिसरा टप्पा ठरवता येतो. उदाहरणार्थ आंदोलन खाजगीकरनाच्या विरोधात असेल तर हे खाजगीकरण शासन करू शकते का ? त्याला कोणता विशेष अधिकार आहे ? ते कोणत्या परिस्थितीत असा निर्णय घेऊ शकतात ? या प्रश्नांची उत्तरे शोधून जर ती उत्तरे सामान्य नागरिकांच्या बाजून येत असतील तर मात्र आंदोलनाचा मार्ग मोकळा होतो. आंदोलन संविधानिक मार्गाने केलं पण त्या आंदोलनाची सरकारने कोणतीही दखल घेतली नाही. तर मग ते आंदोलन तीव्र करावे लागेल. आंदोलन तीव्र करून सुद्धा शासन दखल घेत नसेल तर न्यायिक मार्गाचा वापर करून आपली मागणी कशी रास्त आहे हे न्यायालयात आपल्याला पटवून द्यावं लागेल. एवढे सारे प्रयत्न आपण कराल तरच हे खाजगीकरणाच भूत आपल्या मानगुटीवर बसणार नाही. अन्यथा हे खाजगीकरणाचं भूत आपल्या मानगुटीवरून उतरणार नाही एवढं मात्र नक्की. मग सरकार कोणतेही आले तरी त्यात काही बदल होणार नाही. कारण बघा ना, जे सरकार एस. टि. कर्मचाऱ्यांसाठी  आंदोलन करत होते तेच सरकार आता सत्तेत असून सुद्धा त्यांच्या त्या मागण्या मान्य करत नाही. म्हणजे विरोधक हे विरोधातून सत्तेत गेले की त्यांना सुद्धा  तीच बाब योग्य वाटते जी पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी अवलंबली होती. 

        अशा स्थितीत एखाद आंदोलन करून आपण त्याचा सोशल मीडियावर बाऊ करतो. हे आंदोलन केलं ते आंदोलन केलं म्हणून आपण मिरवत बसतो पण त्या आंदोलनातून आवश्यक ते ध्येय साध्य  झाल का ? हेच पहायला विसरतो. मग आपण जर एक दिवसाचे आंदोलन करून आपण आपल्यात गुंग राहणार असू तर मग अशा आंदोलनाचा फायदा काय होईल ? आपल्याला आवश्यक असलेलं बदल शासन करेल का ? आपल्याला आवश्यक ते बदल शासन करणार नसेल तर मग त्यांचे निर्णय गप्प गुमाण आपल्याला स्वीकारायचे असतील तर मग हे आंदोलनाचे पाऊल उचलायचे तरी का ? यातून काय साध्य करण्याचा आपला विचार असतो ? या सगळ्या प्रश्नाचा विचार सर्व मित्रांनी करणे गरजेचे आहे. कारण एखाद्या आंदोलनातून काही गैर घडले आणि त्यातून सहभागी आंदोलकांवर जर गुन्हे नोंद झाले तर त्या गुन्ह्याची दखल कोण घेणार आहे ? 

        06 तारखेचे जे आंदोलन झाले त्या आंदोलनातून काय साध्य होईल हे आपल्या सर्वांसमोर आहे. मग या पुढील दिशा ठरवून आपल्याला मार्ग क्रमन करावे लागणार आहे. ही पुढील दिशा ठरवत असताना आपला मार्ग हा संविधानिक असणे खूप गरजेचं आहे. त्या आंदोलनासाठी आवश्यक ती प्रत्येक गोष्ट आपल्याला योग्य मार्गाने मिळवावी लागणार आहे.  मागणी योग्य आहे त्यामुळं ही मागणी मान्य होईपर्यंत कोणतीच भरती केली जाणार नाही. कोणतीच खाजगीकरणाची प्रक्रिया केली जाणार नाही यासाठी न्यायालयीन लढाई सुद्धा आपल्याला लढावी लागणार आहे.

          हे शासन सत्तेवर राहण्यासाठी कोणत्याही थराला गेले आहे. सगळे राजकारणी एका माळेत जाऊन बसले आहेत त्यामुळं सत्ताधाऱ्यांना विरोध करायला कोणताच विरोधक सुद्धा सक्षम नाही. त्यामुळं या निर्णयाविरुद्ध जो लढा द्यायचा आहे तो आपणालाच द्यावा लागणार आहे.      हा लढा नाही दिला तर येणाऱ्या पिढ्या तुम्हाला दोष देतील वैगरे भ्रामक कल्पना जरा बाजूला ठेवूया. थोडस वेगळ्या बाजूने विचार करूया काही वर्षात तुमचे मूल जेव्हा मोठे होतील तेव्हा त्यांच्या खाजगी शाळेतील शिक्षणासाठी चा खर्च लागेल तो खर्च या खाजगीकरणाच्या रेट्यात तुम्ही कमवू शकाल का ? या एका प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला पेटून उठून हा लढा तीव्र करावाच लागणार आहे.

        हा लढा देत असताना या लढयात पुढे येणाऱ्या तरुणांनी काही नीतीनियम आणि काही बंधने पाळावे लागतील. पुढे येत असताना स्वतः च्या शिलासोबत आर्थिक सक्षम असणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे. जर आर्थिक सक्षम नसाल तर तुम्ही कोणत्याच अमिषाला बळी पडणार नाहीत एवढी कठोर मानसिकता तुम्हाला तुमच्यात निर्माण करावी लागेल. आपण आपल्या ठिकाणी  प्रामाणिक असणे किती गरजेचं आहे आपण  जर प्रामाणिक नसू तर आपण चालवत असलेल्या चळवळीची काय स्थिती होईल याबद्दल यापूर्वी एका कवितेच्या माध्यमातून ती स्थिती मांडलेली आहेच.

           आंदोलनासारख्या सगळ्या गोष्टीद्वारे आपल्याला शासनावर दबाव आणायचा असेल तर त्यासाठी वेळ खर्च करण्याची कुवत आपल्याला निर्माण करावी लागेल. त्यात आंदोलनाला पुढे नेण्यासाठी जी कोणती व्यक्ती पुढाकार घेणार आहे ती व्यक्ती स्वतः साठी आर्थिक सक्षम असावी लागेल. सोबतच निरपेक्ष भाव त्या व्यक्तीत असावा लागेल.ती व्यक्ती जर आर्थिक सक्षम नसेल  आणि निरपेक्ष भाव नसेल तर आंदोलन यशस्वी होण्याची अपेक्षा धूसर होईल. कारण एखाद्या मोठ्या मागणीसंदर्भात आंदोलन असेल आणि ती मागणी मान्य करायची नसेल तर आंदोलनाच्या प्रमुखाला काही अमिषे देऊन मागण्यांना बगल देऊन, मागण्या मान्य केल्याचे भासवले जाईल आणि आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले जाते. मागील काही आंदोलनाचा उपोषनांचा तुम्ही अभ्यास केलात तर त्यातून तुम्हाला ही बाब नक्कीच लक्षात येईल.म्हणजेच आंदोलन हे होत राहतील, त्यातून कोणी मोठा होईल कोणी नष्ट होईल पण मागणी मात्र तिथेच राहील. मागणी मान्य करून घ्यायची असेल तर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन केले आणि ते आंदोलन यशस्वी झाले म्हणून हुरळून जाऊ नये.

                  © जी.संदीप(गोणार,नांदेड) 9552803980


Wednesday, October 4, 2023

आम्ही राजा नाही गुलामच राहणार ?



        30 सप्टेंबर आणि 01 ऑक्टोबर या दिवसातील 24 तासात नांदेड शासकीय रुग्णालयात 24 रुग्णांनी आपला जीव गमावला आणि 70 अत्यवस्थ स्थितीत असल्याची बातमी  नांदेड वासियांच्या कानावर आदळली आणि सगळे सुन्न झाले. काही काळासाठी बधीर झाले. या परिस्थितीत आपल्या कुटुंबातील कोणी व्यक्ती त्यात समाविष्ट असता तर काय स्थिती झाली असती याची कलपणाच न केलेली बरी. नांदेड शासकीय रुग्णालयाची बातमी राज्यभर पसरली आणि आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जाऊ लागले.

       हे राज्यात पहिल्यांदाच घडले असे नाही. मागील काही महिन्यातील अशा घटनांचा आढावा घेतला तर त्यात कळव्यातील शासकीय रुग्णालयात एकाच रात्रीत आगीत होरपळून 17 रुग्णांचा झालेला मृत्यू, भंडारा जिल्ह्यात झालेल्या 10 नवजात बालकांचा मृत्यू, नागपूर मधील शासकीय रुग्णालयात 24 तासात 25 रुग्णांचा झालेला मृत्यू, त्यानंतर नांदेड आणि लगेच नांदेड पाठोपाठ औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात 24 तासात 18 रुग्णांचा मृत्यू.

        ही सगळी आकडेवारी पाहिली तर एकच प्रश्न निर्माण होतो तो नागरिकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे, तो म्हणजे शासनाला या घटनेचं गांभीर्य किती आहे ? या सगळ्या घटना घडलेल्या असताना त्या घटना तसे प्रसंग नंतर कोणत्याही रुग्णालयात घडू नयेत यासाठी काही उपाययोजना केली आहे का ? हा प्रश्न मात्र निरुत्तर राहतो.  कारण एवढे सारे गंभीर प्रकरण घडतात आणि एकाही नेत्याला त्याबद्दल काहीच सोयरसुतक नाही असं निदर्शनास येत आहे ? कारण रोग काय आहे हे न पाहताच एका जिल्ह्याचा खासदार शासकीय रुग्णालयात जाऊन रुग्णालयाच्या प्रमुखास तिथले शौचालय साफ करावयास लावतो. 

        तिथला कर्मचारी नीट काम करत नाही, तिथले डॉक्टर नीट सेवा देत नाहीत, तिथल्या सिस्टर रुग्णांशी नीट व्यवहार करत नाहीत, नातेवाईकांशी उर्मट वागतात. त्यामुळं त्या खासदारांनी जे केलं ते योग्यच केलं त्यांना असाच धडा शिकवला पाहिजे. असे म्हणून तोंड सुख घेणाऱ्यांनो तुम्ही जर तुमच्या शेतात काम करत असाल आणि शेतातील काम करण्यासाठी 10 कामगार लागत असतील आणि तिथे 05 च कामगार उपलब्ध असतील त्यानंतर काही काळातकाम दुप्पट देऊन तुमच्यावर बंधन असेल की ते काम तुम्हाला ठरवून दिलेल्या वेळेतच कोणतीही तक्रार न करता ते पूर्ण करायचे आहे.    अशी ताकीद तुम्हाला दिली गेली तर अशावेळी तुमची मानसिकता काय असेल ? तुम्ही बिगारी काम करत असाल तिथे सुद्धा अशीच स्थिती असेल, तुम्ही कंपनीत कामावर असाल तुम्हाला टार्गेट दिलं आहे, ते टार्गेट 50% मनुष्यबळात पूर्ण करायचे आहे ते सुद्धा कोणतीही  तक्रार न करता. त्यावेळी तुमची मानसिकता काय होते ? याचा विचार करणार आहात का नाही ?  त्याच दबावाखाली तेथील प्रशासन असेल तर अशावेळी तुम्ही प्रशासनाची बाजू घ्यावी का त्या स्वतः ला मालक समजणाऱ्या शासनाची ?

      सत्तेत असणाऱ्या खासदारांने ही घटना का घडली याचा विचार करून त्यावर योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना राज्यसरकारला द्यायला पाहिजे होत्या का प्रशासनावर असा दबाव टाकून स्टंटबाजी करायला हवी होती ?

       या प्रकरणात काल जे लोकप्रतिनिधी म्हणून खासदाराचे वर्तन घडले ते म्हणजे जनतेला मुर्खात काढण्यासाठी केलेला प्रयोग होता. हे जे काही घडले त्यात शासनाची काहीही चूक नाही, शासन दोषी नसून प्रशासन दोषी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या सगळ्या प्रकरणात स्थानिक खासदार काय झोपलेत का काय ? स्थानिक खासदार सोडून शेजारच्या जिल्ह्यातील खासदार इथे येतो आणि कर्मचाऱ्यावर दमदाटी करतो ?

        अशा सगळ्या प्रकरणात  शासन आपल्या चुका झाकण्यासाठी  एखाद्या आयोगाची स्थापना करून मोकळं होईल आणि अशा घटना वारंवार वेग वेगळ्या जिल्ह्यात घडतच राहतील. त्यांना जनतेच्या आरोग्याचं काहीही देणं घेणं नाही हे या विविध जिल्ह्यात घडलेल्या घटनांमधून लक्षात येत आहे. यात प्रशासनाची जर चूक होतीच तर मग त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा अधिकार शासनाला आहे याचा विचार त्या खासदारांनी का केला नाही ? तो विचार त्यांच्या डोक्यात आला नाही कारण त्यांना माहीत होते ही शासनाची चूक आहे ?  अशा प्रकरणात प्रशासन चुकत नाही अस माझ म्हणणं नाही. प्रशासन सुद्धा चुकते पण प्रत्येक गोष्टीत प्रशासणालाच जर आपण दोष देत बसलो तर कस चालेल ? आज शासनाच्या तिजोरीत रक्कम नाही म्हणून शासन कर्मचारी भरती करत नाही. मग व्यवस्थेवर येत असलेल्या तानास कोण जबाबदार आहे ? मग अशावेळी त्या शासनाची कॉलर धरण्याची हिम्मत आपल्यात का नाही ? नागरिकांच्या तुलनेत आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणं हे शासनाचे काम आहे. अशावेळी रुग्णालयात 50% कर्मचारी आणि रुग्ण 200% अशी स्थिती निर्माण झाली असेल तर तेथील रुग्णांच्या होणाऱ्या  त्रासास जबाबदार कोण आहे ? शासन का प्रशासन ? रुग्णालयात आवश्यक तो औषधासाठा उपलब्ध करून देणे हे शासनाचे काम आहे ना ? मग तो उपलब्ध होत नसेल तर कोणाला जबाबदार धरणार ?  रुग्णालयात आवश्यक त्या सुधारित मशिन्स आहेत पण त्या हातळण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी च नेमला नसेल तर त्या मशीन च रुग्णालय प्रशासनाने करायचं तरी काय ? असे अनेक प्रश्न निरुत्तर राहत असताना आपण जर शासनाला बाजूला करत असू आणि प्रशासनाला दोषी धरत असू तर आपण आपल्या हाताने पायावर कुऱ्हाड मारून घेतोय यात मात्र काही शंका नाही.

         नागरिकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणं हे शासनच काम असताना थोड्याफार काही गोष्टी फुकट देऊन आम्ही तुमच्यासाठी खूप काही करतोय असं सोंग घेत हे शासन आपल्या पुढं येत आहे.  फुकट देण्याची एवढीच जर कुवत आहे तर शासन खाजगीकरणाचा सपाटा का लावत आहे. कर्मचारी भरती कंत्राटी का करत आहे ? प्रत्येक क्षेत्रात 100% कर्मचारी भरती का होत नाही ? एवढंच फुकट देण्याची कुवत असेल तर मग नागरिकांना आवश्यक असलेले शिक्षण दर्जेदार का दिलं जात नाही ? का शिक्षक भरतीचा खोळंबा मांडून ठेवला आहे ? ज्या एस. टी. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन केलं होते त्याच मागण्या आता का लागू करत नाहीत ? एस. टी. तोट्यात आहे कर्मचाऱ्यांना पगार वाढ देता येणार नाही अशी शासनाची भूमिका आहे तर मग का महिलांना आणि वृद्धांना तिकिटांमध्ये सवलत दिली आहे ?

       राज्यातील नागरिकांना काही द्यायचंच असेल तर त्यांच्या हाताला काम द्या. त्यांना शिक्षणानुसार रोजगार द्या.  त्यांना पैसे कमविण्याची साधने उपलब्ध करून द्या.नागरिक म्हणजे या देशातील राजा आहे, तुमच्या भिकेवर जगणारे कंगाल भिकारी नाहीत. पण या राजांना आपली किंमत अद्याप कळत नाही. जोपर्यंत या राजांना आपली किंमत कळणार नाही तोपर्यंत हे असे रुग्णालयातील मृत्यंचे तांडव, फुकट घेऊन गुलाम म्हणून जगण्याची सवय,  रोजगारासाठी शहराकडे होणारे स्थानांतर कधीच थांबणार नाही. हे मात्र नक्की. हा राजा राजा नाही तर गुलाम बनुनच राहील ?

©जी.संदीप (गोणार,नांदेड)

9552803980

Saturday, September 23, 2023

सामान्यांच्या आयुष्याची राख रांगोळी करूनच सोडणार ?

 



     शाळा दत्तक देण्याचा शासन निर्णय हाती पडला आणि वाटल की हे काही प्रमाणात ठीक राहील. ग्रामीण भागातील पालक स्वतः त्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे शाळा विकसित करण्यात हातभार लावतील आणि स्वतः च्या पाल्यांसाठी पुढाकार घेऊन शाळेला विकसित करतील यातून सरकारी शाळांचा दर्जा उंचावेल, तोच दर्जा पाहून शहरात सुद्धा पालकांची मानसिकता बदलेल आणि शहरात जे खाजगी शाळांचे पेव फुटलेले आहे ते कमी होण्यास मदत होईल. पण तो शासन निर्णय पूर्ण वाचल्यानंतर माझा भ्रमनिरास झाला आणि कर्मवीर भाऊरावांचा एक किस्सा आठवला.

            कर्मवीर भाऊराव हे आपल्या सामान्य जनतेला शिक्षण घेता यावे, यासाठी निवासी स्वरूपात शाळा चालवत होते. ती शाळा कशी चालू आहे हे पाहण्यासाठी एक साताऱ्यातील व्यापारी शिक्षण संस्थेत आला, तेव्हा स्वयंपाकासाठी च आवश्यक साहित्य संपल होत आणि त्या साहित्यासाठी भाऊरावांच्या पत्नीने आपल्याजवळील दागिने गहाण ठेवून आवश्यक साहित्य आणून मुलांच्या जेवणाची सोय केली होती. ही परिस्थिती त्या व्यापाऱ्याच्या लक्षात आली, त्या परिस्थितीचा फायदा घेऊन त्या व्यापाऱ्याने कर्मविरांपुढे एक प्रस्ताव ठेवला, तुम्ही तुमच्या शिवाजी शिक्षण संस्थेचे नाव बदलून संस्थेला माझं नाव द्या. मी तुम्हाला आवश्यक तेवढी आर्थिक रसद देण्यास तयार आहे. तेव्हा कर्मवीरांनी परिस्थितीचा विचार न करता आणि मुलांना सुद्धा कशाची कमी पडणार नाही याची काळजी घेऊन तो प्रस्ताव धुडकावून लावला. आज त्याच कर्मवीर भाऊरावांच्या शैक्षणिक संस्थेला 104 वर्ष पूर्ण झालीत आणि त्या संस्थेचा वटवृक्ष झालेला आपण पाहतोय. सोबतच त्यात हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन सन्मानाने उच्च पदावर कार्य करत आहेत हे सुद्धा आपण जाणतो. आज त्या महान व्यक्तीचा जन्मदिन आहे. हे असे शासन निर्णय जर येत असतील तर त्यांनी पाहिलेल्या उद्देशासाठी शासनाने काम करायचे सोडून देऊन व्यापाऱ्यांच्या हाती शाळा सोपवली तर समजाचा शैक्षणिक विकास व्हावा म्हणून ज्यांनी आपलं आयुष्य पणाला लावलं त्यांच्याशी कृतघ्न होणे नव्हे का ?

         वरील प्रसंग आहे साधारणपणे 1924 नंतरचा म्हणजेच पारतंत्र्य काळातील. स्वतःची सत्ता नसताना शिक्षण दानासाठी ध्येयाने प्रेरित झालेला कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता शिक्षण दानाच काम करणारा व्यक्ती सन्मानाने येणारी संपत्ती नाकारतो आणि इथे स्वतःची सत्ता असताना आर्थिक व्यवस्था सक्षम असल्याच्या गप्पा करत असताना हे भिकेचे कटोरे घेऊन व्यावसायिकांकडे जाण्याची वेळ आलीच कशी ? एवढी काय गरज निर्माण झाली की, देशाचा कणा देशाचं भविष्य विकसित करणारी पिढी घडविण्यासाठी त्या शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने कामावर ठेवावं लागेल.

          शाळा विकासासाठी उद्याजकांच्या पुढे हात पसरावे लागतील. हा शासन निर्णय म्हणजे आम्ही श्रीमंत आहोत आमच्याकडे अमाप संपत्ती आहे हे सगळ्या जणांना ओरडुन सांगितलं आणि  घरात पाहुणे आले तर त्यांचा पाहुणचार करण्यासाठी चहा करायला साखरेचा कन नाही. पण पाहुण्यांना पाहुणचार तर करावाच लागेल ना ? मग अशावेळी शेजाऱ्याकडे मागच्या दाराने जाऊन साखर घेऊन येण्यासारखा हा प्रकार म्हणजे हा शासन निर्णय आहे अस जाणवतेय. तिजोरीत पैसा नाही म्हणजे, राज्याचं वाटोळं तर झालं नाही ना ? राज्य भिकेला तर लागलं नाही ना ? कारण शासकीय नोकऱ्या बंद करून कंत्राटी भरतीचा सपाटा लावलाय, शाळा दत्तक देण्याचा विषय निघालाय.

          शाळा दत्तक दिली जातेय म्हणजे एखादा पैशाने गब्बर असलेला व्यक्ती तो दत्तक घेऊ इच्छिल शाळा दत्तक घेण्यासाठी सुद्धा काही अटी टाकल्या आहेत. त्या अटींचा विचार करता वाटत नाही की सरळमार्गी कोणता व्यक्ती शाळा दत्तक घेण्याचा विचार करेल आणि त्या शाळेला आपल्याला हवं ते नाव देण्याचं डोक्यात आणेल.

          जो कोणी शाळा दत्तक घेईल शाळेला हव ते प्रत्येक साहित्य देईल तेव्हा त्या शाळेचा तो हवा तसा वापर करेल. हे न कळण्याईतपत आपण अज्ञानी आहोत का काय ? तुम्ही कितीही कठोर शासन निर्णय काढलात तरी शाळा दत्तक घेणारा त्याला हवी तशीच शाळा चालविण्यास सांगेल हे मात्र नक्की. अशावेळी विद्यार्थ्यांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आली तर त्याला जबाबदार कोण ?

         शाळेला आवश्यक असणाऱ्या खडू पासून संरक्षक भिंतीपर्यंत आवश्यक त्या सगळ्याच गोष्टी दत्तक घेणारा व्यक्ती देणारा असेल तर तो त्या शाळेत त्याला हवे तसेच संस्कार होतील यातील काही शंकाच नाही असे मला वाटते. ग्रामीण भागात प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रमात एखाद्या व्यक्तीने शाळेला काही दान दिले तर त्याच्या सन्मानासाठी, त्याच्या काही अपेक्षेसाठी लहान मुलांना तास न तास ताटकळत ठेवंल जातं. अशा एक ना अनेक घटना घडत असतात, शासन निर्णय निघाल्यावर दत्तक घेणाऱ्याने त्याच्या मर्जीनुसार काही घटना काही कार्यक्रम आयोजित केले तर त्याला जबाबदार कोण राहील ? अशा शाळेत धर्माचे उदात्तीकरण केल्या जाऊ लागले तर त्याला जबाबदार कोण राहील ? 

         मुळात शिक्षण देणे ही शासनाची जबाबदारी आहे, शासन आपल्या जबाबदाऱ्या पासून पळ काढत असेल तर त्यांना जाब विचारन हे आपल कर्तव्य आहे. पण आपण आपल्या कर्तव्यापासून पळ काढून समजातील प्रतिष्ठेचा विचार करून आपण अवाढव्य खर्च करून आपल्या पाल्याला खाजगी शाळेत पाठवण्यकडे पालकांचा ओढा वाढला आहे. यातून शासकीय शाळेमधील विद्यार्थी संख्या कमी होत गेली आणि आज या शाळेवर अशी दत्तक जाण्याची वेळ येऊन ठेपली.

      नागरिकांना आवश्यक त्या सुविधा पुरवणे आणि गरजा पूर्ण करणे हे शासनाचे काम असताना जर ते स्वतः पूर्ण करू शकत नसतील तर त्यांना तिथे राहण्याचा अधिकार तरी काय ? असा प्रश्न आपल्या मनाला का पडत नाही ? कोरोना काळात नांदेड च्या तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी आपल्या पत्नीची डिलिव्हरी सरकारी रुग्णालयात केली याबद्दल आपण त्यांना डोक्यावर घेतल पण यात  अप्रूप काय आहे ? देशातील नागरिकांना ज्या सुविधा द्यायच्या आहेत त्या सुविधांचा ते स्वतः लाभ घेत नसतील तर मग एवढ्या नीच दर्जाच्या सुविधा ते कशाला देत आहेत ? ज्या सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून देत आहेत त्या जर दर्जेदार नसतील तर नागरिकांना सुविधा देण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा होत असलेला गैरव्यवहार आणि नागरिकांच्या पैशाचा गैरव्यवहार आहे असे आपणास वाटत नाही का ?

         अशा परिस्थितीत नागरिक म्हणून आपण जर गप्प गुमान प्रत्येक गोष्ट ऐकत राहिलात तर मात्र त्यांना हवा तसाच देश चालवतील त्यांच्या पिढ्यांचा विकास करून घेतील नागरिक म्हणून तुम्ही जिवंत राहिलात किंवा मेलात तरी त्यांना काही संबंध राहणार नाही एवढे मात्र नक्की. त्यामुळं या खाजगीकरणाच्या विरोधात, शाळेतील कंत्राटी भरती असो, हे दत्तक देण्याची गोष्ट असो, अशा प्रत्येक गोष्टीला विरोध हा विद्यार्थी, पालक, शिक्षक, आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या थरातून होणे गरजे आहेच अन्यथा मला काय त्याच मी तर सुरक्षित आहे अस वाटत असाल तर अशीच वेळ उद्या तुमच्यावर येईल तेव्हा तुमची सुद्धा साथ द्यायला कोणीच नसेल...

                                                  © जी.संदीप (गोणार,नांदेड)

                                                          9552803980

Tuesday, September 5, 2023

इंडिया ची अलर्जी का ?

 



घातला आता नवाच वाद

INDIA THAT IS BHARAT असताना,

अक्कल काय गहाण ठेवली होती का ?

इंग्लिश मध्ये सुद्धा भारत हा शब्द वापरताना.

 

पहिल्या वर्गात शिकणाऱ्या

लेकराला सुद्धा समजते.

भारताचा इंग्लिश मध्ये

इंडिया असाच उल्लेख केला जातो.

 

संसदेत हिंदुस्थान चा डांगोरा पिटणाऱ्यानो

इंडिया ची एवढी काय अलर्जी झाली ?

इंडिया म्हणजे भारत नव्हे

एवढी समजूत होण्याइतपत माती कशी खाल्ली ?


आम्ही काहीतरी करतोय हे दाखवण्याच्या नादापायी

सुरू असलेले ही निरर्थक थोतांड बंद कराव.

नागरिकांच्या गरजा ठेवाल बाजूला तर

मग लवकरकच घरचा रस्ता लागल धराव

 

सत्ता ही नागरिकांच्या विकासासाठी वापरावी लागते

एवढ सुद्धा कस कळत नाही ?

सत्तेद्वारे  स्वतःची छबी उमटवून जायला

ही काय कोणाच्या बापाची जायदाद नाही.

- जी. संदीप (गोणार,नांदेड)

9552803980

Sunday, September 3, 2023

ABC id

 काय आहे ABC I'd आणि ती कशी काढायची ?



       पुढील वर्षीपासून नवीन शैक्षणिक धोरण लागू होत आहे. या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये गुण आणि ग्रेड पद्धत बंद होऊन क्रेडिट पद्धत लागू करण्यात येणार आहे. तुम्ही कोणत्याही फील्ड चे जर शिक्षण घेत असाल तर त्या अभ्यासक्रमानुसार तुम्हाला क्रेडिट मिळणार आहे. ABC I'd(Academic Credit Bank) म्हणजे एकप्रकारे बँकेतील खात्याप्रमाने तुमचे शैक्षणिक क्षेत्रातील खाते होय. बँकेत जसे तुम्ही पैसे जमा केल्यानंतर ते तुमच्या खात्यात जमा राहतात. तसचं तुम्ही जस शिक्षण घेत रहाल त्या पद्धतीने तुमच्या शैक्षणिक खात्यात तुमचं क्रेडिट जमा होत राहणार आहे.      

         त्यासाठी ABC I'd ही अत्यंत आवश्यक आहे. याची दखल घेऊन विद्यार्थ्यांनी आपली ABC I'd तयार करून घ्यावी.


ABC I'd काढण्यासाठी सोबत दिलेल्या लिंक वर पुढील प्रक्रिया करावी.


https://www.abc.gov.in/

त्यानंतर विविध वेबसाईट च एक पेज तुमच्या समोर ओपन होईल. त्यातील पहिली वेबसाईट ओपन करावे.




त्यानंतर my account हा पर्याय उजव्या बाजूला कोपऱ्यात दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर students आणि university यापैकी students या पर्यायावर क्लिक करावे.


त्यानंतर त्यात mobile no टाकावा त्यावर एक OTP येईल तो OTP टाकून verify वर क्लिक करावे.



पुढील पेज ओपन होईल.

त्खलील (आवश्यक ती सर्व माहिती भरावी)

 पूर्ण नाव ------

जन्म दिनांक -----

gender ------

एक युजर नेम टाईप करावा (हा नवीन युजर नेम तयार करायचा असतो.)------

त्यानंतर pin जो ठेवायचा असेल तो pin टाईप करावा ---------- 

तोच  पिन पुन्हा टाकावा --------

dialogue box la click (त्याखाली असलेला चौकोन) करून

verify वर क्लिक करावे. 


त्यानंतर आधार kyc साठी च पेज ओपन होईल

त्यात आधार नंबर टाकावा 

त्यानंतर येणारा OTP टाकून सबमिट करावा.


त्यानंतर ईमेल साठी पेज ओपन होईल त्यात ईमेल टाईप  करावा आणि verify वर क्लिक करावे.



त्यानंतर मेल ला OTP येईल तो OTP टाकून सबमिट करावे.

त्यानंतर जे पेज ओपन होईल त्यात

विद्यापीठाचे नाव मद्ये (Swami Ramanand Teerth Marathwada University Nanded) निवडावे

Admission year या वर्षी ज्यांचे झाले आहे त्यांनी 2023 निवडणे (अन्य विद्यार्थ्यांनी आप आपला प्रथम वर्षाचे प्रवेश वर्ष टाकावे.)

Identity type :- (योग्य ते निवडून sabmit करावे.

त्यानंतर abc I'd तयार झाल्याची स्क्रीन तुमच्या समोर ओपन होईल. 


त्याची प्रिंट काढून महाविद्यालयात सबमिट करावे.


Wednesday, August 30, 2023

...आणि स्वातंत्र्याचा महिना संपला




15 ऑगस्ट ला आम्हाला स्वातंत्र्य मिळालं

पण तरीसुद्धा आनंदी नव्हतो आम्ही

म्हणून प्रजासत्ताकाचा सोहळा

धूमधडाक्यात साजरा करतो आम्ही


पण तरीही प्रजासत्ताकाची मुहूर्तमेढ आहे

15 ऑगस्ट याच दिनी

म्हणून उत्साह संचारतो

काही भारतीयांच्या अंगी


स्वातंत्र्याचा महिना संपला

देशभक्तीचे गुणगान गाणे बंद करू

दुसऱ्या पेक्षा माझाच जास्तीत जास्त कसा फायदा होईल

हे पाहणे आम्ही कसे विसरू


भारत देश म्हणजे दक्षिणेच्या टोकापासून

उत्तरेच्या टोकामधील भौगोलिक परिसर होय

त्यातील जिवंत माणसे देश या संकल्पनेत

समाविष्ट करण हे चुकीचं होय


म्हणून या देशात पहिल्यांदा

माझी प्रत्येक हौस पूर्ण झाली पाहिजे

इतर नागरिक मेले तरी मला काय पर्वा

माझी हौस पूर्ण करून घेणे हेच ध्येय असल पाहिजे.


मीच जिवंत नसलं, माझीच सप्न पूर्ण होत नसतील

तर देशाबद्दलच्या अभिमानाच काय लोणचं घालायचं काय ?

माझाच इथ विकास नसल तर

दुसरा प्रत्येक जन भकास झाला तरी त्याचं मला काय ?


अशीच मानसिकता इथ

करोडोंच्या मनात रुजलेली दिसतेय

म्हणून जो तो कस लुबडता येईल देशाला

हेच विचार करत जगताना दिसतोय


स्वातंत्र्य दिनी मात्र झेंड्याखाली शासक प्रशासक

पांढऱ्या कपड्यात काळी मानसिकता घेऊन मिरवतोय

खरा झेंडा मात्र सामान्यांच्या हृदयात

मलीन कपड्याचा सल्यूट घेत फडकतोय

 

कशाचा स्वातंत्र्य दीन

आणि कशाच आलंय स्वातंत्र्य

इंग्रज निघून गेले कायमचे पण

दिडशहाने हलवत आहेत देशाचं सूत्र


स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे

हे सांगत फिरतात काही जण

शासक प्रशासक म्हणजे आहेत नोकर

हे सुद्धा जाणून घ्यावं प्रत्येक जण


म्हणून मित्रांनो आपणही देशाला लुबाडूया

पण त्याआधी थोडीशी गुंतवणूक करूया

निसर्ग संवर्धनासाठी झाडे लावूया,

गरजा मर्यादीत ठेवूया,

दुसऱ्याला आपल्या जगण्यातील रुबाब दाखवणे टाळूया

गरजेएवढेच प्रत्येक गोष्ट मिळवत राहूया,

प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट मिळेल यासाठी प्रयत्न करुया

देश ओस पडूद्या आपल्याला त्याच काय देणं-घेणं

जे सोबत आहेत त्याच्यासाठी मात्र आपण नेहमी पुढं येऊया.


देशाचं वाटोळं होऊद्या

आपल्याला काय देणं घेणं

आपण मात्र आपल्या परिसराला

उत्तम आणि पोषक असे बनवूया

आपल्याला ज्या गोष्टींची गरज आहे

त्या गोष्टींची निर्मिती आपणच करुया


देशावर आक्रमणे झाली तर होऊद्या

आपल काय जातंय त्यात

आपण फक्त आपल्या शेजाऱ्यांसोबत

परिसरातल्यांसोबत एकात्मतेने राहूया


जात धर्म पंथ यामुळं देशात होत राहूद्या वाद विवाद

आपण फक्त हिंदू, मुस्लिम, बौध्द, शीख, इसाई, ख्रिश्चन

अशा वेग वेगळ्या जाती धर्माचे एकत्रित शेजारी शेजारी राहूया

रोटीच नात एक मेकांशी ठेवून आनंदाने इथ जगूया


बेटीच्या व्यवहाराच बघुया नंतर कधीतरी

आधी रोटीच्या व्यवहाराच नक्की करून घेऊया

मग काय घेणं देणं देशाचं आम्हाला या

आम्ही सुखाने नांदू लागल्यानंतर

जात धर्माच्या नावावर लढणाऱ्याना लढत राहू द्या....


स्वातंत्र्याचा महिना संपत असताना 

आम्ही स्वातंत्र्य आहोत का हे बघुया

नसल आम्हाला स्वातंत्र्य तर सर्वजण मिळून

एकत्रितपणे स्वातंत्र्य जगत राहूया....

मानसाशी मानसासारखे वागुया..........


© जी.संदीप (गोणार,नांदेड)

9552803980

Monday, August 14, 2023

तुमचा आमचा स्वातंत्र्य दीन ?



स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना या, स्वातंत्र्याच्या समता,स्वातंत्र्य आणि बंधुता हा गुण आपल्यात असावा. हे गुण जर आमच्यात रुजनार नसतील तर, स्वातंत्र्याला अर्थ उरणार नाही. जर ते गुण प्रत्येक भारतीयांच्या अंगी भिनतील तर, आम्हाला कोणाकडूनही संरक्षण करून घेण्याची गरज नाही. 

     वास्तव पाहिले तर असे निदर्शनास येते की, आमच्यामध्ये स्वातंत्र्याची बीजे रुजण्यास खूप कालावधी लागेल असे दिसते कारण, एक-मेकांबद्दल जर समतेची भावना नाही, आप-आपसात बंधुता नाही असे असेल तर, आजसुद्धा स्वतःच्या संरक्षणासाठी बहिणीला भावाकडे राखी बांधून संरक्षणाची अप्रत्यक्ष मागणी करावी लागेल जर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात ही स्थिती असेल तर कसे चालेल ?

       आज च्या युगात आम्हा सर्वांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनावर आहे. मग या पोलीस प्रशासनाला भारतीय नागरिक (फक्त स्त्री नाही) राखी का बांधत नाही ? मला व्यवस्थेच्या कोणत्याही गोष्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात स्वारस्य नाही.पण मनात आलेला प्रश्न उपस्थित करणं आणि व्यवस्थेच्या शिलेदारांना त्याचा जाब विचारणं हा स्वातंत्र्याचा भाग आहे.

         पण आपल्या मताच्या विरोधात किंवा आपल्या विरोधात कोणी बोलत असेल तर त्याला विचाराच्या आधारे प्रत्युत्तर न देता. त्याचं व्यक्त होन बंद करण्याचा प्रयत्न केला जातो. मग अशा स्वातंत्र्याला आम्ही कस स्वीकारायचं ? तुमच्या या अशा दुतोंडी स्वातंत्र्याचा धिक्कार करतो. लाथ मारतो तुमच्या अशा स्वातंत्र्य सोहळ्याला...सोहळा साजरा करण्याने कोणी स्वातंत्र्य होत नसते. इंग्रजांनी आपल्यावरील सत्ता सोडली म्हणून काय झालं ? जिथं एखाद्याला गुलामीत ठेऊन राजा बनण्याची ज्यांची विचारसरणी आहे. अशांसोबत हा स्वातंत्र्याचा सोहळा कितीही पिढ्यांनी साजरा केला तरी, या स्वातंत्र्य दिनाचा काहीही फायदा होणार नाही. हे का लक्षात येत नाही.स्वातंत्र्य हे कायद्याने नाही तर प्रत्येकाच्या मनाने उपभोगता व देता आलं पाहिजे. तेव्हा कुठं या स्वातंत्र्याला अर्थ प्राप्त होतो...मग त्या स्वातंत्र्यात कोणत्याही बहिणीला कोणाकडून संरक्षणासाठी आपल्या भावाला राखी बांधायची गरज पडणार नाही. राखी बांधून घ्यावी लागते म्हणजे संरक्षणाची मागणी आली. संरक्षण आले म्हणजे कोणी एक दुबळा झाला. दुबळेपन आले म्हणजेच समता नाकारण्याची सुरुवात झाली. जिथे स्वातंत्र्य नसते तिथे तुम्हाला काय खाक स्वातंत्र्य मिळेल. मग जिथे स्वातंत्र्य नाही तिथे स्वातंत्र्य दिन कसाही साजरा केला तर काय फरक पडतो. कोणतेही सोहळे साजरे केल्याने आमचा विकास होणार नाही. आमच्या विकासासाठी विचारातील सम्यक परिवर्तन आणि मी एक माणूस म्हणून माणसाशी कसे वागावे या भावनेने राहिलो तर आम्हाला काहिही अडचणी येणार नाहीत.

         तिकडे ज्या गुरुजीला आदर्श मानता तो गुरुजी राष्ट्रध्वज अमान्य करतो, मी राष्ट्रगीत सुद्धा म्हणणार नाही, राष्ट्रध्वज फडकविणार नाही असे जाहीर पने सांगतो, त्याचेच शिष्य तुम्ही सत्तेत असताना राष्ट्रध्वज प्रत्येकाच्या घरावर सन्मानाने फडकवण्याचा आदेश देता. एवढीच देशभक्ती रुजवायची आहे तर मग त्या तुमच्या गुरुजींच्या डोक्यात जरा घुसवा ना. मग सामान्य नागरिकांच्या मनाचा विचार करा.

         तसंही सामान्य नागरिकांच्या देशप्रेमाबद्दल बोलण्याची तुमची लायकीच नाही. देशातील प्रत्येक क्षेत्रात अयोग्य गोष्टी घडवून आणून देशाचं वाटोळं करण्यात गुंग असणारे तुम्ही, तुमची काय लायकी आहे सामान्य नागरिकांच्या मनात देशभक्ती रुजवण्याची. एक किस्सा सर्वपरिचित आहे तो असा की, गांधिजीकडे एक महिला आपल्या मुलाला असलेली गूळ खाण्याची सवय सोडवण्यासाठी आल्यानंतर गांधीजींची वागणूक आणि दिलेला सल्ला. साधं व्यसन सोडवण्यासाठी आलेल्या व्यक्तीला त्याच्या व्यसनापासून दूर करण्यासाठी आधी स्वतः निर्व्यसनी बनले. मग तुम्हाला नागरिकांच्या मनात देशभक्ती रुजवयचीच आहे तर मग आधी स्वतः मध्ये देशभक्ती रुजली आहे का हे कधी पाहाल ?

          धर्म आणि जातीच्या नावावर तंटे निर्माण करणारे तुम्ही, शासकीय कामात गैरव्यवहार करून मलिदा जमा करणारे तुम्ही, तुमच्या त्याच चुकीच्या कामामुळे शेकडो आणि हजारो जीव गेले तरी तुम्हाला फरक नाही पडत मग तुम्हाला नागरिकांच्या मनात देशभक्ती रुजविण्याचा काय अधिकार ?

          अशा या सर्व चुकीच्या वागणुकीला फाटा देण्यासाठी प्रतीके पुढे करून देशभक्तीच ढोंग रचल्याने देश सर्वांगीण विकसित होणार नाही. मी जे करत आहे ते योग्य आहे. अधीच्यानी काहीच केलं नाही असा डांगोरा पिटून स्वतः किती चांगले आहोत हे सिद्ध करण्याचा सगळा आटापिटा का आणि कशासाठी ?

         प्रतिकांतील देशभक्ती पुढे येत असताना त्या प्रतीकांचा होत असलेला गैरवापर याबद्दल कोणीही काहीही चकार शब्द काढायला तयार नसतील तर त्या देशभक्तीचा हा तमाशा किती दिवस करणार ?

         मनात द्वेषभावना ठेवून, जीवित संपत्तीचा विचार न करता प्रतिकांद्वारे देशप्रेम दाखवून, आपण देशाचा कोणता विकास करू शकतो का ? याचा विचार व्हावा त्या विचारातून आजच्या दिवसाची सुरुवात करूयात व एकमेकांशी प्रेमाने वागून आपलं आयुष्य सुखकर व आनंदी बनवूयात. आपल्या सर्वांना या बंदीस्त स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...💐💐💐💐💐💐💐💐

@ जी.संदीप

9552803980

"भोंदूंचं साम्राज्य: तुमच्या भीतीवर उभा असलेला खेळ”

      मागील काही दिवसापासून एक नाव प्रकर्षाने चर्चेत आहे, सोशल मीडियावर सुद्धा त्याच व्यक्तीच्या नावाने विविध memes, पोस्ट viral होत आहेत. ए...