Wednesday, May 6, 2020

बाबासाहेबानंतर बुद्ध धम्माची वाटचाल......

  • बाबासाहेबानंतर बुद्ध धम्माची वाटचाल......



       बाबासाहेबांच्या आयुष्यातलं 1956 साल उजाडलं तसं 1935 च्या घोषणेचा विचार डोक्यात धुमाकूळ घालायला लागला. त्यावेळी विविध धर्माचा अभ्यास चालू होता. प्रत्येक धर्म पंथाचा अभ्यास केल्यानंतर तथागत बुद्धांचा धम्म स्वीकारण्याचे निश्चित केले व बाबासाहेबांनी 14 ऑक्टो 1956 (विजयादशमी) रोजी धम्माचा स्वीकार केला.स्वीकार करत असताना स्वतःतील स्वतःच्या वर्तनात पूर्वीच बदल झालेला होता. त्यामुळं बुद्ध तत्वज्ञानाची उपयोगितेची जाणीव त्यांना झाली होती. म्हणून त्यांनी आपल्या अनुयायांनी सुद्धा हा धम्म स्वीकारून अंगिकारावा यासाठी मोठा सोहळा आयोजित केला होता. 14 तारखेला स्वतः दीक्षा घेऊन 15 तारखेला अनुयायांना दीक्षा दिली. लाखो अनुयायांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दीक्षा घेतली. धम्म स्वीकारल्यानंतर जे परिवर्तन हवं होतं ते घडलं नाही. त्याला कारणेही तशीच त्या कारणांचा थोडक्यात आढावा.....
      1956 साली बाबासाहेबानी धम्म तर आम्हाला दिला, पण तो काय आहे ? कसा आहे ? त्याच्याने अमच्यावरचे अन्याय संपणार आहेत का ? असे कोणतेही प्रश्न आम्हाला निर्माण झाले नाहीत. हे निर्माण होणे गरजेचे होतं.  बाबासाहेब सांगत आहेत म्हणजे  ते आमच्या फायद्याचंच असणार असा विचार करून प्रत्येकाने तो धम्म आपला म्हणून आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या जन्मदाखल्यावर नोंद करू लागला. पण परिस्थिती बदलली नाही. हिंदू महार ते हिंदू महारच राहिले. कालांतराने नवबौध्द झाले पण व्यवहार आणि वागण्यातील स्थिती मात्र जैसे थेच होती.हि स्थिती बदलली कर वरील प्रश्न स्वतःला विचारून स्वतःत बदल घडवला असता तर. ते झाले नाही, म्हणून आज सुद्धा बुद्ध आणि बाबासाहेबांच्या प्रतिमेसोबत हिंदू देवतांच्या प्रतिमा घरा-घरात नजरेस पडतात.  धर्मांतराच्या काळापासून आतापर्यंतच्या काळातील उपसकांचा व त्यांच्या बुद्ध धम्माकडील प्रवासाचा प्रवास लक्षात घेण्यासाठी त्यांची कालखंडानुसार चार प्रकारात विभागणी करूया.
01) धर्मांतरावेळची सुजाण नागरिक,
02)धर्मांतरावेळची बालके( आज साठी पार केलेले),
03) 70 व 80दशकात जन्मलेली,
04) 90 व 2000 च्या दशकात जन्मलेली.   या चार वयोगटांच्या माध्यमातून आपण बुद्ध धम्माची वाटचाल समजून घेऊया.  
     पहिल्या पिढीतील उपसकांचा प्रत्यक्ष सहवास आपणास लाभला नाही. किंवा त्यांच्या काळात नेमकं काय होणं गरजेचं होतं ते वरील प्रश्नवरून लक्षात येईल. त्यानंतरची दुसरी पिढी ज्या व्यक्तींनी स्वतः भोगलंय, सहन केलंय, अस्पृश्यता काय असते याचे दाहक चटके अनुभवलेत. स्वतः काबाड कष्ट केले तरी त्यांचा व्यवस्थेने छळ केला. कित्येक दिवस उपाशी राहिले.  अशा स्थितीत कोणताही देव आपल्या मदतीला धावून येऊ शकत नाही हे त्यांना खात्रीशिरपणे माहित झाले. तरीही त्यांनी आपल्या घरात देवाला स्थान दिले. एवढंच नाही तर गावातील देवळातील देवापुढे पायऱ्यांच्या खालूनच डोकं टेकवणं, नारळ फोडणे, नवस बोलणे आदी कामे केलेली आहेत व आतासुद्धा करतात. यांना देवाचे फोटो घरात लावू नये किंवा त्यांची पूजा करू नये एवढं संगण्यापुरत शिक्षित ज्ञान आजच्या तरुणाईपुढे आहे. पण "अनुभव हाच खरा गुरु" जे म्हणतात तो यांच्यापुढं फिका का पंढतो ? असा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. हे सर्व आत्ता वयाची साठी ओलांडलेल्या अनुयायांबद्दल आहे. याचे नेमके काय कारण असू शकेल. एक यांचा बाबसाहेबांच्या चळवळीशी प्रत्यक्ष न आलेला संबंध. दोन विचारांची गुलामगिरी.
      ही दोनीही करणे यामागे आहेत असं मला वाटत. नागपूरकडील परिसरातील बौद्धांच्या संपर्कात जेव्हा आलो. त्यांचे राहणीमान व वागणुकीचे निरीक्षण केले तेव्हा लक्षात आलं की, जास्तीतजास्त उपासकांची देवाबद्दलची भूमिका नकारात्मक आहे. ते देवाला आपल्या आयुष्यात स्थान देत नाहीत. म्हणजेच धर्मांतराच्या चळवळीशी संबंधित उपासक हे देवाच्या प्रतिमा घरात ठेवण्याच्या विरोधात आहेत. पण त्याच काळातील उपासक जे प्रत्यक्ष दीक्षा घेतले नाहीत. अप्रत्यक्षरीत्या बौद्ध झाले. त्यांनी मात्र देवाला स्वीकारणं, त्यांची उपासना करणं त्यांच्याप्रती श्रद्धाभाव दाखवणं चालूच ठेवल. दुसऱ्या  कारणांचा विचार करता ते कारण म्हणजे : विचारांची गुलामगिरी- हिंदु धर्मातील चाली-रितींचा पगडा, आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर कोणत्या गोष्टी कराव्या लागतात याची बंधने. ती जर नाही केली तर देव कोपतो कोणत्याही कार्यक्रमाच्या प्रसंगी त्याची पूजा केली तर कार्य यशस्वी होते. अन्यथा ते योग्य पद्धधतीने पार पडत नाही. यातून कुलदेवतेची निर्मिती, प्रत्येक प्रसंगी कुलदेवतेची पूजा करणे ही सक्ती झाली. पण बाबासाहेबांच्या आधुनिक विचारसरणीचा यांच्या विचारसरणीवर काहीही परिणाम झाला नाही.
       अशा पद्धतीने  धर्मांतर काळातील पहिल्या व दुसऱ्या पिढीकडून परंपरेचा प्रवास चालूच राहिला. यानंतर तिसऱ्या पिढीचा काळ सध्या सुरू आहे. या पिढीला शिक्षणाकडे वळवणे, त्यांना चांगले आयुष्य जगत जगता यावे यासाठी दुसऱ्या पिढीने कष्ट सहन केले. आपल्यासारखी गुलामी, महाराकी करण्याची वेळ आपल्या मुलांवर येऊ नये यासाठी अथक परिश्रम घेतले. या पिढीतील उपासक शिक्षण घेऊन उत्तम रित्या नोकरी किंवा अन्य व्यवसाय करत आहेत. या पिढीतील काही उपसकानी बुद्ध स्वीकारला स्वतःच्या वर्तणुकीत बदल घडवला तोही काही प्रमाणात.  ज्यांनी स्वतःत बुद्ध विचारसारणीनुसार बदल घडवला ते आपल्या पालकांना विनंती करतात की,"तुम्ही देवांची पूजा करू नका, उपवास करू नका, नवस वैगरे बोलू नका. त्यांच्यामुळं आपल्या आयुष्यात कोणताही बदल घडलेला नाही. त्यामुळं त्यांना घरात स्थान देऊ नका." तेव्हा ते पालक आपल्या पाल्याला म्हणतात 'चार बुक शिकून लई शहाणा झाला का ? काय केल्याने काय होते हे आम्हाला कळत नाही ? त्याच्यामुळंच तू एवढा मोठा झालास का ?' असे प्रत्युत्तर येते तेव्हा त्या पाल्याने समजून सांगायचा प्रयत्न केला तरीही त्यांच्या पुढं काहीही चालत नाही. शेवटी निरुत्तर राहण्याविना दुसरा पर्याय नसतो. प्रत्यक्ष त्रास सहन केलेली पिढी जर अशी वागली तर ?
      काही कालखंडाने चौथ्या पिढीच्या प्रवासाला सुरुवात होईल. सध्या ती संस्कारमय वातावरणात आहे. ही पिढी आधुनिक जीवनशैली जगण्यात मश्गुल आहे. यातील जास्तीत-जास्त उपसकांचा कल हा धर्म-जीवन जगण्याची उत्तम तत्वज्ञान यांच्याशी नाहीच आहे. धर्मातील प्रत्येक गोष्ट ते इव्हेन्ट म्हणून साजरा करतात. त्यातील आदर्श जीवन जगण्याचा तत्वाशी यांचा संबंध येईल असे मला वाटत नाही. यावर्षी बाबासाहेबांची जयंती साजरी करायला भेटली नाही. याच यांना खूप दुःख वाटलं. कारण, त्यानिमित्ताने  होणारी कपड्यांची खरेदी,करता येणारा जल्लोष. हे सर्व शक्य झालं नाही. याची खंत आहे कारण, वर्षातून एकदाच जल्लोष साजरा करता येत असताना सुद्धा हे शक्य झालं नाही.
       बाबासाहेबांच्या धर्मांतरानंतरचा तीन-चार पिढ्यांचा काही दाखल्यांच्या माध्यमातून मानसिकता लक्षात घेतली. त्याआधारे  बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या चळवळीची सद्य स्थितीतील व भविष्यातील वाटचाल लक्षात येते. पहिल्या पिढीने कोणताही प्रश्न न करता बौद्ध धर्म कागदोपत्री स्वीकारला, दुसऱ्या पिढीने बुद्ध व बाबासाहेबाना आदर्श मानत स्वीकारला तिसऱ्या पिढीने बुद्धाचे तत्वज्ञान काही प्रमाणात अंगीकारत तो स्वीकारला. वेळ चौथ्या पिढीची ती कशी स्वीकारेल हा एक मोठा प्रश्न आहे.
       दुसऱ्या पिढीने जो त्रास सहन करून आपल्या मुलांना वाढवलं त्यांना प्रत्यक्षरीत्या व अनुभवातून माहित आहे की, आयुष्यात देवाचं काही योगदान असू शकत का ? पण तरीही त्यांनी देवाला नाकारलं नाही. तथागतांचा धम्म अंगीकारला नाही. तथागतांचा धम्म काय आहे हेच खूप उपसकाना माहित नाही. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील संघर्षांशी दोन हात करत कुटुंबाचा विकास घडवायचा होता. पाटलांच्या शेतावर रोजंदारीसाठी जाणे, ते सांगतील ते अन्य काम करणे रोजच्या दिनक्रमात त्यांचा गावातील पाटील समजल्या जाणाऱ्या व्यक्तीशी दिसवसभर संबंध यायचा. या दिनक्रमात त्यांनी बुद्ध तत्वज्ञानाला बाजूला ठेवलं पण जेव्हा सर्व सुरळीत झालं. पाटलांच्या शेतावर राबण सोडून स्वतःच्या जेव्हा कष्ट करू लागलो तेव्हा आम्ही या देवांना का नाकारलं नाही ? व बुद्धाला का स्वीकारलं नाही ? यातून निर्माण झालेली परिस्थिती समजून घेऊन जर तुम्ही याची उत्तरे आता दिली नाहीत तर मानवी जीवनाचे भविष्य अंधकारमय आहे. 'भारत बौद्धमय करेन' हे स्वप्न स्वप्नच राहील. आता जी पिढी 60-65 च्या वर आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यात कष्ट सहन करून, बाबासाहेबांना आमच्यापर्यंत पोहचवण्याचं काम केलं आहे. पण यासोबत बुद्ध न अनुसारण्याची जी चूक केली त्याबद्दल त्यांनी खुलासा करणं गरजेचं आहे. यातून बुद्ध धम्म फक्त भौतिकरित्याच नाही तर मानसिकरित्या सुद्धा स्वीकारण्याची सुरुवात होईल.
      तिसरी पिढी आपले पालक ऐकत नाहीत म्हणून त्यांच्यापुढं हतबल झाली. शहरात येऊन आधुनिक जीवन जगू लागले. जगत असताना यातील 05-10% उपासक बौद्ध तत्वज्ञानाचा अभ्यास चिंतन व मार्गदर्शन करू लागली. पण आत्मसात करून अंगिकरण्याचं प्रमाण खूपच कमी. याचे परिणाम असे झाले की, बुद्ध धम्म हा इतर धर्मांपेक्षा वेगळा आहे हे निदर्शनासच येत नाही. यामुळं बौद्ध धम्माच्या प्रसाराच प्रमाण कमी झालं.2006 साली मोठ्या संख्येने धर्मांतर झाले. पण हे धर्मांतर बौद्धांच्या आचरण बदलतील स्थितीमुळे नाही तर भौतिक बदलामुळे घडून आले. हा भौतिक बदल बौद्धधम्ममुळे नाही तर तो बदल संविधानिक अधिकारांमुळे घडून आले. संविधानिक अधिकारांमुळे स्वातंत्र्य व शिक्षण मिळाले, त्यातून बाबासाहेबांच्या कार्याची प्रेरणा घेत भौतिक बदल बौद्ध उपसकानी घडवला. पण आमच्या मनावर आजही 80-90 % हिंदूंच्या चालीरीतीचा पगडा आहे. हिंदूंच्या काही गोष्टी नाकारत असताना त्याला बौद्ध धर्मातील पर्याय शोधले. पण हिंदू संस्कृती नाही सोडली. असा तिसऱ्या पिढीचा बौद्ध धम्माकडील प्रवास आहे.
       या दोन पिढ्यांचा आधार घेत चौथी पिढी घडत आहे. विकासाच्या एकविसाव्या शतकात ही पिढी वाढत आहे. या शतकात देश आर्थिक महासत्ता होण्याची स्वप्ने पाहत आहे. देशाच्या या स्वप्नातच ही पिढी वाढत आहे. या काळात त्यांच्यावर भौतिकवादाचे संस्कार जास्त प्रमाणात होत आहेत. यात त्यांचा काहीही दोष नाही. कारण दुसऱ्या व तिसऱ्या पिढीने भौतिकवादाला महत्व दिले.  त्याचंच अनुकरण हि चौथी पिढी करत आहे. या चौथ्या पिढीने शिक्षण घेत असताना यांना गुणवत्ता व आकड्यांचा खेळ शाळेत व घरातसुद्धा शिकवला जातोय. त्यातून त्यांची मानसिकता भौतिकवादाची बनली आहे. वागणुकीपेक्षा राहणीमानावर जास्तीचा भर देण्यात येतोय. कारण, बाळव्यापासून किती आकलन केलंय यापेक्षा किती मार्क्स मिळवले यावर भर दिल्या गेलाय. यामुळं या पिढीचा कल भौतिक सुखाकडे वाढत चाललाय. बुद्धांची शिकवण हे भौतिक सुखापेक्षा मानसिक सुखाला महत्व देणारी आहे. पण तिसऱ्या पिढीने हे स्वीकारलं नाही म्हणून चौथी पिढीही तेच करतेय. त्यातून यावर्षी बाबासाहेबांची जयंती जल्लोषात साजरी नाही करू शकलो याच दुःख व्यक्त करतेय. पण अशा सोहळ्यांपेक्षा समाजाचा विकास करण्याकडे, बौद्ध तत्वज्ञान अंगिकरण्याकडे आमचा कल असणं गरजेचं आहे.
       अनेक प्रसंगात दाखले देत आम्ही ओरडू-ओरडू सांगतोय; युद्ध नको बुद्ध हवाय. पण जग बहिरे आहे हे आम्हाला कधी कळणार ? जगाला रिझल्ट(परिणाम) हवा आहे, मग ते दाखवायचा असेल तर आम्हा सर्वांना बुद्ध तत्वज्ञानाचा अंगीकार करावा लागणार आहे. जेव्हा आम्ही पंचशील, अष्टांगिक मार्ग व इतर बुद्ध शिकवणीसह बौद्ध तत्वज्ञानाचा अंगीकार करू तेव्हा आमच्यात जो बदल झालेला जग पाहिलं, तेव्हा त्यांना ओरडून सांगायची गरज राहणार नाही, जग आपोआप तुंच्यामागे येईल.
        येणाऱ्या पिढीचा बुद्ध आचरणाची वाटचाल वाढवण्यासाठी बाबासाहेबांनी व ईतर दोन पिढ्यांनी किती कष्ट सहन केलेत याची जाणीव या पिढीला नाही. ही पिढी गुलामगिरीपासून दूर गेलेली आहे. त्यांच्या आजोबांनी काय भोगलं हे त्यांना फक्त काही प्रमाणात ऐकीव आहे, पण प्रत्यक्ष अनुभव नाही. ते अनुभव अप्रत्यक्षपणे द्यायला तुम्ही जिवंत आहात. आपल्या मुलांवर आणि नातवांवर बौद्ध तत्वज्ञानाशी संबंधित बदल घडवा अन्यथा काळ तुम्हाला माफ करणार नाही. ही चौथी पिढी सर्व काही विना कष्टाने व कोणत्याही प्रकारच्या सामाजिक बंधनाची त्रास सहन करत नाही. तो त्रास काय असतो याना माहित नाही. यातून ती भौतिक वादाकडे वाटचाल करेल व बौद्ध तत्वज्ञान बाजूला राहील.
       आम्ही लिखाण किंवा भाषणाच्या माध्यमातून या गोष्टी या पिढीसमोर मांडू, पण तुम्ही अनुभवाच्या माध्यमातून  चिंतानात्मक जे सांगाल ते आमच्या कार्यपुढं फिक ठरेल. म्हणून तुम्ही स्वतः पुढं या व अनुभवांची शिदोरी या पिढीपुढं मोकळी करा. मनमुरादपणे तुमची शिदोरी चाखण्याचा अधिकार या पिढीला आहे. तो चाखु द्या. येणाऱ्या पिढ्यांना फक्त अक्षरेच वाचायला भेटतील पण त्यातून ते बळ किंवा प्रेरणा त्यांना मिळणार नाही, जी तुम्हाला मिळाली होती. तुम्ही जर स्वतःत बदल घडवत अनुभव सांगायला लागाल, तर नक्कीच येणाऱ्या पिढीला बळ देण्याचं काम हि तिसरी व चौथी पिढी करेल.
        अशा पद्धधतीने प्रतिकातला बौद्ध धम्म जो पुढं येत आहे. तो बाजूला राहील व बाबासाहेबानी दिलेला बुद्धांचा बौद्ध धम्म पुढं येईल व बाबासाहेबांचं स्वप्न पुढं जाण्यासाठी मार्ग भेटेल. अन्यथा प्रतिकांतील बौद्ध धम्म पुढं आला तर बाबासाहेबांच्या भारत बौद्धमय घडवण्याचं स्वप्न अधुरच राहून जाईल. त्यासोबतच मानवाचा मानवाशी जो व्यवहार आहे तो बदलून जाईल. ऍक्सिडंट झाला तर फोटो व व्हिडीओ बनवऱ्यांची संख्या वाढत जाईल. म्हणून दुसऱ्या पिढीतील उपसकाना विनंती आहे. आपण समोर या व चळवळीला योग्य दिशेने घेऊन जा. आमच्यात आता कोणतीही ताकद नाही असं म्हणू नका. स्वतःत बदल घडवा, घरातील देवांना घराबाहेर काढा, आप-आपसातील मतभेद नष्ट करा व आपल्या गावातील बौद्ध अनुयायी म्हणजे एक कुटुंब होय. या पद्धतीने आचरण ठेवा. बुद्धांच्या शिकवणीचा अंमल करून तिसऱ्या व चौथ्या पिढीला आदर्श घालून द्या. ही भौतिकवादाची वाटचाल येथेच थांबवा. अन्यथा कोणत्याही कारणाने मानवावर संकट ओढवून घेण्यास जबाबदार ठरून दुःखाचे कारणीभूत व्हा.  वेळ आहे तुमच्याकडे ठरवा व या पिढीचे मार्गदर्शक व्हा व बुद्धाने केलेल्या त्यागाला व बाबासाहेबांच्या स्वप्नाला मूर्तरूप देण्याकडे वाटचाल करूया.


                                           @ जी.संदीप (नांदेड)
                                                 9552803980

7 comments:

  1. एकदम छान.
    उत्तम मांडणी.
    पण सर जी आताची चवथी पिढी आहे त्याच्यावर दोन मुद्यांवर प्रकाश टाकावा जसे की आजच्या बौध्द म्हूणन पिढीचे राहणीमान,आहार पद्धती,संघटना, आणि संघटीतपणा.

    ReplyDelete

"भोंदूंचं साम्राज्य: तुमच्या भीतीवर उभा असलेला खेळ”

      मागील काही दिवसापासून एक नाव प्रकर्षाने चर्चेत आहे, सोशल मीडियावर सुद्धा त्याच व्यक्तीच्या नावाने विविध memes, पोस्ट viral होत आहेत. ए...