Monday, May 24, 2021

भाऊ




वादळातील सोबती असतो भाऊ

संघर्षातील साथी असतो भाऊ

निर्णय घेतल्यानंतर प्रत्येक परिस्थितीत

साथ देत असतो भाऊच


"तू कर जे होईल ते पाहून घेऊ"

अशी प्रेरणा देत असतो भाऊच

प्रत्येक संघर्षात आत्मविश्वास 

वाढवत असतो भाऊच


कुटुंबास आकार येतो खूप मोठा

भावाच्या पुढाकारामुळं

उगचं नाही म्हणत कुणी

घर सुधारेल त्याच्यामुळं


जबाबदारीच्या ओझ्याखाली

अपेक्षांना दूर ठेवतो भाऊ

स्वतःच्या स्वप्नांचा करून चुराडा

सर्वाना सोबत घेऊन चालतो भाऊ


भाऊच बनतो सर्वात जवळचा मित्र

गुरु आणि कधी आई-बाप सुद्धा

नसेल आयुष्यात भावाची सोबत सदा

तर प्रिय वाटाया लागेल नरक सुद्धा


©जी.संदीप (गोणार, नांदेड)

              ९५५२८०३९८०

Sunday, March 28, 2021

.....म्हणून लॉकडाऊन ची भीती !

लॉकडाऊन मूळ भरलीय धडकी

हातावर पोट आहे मणून नाय ओ सायब

पोराचं नेमकं शिकण्याच वय

त्यात एक वर्ष वाया गेल म्हणून,

छातीत धड-धडायला लागलंय ओ सायब

म्हणून प्रश्न दोन वेळच्या जेवणाचा नाय ओ सायब


एक वर्षाचा विचार करून

तुम्ही त्यावर उपाय काढला

मुलाला नापास न करता

तुम्हीं पुढच्या यत्तेत धाडलं त्याला

पण त्या एक वर्षात हिरावून घेतलेल्या

मूलभूत हक्काचं काय ओ सायब,

त्या एक वर्षात कोवळ्या मनावर

भविष्याचं बीज पेरलं जाणार होत सायब

त्या कोवळ्या मनावर ना रुजलेल्या

बियाचा विचार येतो हो सायब

म्हणून लॉकडाऊन ची धडकी भरते ओ सायब.


चांगलं वर्गात पहिला येणार आमचं प्वार

आज उनाडक्या करत गावभर हिंडतंय ओ सायब

ए,बी,सी,डी वन टू ते जे काय म्हणता ते 

बिना शिकवणी घडा-घडा

बोलून दावणार माझं प्वार

आता तसलं काही विचारताच गप्प-गुमान

मान खाली घालतंय ओ सायब

म्हणून प्रश्न दोन वेळच्या जेवणाचा नाय ओ सायब.


मास्तराला प्यार होत माझं लेकरू

नेहमी कौतुक असायच

सगळ्यांच्या तोंडी गुणांच लेकरू,

आता त्यातले सगळे गुण बदलून गेलेत ओ सायब

काल शालिनतेने वागणार माझं प्वार

आज शिव्यांची लाखोली वाहतंय ओ सायब

हे सर्व पाहून त्याच्या भविष्याची चिंता सतावतेय ओ सायब

म्हणून तुमच्या लॉकडाऊन ची भीती वाटतेय

प्रश्न दोन वेळच्या जेवणाचा नाय ओ सायब


वयात आलेलं प्वार हताश निराश होऊन 

डोळ्यासमोर मान खाली घालुन बसतंय ओ सायब

दोन वर्षे झालं तुमची नोकरभरती नाही,

घोटाळे बंद व्हायचं नाव घेत नाही,

आम्ही तरी त्याला किती आणि

कसा धीर द्यायचं सायब ?

नोकरीविना, बेरोजगरीमुळं पोराचं लग्न जुळत नाही,

लेकीला नौकरी लागलं म्हणून

लग्नापासून दूर ठेवले तिला.

शिक्षणाच्या प्रवाहात आणून तिला

आम्ही काय खूप मोठा गुन्हा केला ?

आता नोकरी नाही, नोकरिवाले मूल भेटत नाही

यात आमचं कुठं काय चुकलं ?

हे जाणून घेऊन तुम्हीच सांगा सायब

आम्ही सामान्यांना कसे दिस काढायचं सायाब ?

हि परिस्थिती पाहता भीती वाटते आम्हा त्या तुमच्या लॉकडाऊन ची

भ्रांत नाही ओ सायब आम्हा

आमच्या दोन वेळच्या जेवणाची.


हि इथली जनता म्हणजेच देश ना ओ सायब

मग जनतेचीच अधोगती असेल,

जनतेचाच विकास नसेल,

जनताच निराश आणि हताश असेल,

जनताच वाऱ्यावर असेल ,

तर देशाचा विकास कसा होईल सायब

देश आणि देशातील प्रत्येक घटकांची

 काळजी लागून राह्यली

म्हणून तुमच्या लॉकडाऊन ची भीती सायब

आम्हा दोन वेळच्या जेवणाची मुळीच भ्रांत नाही वो सायब।



©जी.संदीप (गोणार,नांदेड)

📱 9552803980

Sunday, March 7, 2021

ती खुश आहे

जन्मत असता तिच्या पोटी सांगितलं जातं तिला,

पृथ्वीवर येऊ देऊ नको नष्ट कर तिला.

स्वतःसारखीलाच नाकारते स्वतः ती,

तरीही यात खुश्श आहे ती.


तिला घरात राबायला शिकवते तीच

आणि त्याला बाहेर पाठवते तीच,

या भेदभावाची सुरुवात करणारी असते तीच,

तरीही यात खूप खुश्श आहे ती.


धोका आहे त्याच्यामुळे हे जाणते ती

पण बंधन तिच्यावर लादते तीच,

सात च्या आत घरात यायला सांगते तीच

पण तरीही यात सुद्धा जाम खुश्श आहे ती.


घरकाम करते,

घरासाठी कमी-जास्त सुद्धा घते तीच,

सोबतच नोकरी करते,मावते सुद्धा ती,

तरी आलेल्या पगाराचा हिशोब देते ती,

तरीही यात सुद्धा

बक्कळ खुश्श आहे ती.


मीडियाच्या जाहिरातीत,

स्त्रीवादी पात्राच्या सुद्धा,

बंधनात अडकवते स्वतःला तीच,

तरीही त्यात सुद्धा

चिक्कार खुश्श आहे ती...


निवडणुकीत 50% आरक्षणावर निवडून येते ती,

आणि कारभार मात्र पाहतो तिचा मुलगा किंवा  पतीच, 

तरीही यात सुद्धा

लई  खुश्श  आहे ती.


मुलगा-मुलगी भेदाचे संस्कार करते तीच,

असताना स्वतः सुद्धा क स्त्री तीच,

पुरुषापेक्षा दुय्यम दर्जा स्वीकारते तीच,

तरीही यात सुद्धा मोक्कार खुश्श असते ती.


पण पहा ना,या कवितेत स्त्री

बेफ्फाम खुश्श वाटते ती,

पण वाचल्यानंतर संदीपची कविता,

नकळत दुःखी झाली ती, दुःखी झाली ती....



©️जी.संदीप(नांदेड)

   9552803980

Thursday, January 21, 2021

......दुसरा मार्ग नाही.



 तिच्यासाठी मेणबत्ती पेटवताना

डोक्यातील वासनेला जिवंत जाळाल का ?

काय माल आहे रे !

हे वाक्य ज्यामुळं तोंडी येते

तिला कायमचा सुरुंग लावाल का ?

तीही कोणाची तरी बहीण-मुलगी होती

अशी कल्पना मी मांडणार नाही

काही ठिकाणी बाप, भावानेही तिला सोडलं नाही.



किती मेणबत्त्या पेटवणार ?

मोर्चे, आंदोलने काढणार ?

जीवानिशी गेलेल्या त्या मुलीला

तुम्ही न्याय कसा मिळवून देणार ?


फाशीनंतर आत्म्यास शांती मिळेल

ची भाषा करणाऱ्यांनो,

इथं जिवंतपणी अशांत राहतात त्या,

यासाठी असा कोणता गुन्हा केला त्यांनी.


निसर्गाने पुनरुत्पादनाचा एक घटक दिला तिच्याकडे

हा तिचा गुन्हा आहे का ?

हे पुरुषा,

सेक्स हा पुनरुत्पादन प्रक्रियेचा घटक आहे

वासनेचा भाग नाही हे तुला कधी कळणार आहे का ?


इंटरनेटच्या मोहातून आज डोक्यात

नको त्या गोष्टी प्रवेश करायला लागल्या

सम्यक विचारांची कास सोडून देऊन

सुखोपभोगाकडे जो-तो वळायला लागला.


मेनबत्त्याने, मोर्चा रास्ता-रोकोने

ही मानसिकता संपणार नाही.

तुमच्या-माझ्या मनात ज्यामुळं ही वृत्ती येते

ते विचार रोखल्याशिवाय दुसरा मार्ग नाही.


©जी.संदीप(गोणार,नांदेड.)

९५५२८०३९८०

Sunday, January 3, 2021

ध्येय पूर्ण करणार का फक्त सोहळा साजरा करणार...?





      आज सावित्रीबाई फुले यांची जयंती, तस लिहिण्यासारखं खूप काही आहे पण लिहायची ईच्छा होत नाही. पण दुपारी एका विद्यार्थ्याने मॅसेज केला आणि सांगितलं की,"अस काहीतरी पोस्ट,व्हिडिओ सेंड करा जे काळजाला भिडाव" मी काही वेळ स्तब्ध झालो. सर्व बाजूला ठेऊन काल दुपारी लिहायला घेतलं पण ते रात्रीपर्यंत पूर्ण करू शकलो नाही. आज ते पूर्ण झालं. ते अपल्यासर्वांपुढं ठेवत आहे. वाचावे व काही लक्षात आले तर कळवावे. 


#सडेतोड

#नवनिर्माण 

       एखादी समस्या जाणून घेऊन त्या समस्येवर उपाय काढणारे त्या काळातील समाजसुधारक म्हणून फुले दाम्पत्यांचं नाव घेतलं जातं. म्हणजेच आम्हाला शिकण्याचा अधिकार नसताना आमच्यासाठी शिक्षण उपलब्ध करून देण्याच काम फुले दाम्पत्याने केले. हे काम करत असताना त्यात महत्वाचा वाटा जो होता तो म्हणजे सावित्रीबाई फुले यांचा.

       हे ऐकून वाचून आम्हाला गुळ-गुळीत झालेले शब्द आहेत. त्यातून जी प्रेरणा भेटायला पाहिजे ती आम्हाला भेटत नाही. म्हणजे आम्हाला या शब्दातील भाव काढून टाकून फक्त अक्षर आहेत तेवढेच वाचतोय आणि त्यातून आम्हाला काहीही प्रेरणा मिळत नाही अस झालंय.

      कोणत्याही महापुरुषांची जयंती किंवा पुण्यतिथी असेल तर, आलेला वक्ता काय बोलेल याचा अंदाज श्रोता वर्ग लावत आहे. म्हणजे आपण काय सांगणार हे आता ऐकणाऱ्याला कळत आहे. मग हा घोटीव इतिहास किती वर्षे सांगायचा. सावित्रीबाईंनी स्वतःच्या अंगावर शेण,दगड, गोटे यांचा मारा सहन केला आणि आमच्यासाठी शिकवण्याचा काम चालूच ठेवले. या शब्दातून आम्हाला फक्त काहीवेळा ऊर्जा मिळते, पण त्यांच्या या कार्यातून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे परिस्थितीनुसार आपल्याला कामे करावी लागतील. हा गुण आम्ही कधी डोक्यात घेणार आहोत का ?

      जर आम्हाला खरचं कामे करायची असतील तर, परिस्थितीला बदलवायचे असेल तर, इतिहासावर नाही तर वर्तमानावर लक्ष केंद्रित करावे लागते. आम्ही इतिहास सांगत असताना फक्त इतिहासावरच लक्ष केंद्रित करतोय भविष्याबद्दल आमच्याकडे काहीही प्लॅन नाही असं दिसतंय. अशाने आमची अधोगती, व अस्तित्वात असलेला द्वेषभाव व विषमता नष्ट होणारच नाही. आम्हाला जर खरंच या देशात समतामुलक व्यवस्था निर्माण करायची असेल तर आम्हाला इतिहास जरूर सांगावा लागेल. पण तो ईतिहास सांगत असताना ज्या शिक्षणाची गरज फुले कुटुंबियांना जाणवली, ज्यामुळं शिक्षण दानाच काम त्यांनी सुरु केलं त्याचा उद्देश पूर्ण झाला का ? नसेल झाला तर मग आम्ही कुठे आणि का कमी पडतोय ? याच चिंतन आम्ही का करत नाही ?

      याचा जेव्हा विचार करतो तेव्हा अशी शंका येते की आम्हाला राजकीय पोळ्या भाजून पोट भरायची आहेत. त्यामुळं आम्ही अस काहीही करत नाही. कदाचित ही शंका प्रत्येक वेळी लागू होणार नाही. पण ही शंका जर खरी नसेल तर त्याच स्पष्टीकरण द्या... जर असेल खरी तर ही शंका नाहीशी करण्यासाठी काम करा.

     आज प्रत्येक स्त्री शिक्षण घ्यावी म्हणून आपण धडपड करतोय पण ही शिकलेली स्त्री समतेच जीवन जगत आहे का ? तिला समाजात सन्मानाची वागणूक भेटते का ? समाजात स्त्री शिकली ते फक्त आणि फक्त आर्थिक कणा मजबूत करण्यासाठी म्हणून. पण कमावणाऱ्या स्त्रीने कधी फुले दाम्पत्याच्या त्यागाचा किंवा ध्येय उद्दिष्टांचा विचार केलाय का ? जर ही स्त्री अशा कोणत्याही गोष्टीचा विचार करत नसेल तर तुम्हाला आज जयंती साजरी करण्याचा काय अधिकार आहे ?

      तुम्ही दवाखान्यात गेल्यानंतर एखाद्या गोष्टीची ऍलर्जी असेल तर डॉक्टर तुम्हाला तो पदार्थ तुम्ही खाऊ नका अस सांगतात आणि आपण ऐकतो सुद्धा. काही काळासाठी होणाऱ्या त्रासावर उपाय म्हणून आपण जसे पदार्थ टाळतो, तसेच पण आयुष्याभर आम्हाला काही चालीरितींमुळे त्रास होतो पण तरीही आम्ही त्या चालीरीती सतत चालूच ठवतो. या विचारांमुळे होणाऱ्या ऍलर्जी साठी तुम्ही कोणत्या गोष्टी करणं थांबवलं ?

     म्हणजे आम्हाला शिक्षण भेटलं, उच्च शिक्षणाच्या जोरावर आम्हाला नोकरी भेटली, पण तरीही नोकरी करत असताना आमच्यात सन्मान आला नाही, आमच्या सन्मानाचे काय ? मग आम्ही शिकलेल्या शिक्षणाचा फायदा काय ? आपण शिकल्यानंतर आपल्यात वैचारिक परिवर्तन व्हायला पाहिजे. हे होणं गरजेचं आहे.

     आजची स्थिती बघता आज आम्हाला कोणत्याही संजसुधारकांची गरज नाही. कारण ज्ञानाचे दरवाजे आमच्यासाठी 24 तास खुले आहेत. आम्हाला हवे तेव्हा हवे ते ज्ञान मिळत आहे. म्हणजे आम्हाला आता कोणतेही कार्य करण्यासाठी ज्ञान उपलब्ध होत आहे. फक्त गरज आहे ती एका चिंगारीची आणि ती चिंगारी निर्माण करणारा शब्द आहे  "का ?" हा एक शब्द जर वापरत गेलात तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुमच्यासोबत घडत असलेल्या अन्यायाला वाचा फोडता येते. मग तो स्त्रीवरील किंवा पुरुषावरील असो. त्यामुळं आज आम्हाला आमचा विकास करण्यासाठी कोणत्याही त्रयस्थाची मदत लागणार नाही यातून महापुरुषांना अपेक्षित समाज घटक होऊ व आदर्श समाज घडवू. समतेच आयुष्य प्रत्येकजण जगेल.

✍️✍️@ जी.संदीप (नांदेड)

            9552803980

Wednesday, October 21, 2020

१४ ऑक्टोबर का विजयादशमी ?


       आम्ही माणूस असून सुद्धा आम्हाला माणसासारखी वागणूक का मिळत नाही ? या एका प्रश्नाने क्रांतीचा प्रवास सुरु झाला. आम्हीही माणसे आहोत माणसासारखे जगण्याचा अधिकार आहे मग तो अधिकार आम्हाला का दिल्या जात नाही. तो अधिकार माझ्या समाजाला मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार. हा संकल्प करून डॉ.बाबासाहेबांनी आपल्या कार्याची वाटचाल सुरु केली.

       १९२६ साली मुंबई प्रांतिक विधानपरिषदेचे सदस्य बनले व  १९२७ च्या दरम्यान अस्पृश्यता निवारण्यासाठी चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. ४ ऑगस्ट १९२३ रोजी ब्राह्मणेतर पक्षाचे नेते सी.के. बोले यांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळात एक ठराव पास करून घेतला. त्यानुसार "सार्वजनिक निधीतून बांधलेली किंवा शासकिय नियमांनुसार बनविलेल्या संस्थांनी प्रशासित केलेली सार्वजनिक शाळा, न्यायालये, कार्यालये आणि दवाखाने व सर्व सार्वजनिक पाण्याची ठिकाणे, विहिरी व धर्मशाळाचा वापर करण्यास परिषदेने अस्पृश्य वर्गांना परवानगी दिली आहे. म्हणजेच सगळ्या नागरिकांना शासकीय संपत्तीचा वापर करण्यास अनुमती देण्यात आली. यानुसार महाडच्या नगरपालिकेने चवदार तळे अस्पृश्यासाठी खुले करण्यात आले. परंतु स्पृश्यांनी अस्पृश्यांना पाणी भरण्याची संधी दिली नाही.

      म्हणजेच हिंदू धर्माच्या नियमानुसार अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्याचा किंवा सार्वजनिक ठिकाणी प्रवेशाला मज्जाव करण्यात आला होता. ही बाब बाबासाहेबांच्या लक्षात येताच अस्पृश्यांना हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह करण्याचा निश्चय केला. त्यानुसार १९ व २० मार्च रोजी १९२७ रोजी बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली कुलाबा परिषद आयोजित करण्यात आली. यात चार ठराव पास करण्यात आले. जे हिंदू धर्मातील अस्पृश्यता नाहीशी करण्यासाठीच्या होत्या त्यात, ०१)नोकरितील स्थान, २)स्पृश्यांनी अस्पृश्यांना त्याचे नागरिकत्वाचे अधिकार बजावण्यास मदत करावी

 ३)मृत जनावरे ज्यांची त्यांनी ओढावी, ४)स्पृश्यांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांना वार लावून जेवण द्यावे.

       या परिषदेच्या शेवटी सर्व सहभागी नागरिकांनी आपला मोर्चा बाबासाहेबांच्या नेतृत्वात चवदार तळ्याकडे वळवला. सर्व सहभागी आंदोलकांनी चवदार तळ्याचे पाणी पिले व आम्ही मानव असल्याची जाणीव स्पृश्यांना करून दिली. ही बातमी स्थानिकच्या स्पृश्याना कळली व त्यानंतर आंदोलकांवर हल्ला करण्यात आला. यात बरेच अस्पृश्य जखमी झाले.

      २६ जून, १९२७ रोजी अमरावती येथील अंबादेवी मंदिर प्रवेशासाठी डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली डॉ.बाबासाहेबानी लढा सुरु केला.  दादासाहेब खापर्डे यांच्या प्रवेश मिळवून देण्याचा आश्वासनाने हा  लढा थांबवण्यात आला. अमरावती नंतर पुण्यातील पर्वती टेकडीवरील मंदिर खुले करण्यासाठी पुण्यातील एम.एम.जोशी, ना.ग.गोरे, र.के.खाडिलकर, विनायक भुस्कुटे, स्वामी योगानंद यांच्यासह अन्य स्त्री पुरुषांसह बाबासाहेबांनी हा लढा १३ ऑक्टो १९२७ रोजी हा लढा सुरु केला.

      चवदार तळ्याचा सत्याग्रह, मंदिर सत्यागृहानंतर सुद्धा अस्पृश्यांना देण्यात येणाऱ्या वागणुकीत बदल झाला न्हवता म्हणून नीलकंठ सहस्रबुद्धे, गंगाधर या ब्राह्मण सहकाऱ्यांच्या सोबतीने २५ डिसेम्बर १९२७ रोजी दहनभूमी तयार करून, अस्पृश्याना माणूस म्हणून जगण्याचा हक्क नाकारणाऱ्या मनुस्मृतीचे दहन करण्यात आले.

        या नंतर सुद्धा हिंदू धर्मातील लोकांची मानसिकता बदलत न्हवती, अस्पृश्याना अस्पृश्य म्हणूनच वागणूक दिल्या जात होती. चवदार तळे सत्यगृहाप्रसंगी घेतलेल्या निर्णयामुळं तर त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायात वाढच झाली होती.

      या स्थितीत बाबासाहेबानी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी प्रयत्न करतच होते. त्यातूनच नाशिक येथील काळाराम मंदिराचा सत्याग्रह करण्यात आला. ०२ मार्च १९३० रोजी काळाराम मंदिर सत्याग्रह करण्याचे निश्चित करण्यात आले. यासाठी निश्चित करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष केशव वर्धेकर तर सचिव म्हणून कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची निवड करण्यात आली. नाशिक येथील शंकरराव गायकवाड यांची सभासद म्हणून निवड करण्यात आली.  अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी दिलेला हा सर्वात मोठा लढा होता असे दिसून येते. या लढ्यात साधारणपणे ८००० आंदोलकांचा सहभाग होता. तत्कालीन जिल्हाधिकारी गार्डन यांनी रामकुंडावर येऊन आंदोलकांची भेट घेऊन त्यांना राममंदिर खुले करण्याचे आश्वासन दिले.

         या सर्व आंदोलनानंतर सुद्धा स्पृश्यांच्या मनातील अस्पृश्यांबद्दलची मानसिकता बदलत न्हवती. स्पृश्याना हीन आणि तुच्छतेची वागणूक देतच होते. आता पर्यंत केलेलं मंदिर सत्यागृह हे देव पावेल किंवा देव आमचं भलं करेल या उद्देशाने केलेले न्हवते तर आम्ही ही माणसे आहोत त्याप्रमाणे आम्हाला प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करण्याचा अधिकार आहे, तो आमचा हक्क आहे. तो हक्क बजावण्यासाठी म्हणून हा सर्व प्रयत्न होता. पण तरीही तशी वागणूक मिळत न्हवती म्हणून येवले येथे धर्मांतरा संदर्भात घोषणा केली.

       हिंदू धर्मात राहून आम्हास मानवी वागणूक दिल्या जात न्हवती, ते मिळवण्यासाठी प्रयत्न करून सुद्धा हिंदू मानसिकता आम्हाला सन्मान आणि मानव म्हणून वागणूक देण्यास तयार न्हवती. मग धर्मांतर हा शेवटचा पर्याय शिल्लक राहिला. मग धर्मांतर करण्याचा निर्णय स्वतः बाबासाहेबानी घेतला. तो निर्णय १९५६ साली बाबासाहेबांनी अंमलात सुद्धा आणला. ज्यामुळं आज आमचा आर्थिक, मानसिक, सामाजिक विकास होत आहे. राजकीय व सामाजिक स्तरावर आमी पूर्णपणे विकसित होऊ शकलो असतो, पण आमची वैयक्तिक अशी संस्कृती निर्माण होऊ शकली नाही. हे यामागचं मुख्य कारण आहे असं मला वाटत. मग बौद्ध म्हणून आपली एक संस्कृती नसल्यामुळंच आमचा बाबासाहेबांनी केलेल्या धर्मांतर सोहळा साजरा करण्यासंदर्भात वाद निर्माण होत आहेत. त्यात १४ ऑक्टो का अशोक विजया दशमी असा वाद निर्माण होऊन. काही उपासक १४ ऑक्टो तर काही उपासक अशोक विजया दशमी दिनी या सोहळा साजरा करतात. असं घडण्यामाग कोण कारणीभूत आहे. याचे कारण काही जण देत असतात. काही जण या वादासंदर्भात म्हणतात की, आम्हाला विचार पुढं पोहचवायचे आहेत. त्यामुळं १४ ऑक्टो ला केला काय ? किंवा अशोक विजया दशमीला केला काय ? काहीही फरक पडत नाही. दोन्ही दिनाच्या माध्यमातून बाबासाहेबांचा विचार उपसकांपर्यंत पोहचतो हे मह्त्वाचं आहे.

        धर्मांतर सोहळ्यासंदर्भातील दोन्ही मुद्दे पाहिले तर एक बाब प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे आम्ही धार्मिक स्तरावर आमचा विकास करण्यास कुठं तरी कमी पडत आहोत. (त्या धर्मास धम्म म्हणू किंवा अन्य कोणता शब्द असला तरी तो सुद्धा वापरू शकता. त्याबद्दल काहीही आक्षेप नाही.) आपला धम्म आला म्हणजे आमची संस्कृती आली. ती संस्कृती आहे का आमची ? आम्हाला हिंदू धर्माचे सण साजरे करू नका असे सांगितले जात. पण धम्मातील सर्व मानवांना एकत्रित आणणारा असा कोणता सोहळा आहे ? थकलेल्या मानवी मनाचा विरंगुळा करण्यासाठी कोणता आधार किंवा काय उपाययोजना आहेत आमच्याकडे ? प्रत्येक पौर्णिमा, बुद्धजयंती, बाबासाहेब जयंती. अशी उदाहरणे आपण द्याल. पण हे सोहळे आमच्या आयुष्यात रूढ झालेत का ? तर याच उत्तर नकारात्मक प्राप्त होते. बाबासाहेब आंबेडकर जयंती ही धार्मिक स्तरावर करायचा सोहळा नाही तर सामाजिक स्तरावरील सोहळा आहे. पण धार्मिक स्तरावर आमचा एकही सोहळा नाही. मग असे असताना आम्ही धार्मिक स्तरावर अविकसित आहोत असं आपणास वाटत नाही का ? जिथं धार्मिक स्तरावर आमची संस्कृती विकसित नाही. तिथं १४ ऑक्टो का अशोक विजयादशमी हा वाद निर्माण होणारच.

         असा वाद असताना दोन्ही दिवशी बाबासाहेबांच्या विचारांच्या देवाण-घेवाण होते. त्यामुळं कोणत्याही दिवशी साजरा केला तर त्यात गैर काय ? असा प्रश्न करणाऱ्यां विद्वानांनी समजाला उत्तर द्यावे की, येणाऱ्या पिढीसाठी धार्मिक संस्कृती म्हणून आपण काय देऊ शकाल ? किंवा काय दिल ?  हे सोहळे साजरे करत असताना काय घडते यातून किती विचार समाजपर्यंत पोहचतात याच वास्तव सर्वाना माहित आहे. त्यामुळं आपलं अपयश झाकण्यासाठी काहीतरी मलमपट्टी करून बाजूला होण्याने आपली संस्कृती विकसित होणार नाही.

        बुद्धांची विचारसरणी ही मानवाला आनंदी जीवन जगण्यासाठी मार्ग दाखवणारी आहे. उपासक आणि भिक्खू या दोन विभागात यातील घटक विभागलेले आहेत. भिक्खू साठी जीवनपद्धती ही खूप बंदिस्त नियमावली आहे, तर उपासकांसाठी त्यात शिथिलता देण्यात आली आहे. मग या उपसकांसाठी आपली संस्कृती निर्माण करणं हे धार्मिक अभ्यासक व बौद्ध भिक्खू वर्गाचं कर्तव्य आहे का नाही ? संस्कृती निर्माण करत असताना, त्या-त्या धार्मिक व्यक्ती प्रमुखांच्या जन्म दिवस व वर्षाला सुरुवात मानून पुढील कालगणना केली जाते. अशी काल गणना करत असताना, बौद्ध धम्मात पौर्णिमेला महत्व आहे. म्हणजेच बौद्ध संस्कृती ही चांद्रकालगननेशी निगडित राहील अस मला वाटत. म्हणजेच आमच्या कोणत्याही धार्मिक संस्कृती चा विचार केल्यास आमची संस्कृती ही चांद्रगणनेशी निगडीतच रहायला हवी. तसे असेल तर धम्मचक्र प्रवर्तन दिन सुद्धा हा तारखेनुसार नव्हे तर मग चंद्राच्या स्थितीनुसारच आम्हास साजरा करावा लागेल.

         बाबासाहेबांनी धर्मांतराची दिनांक निवडत असताना मुळात सध्या प्रचलित कालगनेनुसार दिनांक निवडली नव्हती तर तो एक प्रसंग होता. ज्या दिवशी सम्राट अशोकाने कलिंगच्या युद्धानंतर बौद्ध धम्म अंगीकारला/स्वीकारला होता. तो मुहूर्त(मुहूर्त यासाठी त्या काळात दिनांक हा उल्लेख न्हवता म्हणून) म्हणजे अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील दहावा दिवस म्हणजेच अश्विन शुक्ल दशमी. जो १९५६ मध्ये १४ ऑक्टोबर रोजी आला होता. म्हणजेच धर्मांतर करत असताना बाबासाहेबानी दिनांक निवडली न्हवती, ही बाब आम्हाला इथं लक्षात घेणे गरजेचं आहे. व त्यानुसारच आम्हाला हा धर्मांतराचा सोहळा साजरा करणे गरजेचे आहे.

        धर्मांतराचा सोहळा म्हणजे नवधर्मांतरीत किंवा आधुनिक भारतातील एक मोठी धार्मिक चळवळ आहे. ही चळवळ विकसीत करायची असेल तर दिनांक नाही तर ती तिथ महत्वाची ठरेल.

        ही बाब जर आम्ही लक्षात घेतली तर आमच्या लक्षात येते की, बौद्ध धम्माचा सूर्य कालगननेशी नव्हे तर चांद्र कालगननेशी संबंध जुळल्या जातो. मग असे असताना आम्ही १४ ऑक्टो चा अट्टाहास का धरायचा ? किंवा दोन्हीही दिवशी साजरा केला तर काय फरक पडतो हा युक्तिवाद का करायचा ? धार्मिक बाबीशी संबंधित ज्या गोष्टी आहेत. त्या चांद्रकालगननेशी संबंधित आहेत. त्यामुळं त्यानुसारच चाललो तर एक संस्कृती निर्माण होऊ शकते. तशी संस्कृती निर्माण करणं गरजेचं आहे. तसे घडत नाही म्हणूनच तर आमच्या डोक्यातून हिंदू संस्कृती नाहीशी होऊ शकली नाही. हिंदू संस्कृतला पर्याय म्हणून बौद्ध संस्कृती स्वीकारायची किंवा निर्माण करायची नाही तर मानवी विकासासाठी गरजेची बाब आहे म्हणून ही संस्कृती निर्माण करणं गरजेचं आहे.

        सामाजिक राजकीय स्तरावर जसे आम्ही अयशस्वी आहोत तसेच धार्मिक स्तरावर सुद्धा अयशस्वी ठरत आहोत. हे यावरू। लक्षात येत. त्यामुळं धम्मातील भिक्खू संघाने, विद्वान मंडळी, धार्मिक संघटनाने एक बौद्ध संस्कृती विकसित करणे गरजेचे आहे. ती जो पर्यंत निर्माण होत नाही. तोपर्यंत आमच्या आचरणात बौद्ध तत्वज्ञान येऊ शकत नाही. हिंदू धर्म जरी त्यागाला तरी हिंदू संस्कृती त्यागली नाही. त्या संस्कृतीचा त्याग करायचा असेल तर आम्हाला पर्यायी बौद्ध संस्कृती द्यावीच लागेल. आपली म्हणावी अशी बौद्ध संस्कृती नही म्हणून हे सर्व वाद वाढत आहेत. येणाऱ्या पिढीला काही देणं ही आमची जबाबदारी आहे. मग ही जबाबदारी लक्षात घेऊन आपण यावर काम करावं आणि पूर्ण धर्मांतरितांना नवं संस्कृतीच्या मार्गावर नेणं कितपत गरजेचं आहे. हे जाणून घेऊन कामाला लागाव.

      येणाऱ्या काळात धार्मिक बाबीमध्ये कोणत्याही प्रकारचा तिथ का दिनांक हा वाद निर्माण होणार नाही यासाठी खबरदारी घ्यावी. १४ ऑक्टोबर चा मुद्दा इथंच थांबवून अश्विन शुक्ल दशमी(अशोक विजया दशमी) लाच हा धम्मचक्र प्रवर्तन सोहळा साजरा व्हावा. प्रत्येक बौद्ध व्यक्तीच्या मनात बौद्ध संस्कृती रुजवावी. ज्यातून बौद्ध धम्मसंस्कृती म्हणून रुजण्यास सुरुवात होईल आणि या असल्या वादाला पूर्णविराम मिळेल.


©जी.संदीप (गोणार,नांदेड)

      ९५५२८०३९८०




Sunday, October 18, 2020

परिधान कर तू.....


 

दरवर्षी आम्ही सांगतो तुम्हा

उपवास वृत्त वैकल्य सोडून ज्ञान अंगिकारा

नवरात्रीचा विचार डोक्यातून काढून टाकून

स्वतःच्या सम्यक प्रगतीचा मार्ग धरा


आज नवरात्रांत तुला सन्मान देणारे

उद्या शरीराचे तुझ्या लचके तोडतील

तुला देवीसमान दर्जा देऊन इथं

तुझ्यावरच चरित्राचा आळ घेतील


तुला दिल्या जाईल मानाची वागणूक आज

देवीसमान समजून कुठल्यातरी मंडपात

उद्या तुलाच बनवून त्यांची शिकार

रमून जातील ते तुझ्यासह भोग-विलासात


कदाचित तुही असशील कारणीभूत

पण पुरुषही त्याला जबाबदार असतात

स्वतः होऊन निष्कलंक बाजूला

तुझ्या चरित्रावर थुंकत बसतात


चरित्रावर तुझ्या प्रश्न करणाऱ्यांना

या जन्मात सवाल तू करशील का ?

ही पिढी जरी नसली तरी येणाऱ्या पिढीच्या

सन्मानासाठी जबाबदार तू ठरशील का ?


किती वर्षे सांगायचं तुला आम्ही 

हा असला नाद सोडून दे

सावित्रीच्या स्वप्नांचा विचार करून

स्वतःच्या जीवनाला आकार दे


हे बघ बाई, वृत्त वैकल्याने

भलं होईल ही जर असलं तुझी आस

मग तूच ठरशील कारणीभूत

तुझं आयुष्य होण्या भकास


नऊ रंगाची साडी नऊ दिवस घालू नको

असं आम्ही तुला आता का सांगावं

तू आवश्यक शिक्षण घेतलेले असताना

तुझं हित तुला का न उमजावं


स्वतःच्या आत्मसन्मानासाठी

उचल पाऊल आणि तोड त्या बेड्या

झुगारून देऊन या परंपरेला

परिधान कर तू अस्मितेच्या साड्या...

©जी.संदीप (गोणार,नांदेड)

     ९५५२८०३९८०

"भोंदूंचं साम्राज्य: तुमच्या भीतीवर उभा असलेला खेळ”

      मागील काही दिवसापासून एक नाव प्रकर्षाने चर्चेत आहे, सोशल मीडियावर सुद्धा त्याच व्यक्तीच्या नावाने विविध memes, पोस्ट viral होत आहेत. ए...