Tuesday, October 13, 2020

....म्हणून गरज समन्वयाची.



       मानवाचा विकास होत असताना स्त्री आणि पुरुष या दोन भावनेतून प्रत्येक जण वाढत होता. त्यासोबतच तो आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर विविध प्रयोग करत होता. त्या प्रयोगातून स्वतःच्या विकासासाठी योग्य तो बदल निसर्गात करत होता. या सर्व बाबीत माणूस माणसावर बळाचा वापर करायला शिकला आणि माणसालाच गुलाम बनवून त्यांच्याकडून कामे करवून घेऊ लागला.

         त्यातून गट तयार झाले, त्यानंतर मग जागेचे वाद वाढू लागले. मग समूहाने राहत असताना बळाचा वापर करून आपल्या गरजेनुसार वृक्ष कापून राहण्यासाठी जागा तयार करू लागले. यातून अंतरा-अंतराने मानवी वस्त्या वाढू लागल्या. त्यातून वस्तीचा नायक/प्रमुख हि संकल्पना निर्माण झाली. यात प्रमुख आला म्हणजे दुय्यम सुद्धा आलेच. यातून मानवा-मानवात भेदभावाला सुरुवात झाली.

        कालांतराने स्त्री-पुरुष भेद, गुलाम-मालक, कामगार असे गट तयार झाले. यातून वाद वाढत जात मतभेद निर्माण होत. त्यासाठी सलोख्याचे भूमिका घेणारा प्रमुख किंवा मुखिया असत. तो जो न्याय देईल तो न्याय प्रत्येक जणांवर बंधनकारक असायचा. न्याय अन्यायबद्दल अशी कोणतीही मानसिकता सुरुवातीला न्हवती, पण कालांतराने मानवामध्ये स्वार्थी वृत्ती विकसित होऊ लागली. त्यातून स्वतःच्या हिताकडे माणूस लक्ष देऊ लागला. मग त्यातून दुसऱ्या माणसाला त्रास झाला तरीही त्याला काहीच वाटेनासे झाले. स्वार्थी वृत्ती वाढत असताना आपल्या मताशी सहमत असणाऱ्यांनाच माणूस आपलं म्हणू लागला आणि त्याला मदत सुद्धा करू लागला. आपण वागतोय किंवा जे करतोय ते चुकीचं आहे असं सांगणाऱ्याला माणूस दूर करू लागला. यातून टोळी, प्रदेश, राज्य या बाबी निर्माण झाल्या आणि आज जे पृथ्वीवर काही प्रादेशिक विभाग पाहत आहोत त्याची निर्मिती झाली.

       हे सर्व घडत असताना काही वेळा न्याय अन्यायाच्या बाबी दूर ठेवून आप-आपल्या पद्धधतीने मानवाशी व्यवहार सुरु झाला. त्यातूनच भारत या प्रदेशावर विविध परकीयांनी आक्रमण करून राज्य केलं. पण परकीयांच आक्रमण होण्याआधी इथं खूप मतभेद पेरल्या गेले होते. मानवा-मानवात भेद केल्या गेले होते. काही स्वार्थसाधु लोकांमुळे धर्माच्या नावाखाली चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात होते. 

        तशीच स्थिती सध्या आपल्या राज्यात पहायला मिळत आहे. त्याला कारणेही तसेच आहेत. पण हे करणे धार्मिक नव्हेत तर ही कारणे न्यायालयीन व संविधानिक प्रक्रियेशी संबंधित आहेत. पण याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न इथल्या काही बिनडोक व स्वार्थसाधु, राजकीय व स्वतःला कट्टर धार्मिक समजणाऱ्यांनी केला आहे. तो मुद्दा म्हणजे आरक्षण हा आहे. या मुद्द्यांसंदर्भात यापूर्वीच्या दोन लेखांमध्ये काही मुद्दे स्पष्ट केले आहेत. या लेखात त्यासंदर्भातील घडलेल्या बाबी व आपल्याला काय भूमिका घेत गरजेचं आहे. या संदर्भातील काही मुद्दे पाहूया.

         राज्यसरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. पण ते संविधानिक नाही असं समजून त्या निर्णयाविरोधात एका वकिलाने अपील केलं. त्या वकिलाची जात पाहून या प्रकरणास जातीचं आवरण घालण्याच काम काही अतिशहाण्या लोकांनी केलं. तिथून सुरु झाली सध्याच्या मतभेदाची सुरुवात. पण हे दोन जातीतीतील मतभेद आजचे नाही आहेत. या मतभेदाची सुरुवात जेव्हा जातीनुसार कामाची विभागणी केल्या गेली तेव्हापासूनच झाली. पण सध्या या मतभेदास वेगळेपण प्राप्त झालं आहे. याला काहीजण विकासामुळं निर्माण झालेली द्वेषभावना असं समजतात तर काहीजण जातीय द्वेष समजतात. कारणे काहीही असोत जे स्वतःला कट्टर धर्मवादी(धार्मिक नव्हे) समजतात त्याच लोकांच्या मनात अशा गोष्टी येतात. मग तेच लोक त्यांच्या डोक्यातील विचारांना इतरांमध्ये पसरवतात. इतर लोक त्याबद्दल शहानिशा न करता त्याला पुढं चालू ठेवतात. अशा पद्धधतीने हे द्वेषाच राजकारण चालू आहे. पण आपण देशाचा नागरिक म्हणून स्वतःला कधी प्रश्न केलात का ? की वकिलांनी जे अपील केलं होतं ते संविधानिक पद्धधतीने केलेलं अपील आहे. त्या अपिलाचा निर्णय जर आरक्षणाच्या विरोधात लागला तर होणाऱ्या नुकसानीस तुम्ही कोणाला जबाबदार धरले असते ? ते एक प्रकारे चांगलंच झालं असं समजा की ते अपील वकिलांनी दोन वर्षानंतर केलं नाही. कारण नंतर जर असे घडले असते तर ते कायदेशीर रित्या चुकीचं ठरवून त्या आरक्षणानुसार मिळालेल्या नियुक्त्या रद्द झाल्या असत्या, हे तुम्हाला कळते का ? जर हे कळत असेल तर मग ज्या यडपड आणि बिनडोक व्यक्तीने अपील करणाऱ्यांची जात पाहून त्या जातीला सोशल मिडियावर टार्गेट केलं, ट्रोल केलं त्या जातीचा यात काही दोष आहे का ? किंवा त्या व्यक्तीचा सुद्धा यात काही दोष आहे का ? मग हा निरर्थक वाद का वाढवताय ?

       हा वाद वाढवण्यात काही व्यक्ती सराईतपणे आपली भूमिका बजावत आहेत. त्यात खासदार उदयनराजे भोसले हे इथल्या नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून जेव्हा आपण राज्यसभेवर जातात तेव्हा त्यांना एका प्रवर्गाच्या हितासाठी नाही तर सर्वांगीण हितासाठी विचार करावा लागतो. जरी ते आरक्षित जागेवरून एका विशिष्ट समुदायातून निवडून गेलेले असते तरीसुद्धा. त्यांना देशातील प्रत्येक नागरिकांच्या हिताचा विचार करावा लागतो. हे याना कोणी सांगण्याची गरज आहे का ? आरक्षित जागेतून निवडून गेलेल्या प्रतिनिधीने त्या समुदायाचा तेव्हाच विचार करावा जेव्हा त्या समुदायावर अन्याय होत आहे असे जाणवेल. अन्यथा आरक्षित जागेवर निवडून गेलेला प्रतिनिधीला सुद्धा देशातील प्रत्येक नागरिकांच्या हिताचाच विचार करावा लागतो. असे असताना ईतर नागरिकांना असलेल्या सुविधा आम्हाला मिळत नसतील तर इतरांच्या सुविधा सुद्धा रद्द करा. असा म्हणण्याचा कोणत्याही लोकप्रतिनिधीला अधिकार नाही. तरीही तसे वक्तव्य लोकप्रतिनिधी करत असतील तर त्या मानसिकतेचा विरोध करणे हे लोकशातील प्रत्येक नागरिकांच कर्तव्य आहे. हे आपणास समजते का ?

      मग त्यांच्या या विधानाचा  एखाद्या राजकीय व्यक्तीने विधानाचा विरोध केला, त्यांच्या मानसिकतेबद्दल व पात्रतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केला, त्यांच्या विधानाबद्दल काही बोलले तर त्यांना लगेच ट्रोल करायचं ? त्यांच्याबद्दल खालच्या भाषेत जाऊन टीका-टिपण्णी करायची ? म्हणजे आज सुद्धा तुमच्यात समतेची भावना रुजली नाही ही बाब लक्षात येते. तुम्ही करत असलेल्या कामाबद्दल जर कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित करत असेल तर त्याचा विरोध करता. हीच आहे का शिवरायांची शिकवण ?  “खबरदार जर टाच मारून जाल पुढे तर चिंधड्या उडवीन राई-राई एवढ्या.” अशी धमकी देण्याची ताकद शिवरायांच्या राज्यात होती. ती धमकी कोणाला दिली होती हे सांगण्याची गरज नाही. म्हणजे ज्या शिवरायांच्या गाडीचे वारसदार म्हणून त्यांच्याबद्दल काही बोलले तर तुम्ही इतरांना त्रास देता. धमक्या देता, त्यांच्या बद्दल अर्वाच्य भाषेत टीका-टिपण्णी करता. हे पाहत असताना मला प्रश्न पडतो की, हे असं करणाऱ्यांना खरंच शिवराय कळालेत का ? कारण स्वतः शिवरायांच्या राज्यात शिवरायांना नुकासणीबद्दल धमकी देण्याचं क एक मुलगा करतो म्हणजे काय मानसिकता होती ती हे कळते का ? असे असताना अशी खालच्या थरावर जाऊन टीका-टिपण्णी करण्याचा अधिकार दिलाच कोणी तुम्हाला ? मान्य आहे लोकशाही आहे लोकशाहीत सर्वाना मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण व्यक्त होत असताना कशाबद्दल व्यक्त होतोय. काय मत व्यक्त करतोय याच सुद्धा भान आम्हाला राहू नये का ? आम्ही या देशातील नागरिकांच्या हितासाठी राजकारणाची स्वप्न बघतोय आणि आम्हालाच कळत नाही की, आम्ही कशाबद्दल काय बोलावे, तर मला सांगा. हा नेता या लोकशाहीत तुमचा विकास करू शकेल का ? त्यांची लायकी आहे का ? तुमचा विकास करण्याची ? ही जाणीव आम्ही करून घेणार आहोत का ? मानवी विकासाच्या सुरुवातीला जसे वाद होऊन मानवा-मानवात भेद भाव झाले आणि शांती समृद्धी कमी झाली. तशीच अवस्था आम्ही करून घेत आहोत असं आपणास वाटत नाही का ?

      बाळासाहेबांच्या स्टेटमेंटनंतर स्वतः संभाजीराजेंच स्टेटमेंट आहे की, बाळासाहेबांचं काहीही चुकलं नाही. मग मला सांगा बाळासाहेबांच्या विधानावर उदयनराजेच्या ज्या समर्थकांनी सोशल मीडियावर वाद घातला अर्वाच्य भाषेत टीका-टिपण्णी केली. त्यांच्यावर आज पोलीस केसेस होत आहेत. त्या पोलीस केसेस लढण्यासाठी तुम्हाला तुमचा राजकीय नेता मदत करणार नाही. सुरुवातीला काही वेळा फॉर्मलिटी म्हणून धीर देण्यासाठी काही शब्द बोलेल पण त्यानंतर भोगाव्या लागणाऱ्या परिणामास तुम्हाला स्वतःला सामोरे जावे लागणार आहे. शिक्षित असाल तर कायमचे शिक्षणाच्या होणाऱ्या सर्व फायद्याना मुकावे लागणार आहे. 

          त्यामुळं हे असं राजकीय व्यक्तींच्या टीका-टिपण्णीची किती प्रमाणात दखल घ्यायची याची जाणीव स्वतःत निर्माण करून घ्या मित्रानो. तुम्हाला जर काही झालं तर येणाऱ्या काळात तुमच्या कर्तृत्वाचे परिणाम तुमच्या कुटुंबाला भोगावे लागतील. तुम्ही शिक्षित असताना सुद्धा तुमचे सर्व कागदपत्रे निष्क्रिय होतील. कोणत्याही प्रकारचा फायदा तुम्हाला होणार नाही. आयुष्यात वडिलांच्या कमाईवर घेतलेल्या शिक्षणाचा फायदा तुम्हाला होऊ शकणार नाही. तुमच्या त्या एका चुकीमुळं सर्व वाटोळं होऊन जाईल. जे अशिक्षित आहेत. त्यांनी सुद्धा या प्रकरणात कधीच पडू नये. यामुळं सुरु होणाऱ्या कोर्ट कचेरीत पैसा वाया घालवण्याची तुमची ऐपत असलं तर तोच पैसा कुठंतरी सत्कारणी लावा.

       मराठा आणि बौद्ध समाजातील नेत्यांचे ते वाद नसतानाही त्याला या दोन जातीतील वाद आहेत अशी मानसिकता तयार करून घेऊन आजची तरुणाई गरळ ओकत आहे. याचा दुष्परिणाम असा होतोय की, मराठा आणि बौद्ध समाजातील व्यक्तींमध्ये जे सलोख्याचे बंधन तयार होत होते. त्यात अडथळे येत आहेत. जे सोबत राहत होते. त्यांच्यातील काही जणांमध्ये वाद निर्माण होत आहेत. असे असताना मराठा आणि बौद्ध समाजातील तरुणांनी घडत असलेल्या घटनेचा विचार करावा मगच व्यक्त व्हावे. शहरी भागातील तरुण जातीबद्दल बोलून मोकळं होतात. पण याचे परिणाम ग्रामीण भागात खूप खोलवर रुजतात. त्यातून द्वेषभावना वाढत जाते. मग सुरु होतो जातीय द्वेषाचा प्रकार. सध्या उदयनराजे आणि बाळासाहेब आंबेडकर असा वाद निर्माण करून त्याला जातीय स्वरूप प्राप्त करून देण्याचं काम काही तरुणांनी केलं आहे. पण मित्रानो तुम्हाला एवढंच सांगायचं की, तुम्ही तुमच्या नेत्यांचा विचार करत ज्या समाजविरोधात बोलता त्या समाजातील तुमचे काही चांगले मित्र आहेत. मग तुमच्या अशा बोलण्याने तुमचे नाते टिकेल का ? तुम्हाला तुमचे संबंध टिकवायचे आहेत का ? ज्या नेत्यामुळे तुमचा काहीही फायदा होणार नाही, अशा नेत्यासाठी हे नाते वाईट बनवायचे आहे. त्या नेत्यांचा कधीच प्रत्यक्ष संबंध येणार नाही. पण ग्रामीण भागात शहरातील काही नगरात मराठा आणि बौद्धांचा प्रत्यक्ष संबंध येतो. मग या संबंधात तुम्ही विष कालवत आहात असं तुम्हाला वाटत नाही का ? असे जर घडत गेले तर धार्मिक वाद वाढत जाऊन मराठा-बौद्ध यात जी द्वेषभावना आहे. ती वाढतच जाईल. मग अशा वेळी आपल्या आपण माणूस असण्याला काहीही अर्थ प्राप्त होत नाही.

        खरं पाहता राजकीय नेत्यांना अशा बाबी मध्ये स्वतः चर्चा करून त्याबद्दल योग्य तो निर्णय घ्यायला हवा. तो घेत असताना जनतेच्या हिताचाच राहील याची खात्री स्वतः बालगावी. जनतेच्या मूळ प्रश्नांना बगल देऊन असे काही मुद्दे उकरून काढून जर तुम्ही शांत राहत असाल तर तुमच्या उद्दिष्टाबद्दल आम्ही प्रश्नचिन्ह का उपस्थित करू नये ? तो उपस्थित करन हा इथल्या प्रत्येक नागरीकाचा हक्क आहे.

      मित्रानो खाजदार, आमदार हे आपल्या हिताचे निर्णय घेण्यासाठी आपण पाठवलेलं नोकर असतात. या नोकरांनी जर त्यांची भूमिका योग्य पद्धधतीने पार पाडली नाही तर त्याबद्दल त्यांना जाब विचारणं आपलं कर्तव्य आहे. हे कर्तव्य आपण पार पाडत नाही. म्हणून आज आम्हाला बेरोजगारीच्या नावाने ओरडावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या नावाने ओरडावे लागत आहे, महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या नावाने ओरडावे लागत आहे. एवढंच नाही ते ज्या ब्राम्हण समुदायाला प्रगत समजत होतो तो ब्राम्हण समुदाय सुद्धा आज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरत आहे. त्यांच्या न्याय हक्कसाठी सुद्धा तो झगडत आहे. त्यात सत्य किती ही बाब वेगळी. म्हणजे इथे प्रत्येक घटकांच्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवत आहे. असा जर आपल्याला आवाज उठवावा लागत असेल तर मग आम्ही आमचे प्रतिनिधी म्हणून यांना निवडूनच कशाला देतोय ?

          देशात घडत असलेल्या घटना पाहत असता, राजकीय नेता आमच्या हितासाठी झटत आहे असं वाटत नाही. प्रत्येक राजकीय नेता वैयक्तिक पातळीवर स्वार्थसाधु वृत्तीने काम करत आहेत. यांच्यामध्ये वैयक्तिक आयुष्याबाबतीत चांगले संबंध आहेत. पण राजकीय पातळीला हे कट्टर का होतात ? राजकीय पातळीला सुद्धा यांनी चांगले संबंध जपणे गरजेचं आहे. कोणत्याही बाबी करत असताना त्यात प्रत्येक नागरिकांच्या हिताची गोष्ट लक्षात घेऊन निर्णय घेणे गरजेचे आहे. नागरिकांच्या हितासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तेव्हाच हे असले वाद थांबण्यास मदत होईल. निरर्थक वाद वाढवण्यासाठी आपण त्यांना तिथे पाठवत नाही. ते नीटपणे काम करावेत म्हणून करोडो रुपयांच्या सोयी सुविधा त्यांना दिल्या जातात. त्यामुळं त्यांना कामाला लावायचं असेल तर त्यांच्यावर दबाव आणावा लागेल. आपल्या न्याय, हक्क, अधिकारासाठी एकत्रित यावं लागेल. या सर्व बाबी राजकीय व्यक्तींनी स्वतःत समन्वय साधून देशातील नागरिकांच हित घडवलं नाही, तर आम्हाला जाती धर्माचे वलय सोडून देऊन, आमच्या विकासासाठी कोणतीही जात किंवा धर्म कामाला येत नाहीत या बाबी लक्षात घेऊन ते मतभेद सोडून देऊन आप-आपसात समन्वयाची भूमिका घ्यावी लागेल.

©जी.संदीप(गोणार, नांदेड)

       9552803980


2 comments:

"भोंदूंचं साम्राज्य: तुमच्या भीतीवर उभा असलेला खेळ”

      मागील काही दिवसापासून एक नाव प्रकर्षाने चर्चेत आहे, सोशल मीडियावर सुद्धा त्याच व्यक्तीच्या नावाने विविध memes, पोस्ट viral होत आहेत. ए...